चतुःश्लोकी भागवत/गुरुकृपा

विकिस्रोत कडून

सदगुरुकृपा न होतां पूर्ण । न तुटे सूक्ष्म ज्ञानाभिमान । नकरितां गुरुसेवा अनन्य । शिष्य समाधान कदा नपवे ॥४२॥
नधरितां सदगुरुचे चरण । नव्हतां अनन्यशरण । वृथा ज्ञान वृथा ध्यान । वृथा वाग्विलपन पांडित्य तें ॥४३॥
वृथा स्वधर्मकर्माचार । वृथा विवेक विचार । सदगुरुकृपेविण जो नर । भूमिभार जडमूढ तो ॥४४॥
सदगुरुकृपा न होतां । व्यर्थ कविता व्यर्थ कथा । व्यर्थ सज्ञानश्लाघ्यता । देहअहंता तुटेना त्याची ॥४५॥
नकरितां सदगुरुभजन । शिष्यासी नोहे समाधान । सदगुरुतोचि ब्रह्मपूर्ण । चैतन्यघन निजात्मा तो ॥४६॥
सदगुरुचे चरणींची माती । अवचटें आतुडल्या स्वहातीं । पायां लागती चार्हीय मुक्ती । परमात्मप्राप्ती सच्छिष्या ॥४७॥
असो हें व्यासें करितां ध्यान । क्षणभरी स्थिर न राहे मन । अणुमात्र नपवे समाधान । तेणें उद्विग्नपणें अनुतापी ॥४८॥
मग ह्नणे तो कटकटां । जळो जाणीवप्रतिष्ठा । ज्ञातेपणें ठकिलों मोठा । मज मी उफराटा वंचलों कीं ॥४९॥
जाणपणाचा पहिला भ्रम । ज्ञातेपणें मी मूर्ख परम । निजहिताचें चुकलों वर्म । झालें निंद्यकर्म मज माझें ॥८५०॥
माझे देही देहस्थ मी कोण । त्या मीपणाचें मज नाहीं ज्ञान । केवीं पावेन मी समाधान । यापरी संपूर्ण अनुताप जाहला ॥५१॥
नरदेहीचें निजसाधन । साधावें निजात्मज्ञान । तें मी नसाधितां सज्ञान । अतिअज्ञान ज्ञानांध केवळ ॥५२॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.