Jump to content

चतुःश्लोकी भागवत/भागवताची दहा लक्षणें

विकिस्रोत कडून

निजपुत्रालागीं श्रीनारायण । कळवळोनी सांगे गुह्यज्ञान । तेंचि स्वपुत्रालागीं जाण । ब्रह्मा आपण मथितार्थ बोधी ॥१॥
ज्ञान विज्ञान भगवद्भक्ती । नारायणाची पूर्णस्थिती । कळवळोनी प्रजापती । निजपुत्राहातीं ओपिता झाला ॥२॥
तें दशलक्षण भागवत । विष्णुविरिंचीज्ञानमथित । तो ऐकतां ज्ञानमथितार्थ । ओपिला समस्त नारदोदरीं ॥३॥
तें न देखतां नयन । न माखतां निजकान । नातळतां अंतः करणमन । ओपिलें गुह्यज्ञान नारदहदयीं ॥४॥
सोडूनियां निज सुरबुद्धी । नातळतां आदिमध्यअवधीं । परिपूर्णत्वें करुनि बोधी । ज्ञानार्थसिद्धि वोपिली तया ॥५॥
जेवीं शिष्या विद्यातत्त्व देतां । गुरुसी ज्ञान वाढे अर्था । न्यूनत्व न घडे प्रबोधितां । पूर्ण चढे माथा सच्छिष्याचिया ॥६॥
तैसा उपदेश अलोलिक । उपदेशमात्रें तिन्हीलोक देख । गुरुशिष्यही होती एक । तेथें न्यूनाधिक कोणाचें कोणा ॥७॥
राया यापरी चतुरानन । उपदेशुनी गुह्यज्ञान । नारद केला ब्रम्हपूर्ण । चैतन्यघन समसाम्यरुप ॥८॥
जेणें होइजे ब्रम्हपूर्ण । तें भागवत दशलक्षण । त्या लक्षणांचें निजलक्षण । होउनी सावधान अवधारी तूं ॥९॥
इतर पुराणें जीं असतीं । त्यांची पांचलक्षण व्युत्पत्ति । श्रीमहाभागवताची स्थिती । जाण निश्चिती दशलक्षणें ॥८१०॥
मुख्य भागवताची व्युत्पत्ति । दशलक्षण त्याची स्थिती । ते मी सांगेन तुजप्रती । ऐके परीक्षिती नृपवर्या ॥११॥
सर्ग, विसर्गं, स्थान, पोषण, । ऊती, मन्वंतरें, ईशानुकथन । निरोध, मुक्ती, आश्रय पूर्ण । एवं दशलक्षण भागवत ॥१२॥
दशलक्षणांचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण । ऐक राया सावधान । लक्षणचिन्ह यथार्थ आतां ॥१३॥
सर्ग बोलिजे संसारातें । विसर्गं म्हणिजे संहारातें । स्थान म्हणिजे वैकुंठातें । पोषण तेथें भगवद्भजन ॥१४॥
कर्म त्यानांव ऊती । चौदामनूंची व्यवस्थिती । यानांव मन्वंतरे म्हणती । दशावतारकीर्ती ईशचरित ॥१५॥
सकळ इंद्रियांच्या वृत्ती । एकाग्र यानांव निरोधस्थिती । निःशेष जेथें विरे वृत्ती । त्यानांव मुक्ती महाराया ॥१६॥
उत्पत्तिस्थितिप्रळ्यांत । ज्या स्वरुपावरी होतजात । स्वरुप अविकारी यथास्थित । त्यानांव निश्चित आश्रय राया ॥१७॥
दोराअंगीं सर्प उपजला । दोरावरी सर्प नांदला । दोरावरी सर्प निजला । तरी दोर स्पर्शला नाहीं सर्पा ॥१८॥
तेवीं वस्तूच्या ठायीं । प्रपंचाची वार्ता नाहीं । तो झाला गेला घडे कांहीं । आश्रय पाही यानांव बापा ॥१९॥
पावावया आश्रयप्राप्ती । भावें करावी भगवदभक्ती । ते भक्तीची निजस्थिती । श्रीव्यासें भागवतीं विशद केली ॥८२०॥
ते भावें करितां भगवदभक्ती । त्या भक्तीची निजस्थिती । भक्तां परमानंदप्राप्ती । परिपूर्णस्थिती ठसावे येथें ॥२१॥
ठसावली जी ब्रह्मस्थिती । ते पालटों नेणे कल्पांतीं । कर्मी अकर्तृत्वाची प्रतीती । नारद निश्चिती उपदेशिला ॥२२॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.