चतुःश्लोकी भागवत/गुरुदास्याचें महिमान

विकिस्रोत कडून

ऋद्धिसिद्धिही अंगें आपण । त्याचे घरीचे वाहती जीवन । एवढें गुरुदास्याचें महिमान । सभाग्यजन पावती ॥१५॥
गुरुसेवेहोनी वरुता । उपाय नाहीं परमार्था । हे सत्यसत्य माझी वार्ता । वेदशस्त्रार्था संमत ॥१६॥
ते गुरुसेवेची अभिनव खूण । स्वामीसेवक न होती भिन्न । नुरवूनियां मीतूंपण । सेवका जनार्दन संतुष्टे ॥१७॥
हें वर्म जंव नये हातां । तंव सेवा न घडे गुरुभक्ता । ज्याचे हाता चढे एकात्मता । तो शिष्य सरता गुरुचरणीं ॥१८॥
दुर्घट वाटेल एकात्मता । तंव गुरुशिष्यआंतौता । एकचि परमात्मा तत्त्वतां । हे एकात्मता । स्वतःसिद्ध ॥१९॥
एकात्मता श्रीजनार्दन । नुरवूनियां मीतूंपण । शिष्याची सेवा संपूर्ण । सर्वकर्मी आपण अंगीकारी ॥२०॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.