शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/शेतकऱ्यांच्या राज्याचे बीजारोपण

विकिस्रोत कडून





 शेतकऱ्यांच्या राज्याचे बीजारोपण


 शिवाजीराजाचा जन्म अंदाधुंदी, बेबंदशाही, दुष्काळ आणि गुलामगिरीच्या काळात झाला. त्यांच्या कामगिरीची थोरवी खऱ्या अर्थाने समजण्याकरिता हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. राजाने जे केले ते त्या काळाच्या परिस्थितीत इतके अलौकीक होते की, त्याच्या मनातील आदर्श व प्रेरणा कशा तयार झाल्या असतील याविषयी कुतूहल आणि आश्चर्य वाटावे. महान क्रांतिकारकांच्या प्रेरणा त्यांना जशाच्या तशा तयार आसपासच्या व्यक्तींकडून क्वचितच मिळतात. इतिहासात परंपरेने आई जिजाबाई व कारभारी दादोजी कोंडदेव यांच्या शिकवणीमुळे व प्रभावामुळे शिवाजीवर मोठा परिणाम घडला असे सांगितले जाते. परंतु राजांची सबंध कारर्किद पाहता त्यांचे व्यक्तिमत्त्व कोणा एकदोघा व्यक्तीमुळे घडले असेल हे असंभवनीय आहे. थोर पुरुषांच्या गुणांची निपज ही पोषक पार्श्वभूमीमुळे होत नाही. उलट आजूबाजूला पसरलेल्या सर्व विरोधी व्यक्तींना आणि अडचणींना तोंड देऊन त्यांच्यावर मात करता करता त्यांनी आपल्या प्रेरणा, आदर्श व शक्तद्द तयार केलेल्या आढळतात. जिजाबाईला शिवनेरी किल्ल्यावर राहायली लागणे मुलाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर येणे आणि शहाजी राजांचे वेगवेळ्या वतनदारांतील आयाराम गयाराम राजकारण आणि त्यातील अपयश या वातावरणाचा शिवाजीराजावर परिणाम होणे अपरिहार्यच होते. पण या गोष्टीपेक्षाही खानदानीच्या बंधनांतून व महालाच्या कैदेतून मुक्त झालेल्या शिवाजीराजाचे आसपासच्या मावळे शेतकऱ्यांशी जडलेले जीवाभाचे संबंध जास्त निर्णायक ठरले असणार.

 पण परंपरेप्रमाणे दादोजी कोंडदेव यांच्या शिकवणीमुळे जमीनधारा, शेतीसुधारणा आणि प्रजासंगोपण याबद्दलच्या राजाच्या कल्पना बनल्या असे मानले जाते. त्यामुळे दादोजींची शेतीव्यवस्था पाहणे महत्त्वाचे ठरते.

 दादोजी कोंडदेव हे दौड तालुक्यांतील पाटस जवळील मलठण गावचे कुलकर्णी. शहाजी महाराजांच्या पदरी पूर्वीपासून असावेत. पुणे आणि सुपे प्रांताची जहागिरी भोसल्यांकडे फार पूर्वीपासून. मालोजीराजांना ही जहागिरी निजामशहांनी दिली.

