चतुःश्लोकी भागवत/ब्रह्मज्ञानी

विकिस्रोत कडून

तेणें उपदेशें श्रीनारद । पावला तो परमानंद । निर्दळूनियां भेदाभेद । यापरी बोध प्रबोधिला तेणें ॥२३॥
ऐसें उपदेशितां प्रजापती । श्रीभगवंताची मुख्यभक्ति । आतुडली नारदाचिये हातीं । अव्ययस्थिती परमानंद होत ॥२४॥
यापरी उपदेशिला नारद । यालागीं सर्वकर्मी ब्रह्मानंद । कोंदाटला स्वानंदकंद । परमानंद परिपूर्णपणें ॥२५॥
बोध देखोनी चतुरानना । आल्हाद जाहला चौगुणा । तेणें आल्हादेंकरुनी जाणा । आपुला ब्रह्मवीणा वोपिला तया ॥२६॥
नारदें करुनि प्रदक्षिणा । स्वानंदें लागलासे चरणां । मग वाहूनियां ब्रम्हवीणा । ब्रह्मानंदें जाणा निघाला तेसमयीं ॥२७॥
तो ब्रम्हवीणा वाजवीत । ब्रह्मपदें गीतीं गात । ब्रह्मपदीं डुल्लत डुल्लत । ब्रह्मसृष्टी विचरत ब्रह्मबोधें ॥२८॥
ब्रह्मचर्यातें पाळित । ब्रह्मबोध तिपाळित । ब्रह्मानंदें उन्मत्त । मही विचरत ब्रह्मत्वें तो ॥२९॥
तो ब्रह्मयासी संवादत । अधिकारियासी ब्रह्म देत । जग ब्रह्मरुपें देखत । यापरी विचरत त्रैलोक्य स्वयें ॥८३०॥
अठरा पुराणें व वेदविभागांचे कर्ते असूनहि आत्मसमाधान न लाभलेले व्यासमूनि सरस्वती तीरावर नारदांना भेटले
ऐसा विचरत स्वइच्छेंसी । आला सरस्वतीतीरासी । तेथें देखिलें श्रीव्यासासी । निजमानसी व्याकुळ असे ॥३१॥
ब्रह्मप्राप्तीलागीं जाण । घालूनि बैसला तो आसन । दृढ करितांही ध्यान । निजसमाधान न पावेंची ॥३२॥
श्रीव्यासें स्वर्ये आपण । केलें वेदविभागविवेचन । भारतादिअठरापुराण । इतिहास सुलक्षण व्यासें केली ॥३३॥
स्वधर्मकर्माचे लागवेग । व्यासें विभागिले सांग । स्वर्गनरकादिभोगभाग । देहविभाग विभागले व्यासें ॥३४॥
जन्ममरणादिअवस्था । व्यासें वर्णिल्या यथार्थता । ज्ञातेपणाची समर्थता । परी अंगीं सर्वथा असेना त्याचे ॥३५॥
वेदविभागी मी सज्ञान । ऐसा रावणासी अभिमान । यासी दिधलें निग्रहस्थान । श्रीव्यासें आपण ॐकारमात्रें ॥३६॥
ज्याचेनी दृष्टिस्पर्शे जाण । कौरवपांडववंशवर्धन । तो श्रीव्यासही आपण । आत्मसमाधान नपवेची ॥३७॥
ज्याचे करितां ग्रंथ पठण । ब्रह्महत्यादिदोषनिर्दळण । करितां भारतकथाकथन । निमाले ब्राह्मण उठविले अठरा ॥३८॥
यापरी ज्ञानसंपन्न । श्रीवेदव्यास द्वैपायन । तोही सदगुरुकृपेविण । आत्मसमाधान नपवेची ॥३९॥
मुख्य व्यासाची हे अवस्था । तेथें इतरांची कोण कथा । शाब्दिक ज्ञानाची योग्यता । तेथें अतर्क्य अहंता स्वभावें असे ॥८४०॥
अनागतभाग्यथार्थवक्ता । महाकवित्वें मी कविकर्ता । ऐशी अतिसूक्ष्म अहंता । नकळोनी स्वभावता व्यासासी असे ॥४१॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.