पान:अस्पृश्य -विचार.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४२ )

इकडून परत जातांना, आमच्यापैकी पुष्कळांना त्याने अयोध्येस बरोबर नेले, व आमचा विश्वासूपणा लक्षात घेऊन आम्हांस रखवालीचे काम सांगितले; त्याने आम्हांवर बापासारखे प्रेम केले व म्हणून आम्ही आमच्या जातीला ' रामवंशी' म्हणजे रामोशी असें नांव घेतले असा स्वत:च्या पूर्वपीठिकेचा इतिहास रामोशी लोक सांगतात. इतक्या उंच नांवाशी आपला संबंध घडून आल्यामुळे पुष्कळांनी मांसाशनहि वर्ज केले. त्यांना रामभक्त असे म्हणतात. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या हद्दीवरील बेरडांशी यांचा पुष्कळच सारखवटपणा आहे व म्हणून या दोघांची कुलपरंपरा एकच असावी असें कांहींचे मत आहे. अर्थात् या उभयतांनाहि हे एककुलत्व पसंत नसेल. रामोश्यांचे बांदाट्टे, बेरड, हळणे, कडू, मांग इत्यादि पोटविभाग असून त्या प्रत्येकाचे पुनः चव्हाण व जाधव असे बारीक भाग आहेत. मराठा-कुणबिणीशी लग्ने झाल्यामुळे कडू नांवाची जात, व मांगिणीशी झाल्यामुळे मांग रामोशी ही जात उत्पन्न झाली असे म्हणतात. पूर्वीच्या राज्यांत यांच्याकडे किल्लेदाराचे काम असे. लग्ने वगैरे चालविण्यास देशस्थ ब्राह्मण कोठे कोठे जातो. इतर समारंभ व संस्कार जंगम लोकहि चालवितात. यांच्याच जातींतील गुरु " गोसावी " हे होत.
 मांग लोकांचा मूळ पुरुष यमऋषि. त्याला सात मुलगे. पैकी कर्कमुनीला दोन मुलगे झाले. यांपैकी पहिल्याने शंकराची गाय खाली म्हणून त्याला, ' तू महार हो ' असा शंकराने शाप दिला, व दुसऱ्याने प्रत्यक्ष जरी खाल्ली नाही, तरी त्याच्या अंगावर त्या मेलेल्या गायीच्या रक्ताचा शिडकाव झालेला होता म्हणून त्याला ' तूं मांग हो' असा शाप दिला. असो. ह्या कथेचा अर्थ कांहीं असो, चेहरेपट्टी व रंग यांवरून हेहि आर्यांची वसाहत होण्याच्या पूर्वीचे येथील रहिवासी होते. महाराष्ट्र, कर्नाटक