त्यानंतर शहाजीराजांकडे ती पुढे चालवण्यात आली. शहाजीराजांनी नौकऱ्या बदलल्या तरीही ती जहागिरी भोसल्यांकडेच राहिलेली दिसते. शहाजीराजांच्या जहागिरीची व्यवस्था दादोजी कोंडदेव पूर्वीपासूनच बघत असावेत; परंतु शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीची दहा-बारा वर्षे या जहागिरीतील लोकांनी अतोनात हाल सोसले. शहाजी राजांनी विजापूरकरांशी पुकारलेल्या बंडामुळे आणि सरदार रायाराव यांनी केलेल्या वाताहतीमुळे सुपे व पुणे परगण्यातील या जहागिरीतील रयतेचे अतोनात हाल झाले होते. यापूर्वीही भोसले जरी जहागीरदार असले तरी त्यांचे वास्तव्य जहागिरीत नव्हतेच. शिवाजीराजे आणि जिजाबाई हे प्रथमच स्वत:च्या जहागिरीत राहायला आले. ही त्याकाळी दुर्मिळ घटना होती. जिजाबाईसोबत दादोजी कोंडदेवासारखा प्रशासकही होता. गेल्या दहा-बारा वर्षाच्या हालांच्या पार्श्वभूमीवर प्रजाहितदक्ष राजा रयतेची कशी सुव्यवस्था ठेवू शकतो याचे प्रात्यक्षिकच दादोजीने रयतेला दाखवून दिले. आजूबाजूच्या वतनातील पिचत राहणाऱ्या रयतेला आपल्या नातेवाईकांकडून जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांनी नव्याने सुरू केलेल्या कामाच्या बातम्याही समजत असतीलच. रयतेच्या दहा- बारा वर्षाच्या वाताहतीच्या आधी निजामशहाचा वजीर मलिकअंबर याने महसुलाची एक व्यवस्था लावून दिली होती. व्यवस्थेचे नियम करणे वेगळे आणि ते प्रत्यक्ष अमलात आणणे वेगळे-कारण महसुलाचे नियम अमलात आणण्याचे काम वतनदारच करत असत. परंतु मलिकअंबरने स्वीकारलेल्या पद्धतीचा 'धारा' शेतकऱ्यांना व त्यातल्यात्यात पुणे आणि सुपे परगण्यातील शेतकऱ्यांना त्याचा जाच नव्हता कदाचित त्याचे श्रेय दादोजी कोंडदेवांनाच द्यावे लागेल. दहा-बारा वर्षाच्या वाताहतीनंतर दादाजी कोंडदेवांना हीच 'धारा' पद्धत जहागिरीत बसवायची होती. परंतु सततच्या दुष्काळामुळे रयतेची स्थिती तेवढा वसूल देण्याइतकि अजिबात नव्हती.

 सततच्या स्वाऱ्यांमुळे पुणे प्रांत ओसाड पडला होता. चांगल्या सूपीक जमिनीमध्ये मशागतीच्या अभावी भर शेतात किर्र झाडी माजली होती. वाघ, चित्ते, रानडुक्कर, कोल्हे, तरस, लांडगे हेच माणसांच्या जागी राज्य करीत होते. दादोजींनी ओसाड गावाचे पाटील, देशकुलकर्णी, चौधरी, चौगुले यांना पुण्यात बोलावून घेतले.त्यांची तक्रार ऐकून घेतली, अभय देऊन वसाहत उभी करण्याचे आवाहन केले. गावे वसवा, कुस घाला, देव मांडा, तुमची फिर्याद ऐकावयास धाकटे राजे येथेच आहेत असा दिलासा दिला. दादोजींच्या दिलाशाच्या शब्दांनी हळूहळू गावे उभी राहू लागली. मुक्त हस्ते तगाई कर्ज वाटली. शेतीस उत्तेजन दिले.

 जहागिरीची व्यवस्था लावत असताना दादोजींनी केलेल्या विशेष सुधारणा अशा-

 १. मावळे लोकांच्या बिन कवायती पायदळ पलटणी त्यांनी तयार केल्या. तिच्यावर हुकमतीचा दर्जा ठरवून दिला. गावेगावच्या चौक्या, पहारे बसवून चोरांची आणि लुटारूंची भीती नाहीशी केली.

 २. वाघ आणि लांडगे यांच्यापासून होणाऱ्या त्रासामुळे रयत त्रस्त झाली होती. वाघ आणि लांडगे मारून आणणाऱ्यास बक्षिसी जाहीर केली.

 ३. शेतीची लागवड जोमाने सुरू व्हावी म्हणून साऱ्याची माफी दिली. एका बिघ्याला पहिल्या वर्षी अर्धा पैसा सारा आणि मग वाढवत वाढवत आठव्या वर्षी बिघ्यात मलिकंबरी धाऱ्याप्रमाणे एक रुपया अशी साऱ्याची व्यवस्था लावून दिली. फळबाग लावायला उत्तेजन दिले. दहा झाडाचे उत्पन्न पूर्णपणे मालकाला आणि इतर नऊ झाडांच्या तपासणी उत्पन्नापैकी १/३ भाग सारा म्हणून देणे अशीही सोय केली.

 बाल शिवाजीराजांच्या सामाजिक आयुष्यातील सुरूवात म्हणजे आजकालच्या पुण्याची जमीन सोन्याच्या नांगराने नांगरण्याने झाली हा प्रसंग फद्दत कापून उद्घाटन करण्याच्या किंवा कोनशिला बसवण्याच्या प्रकारचा नव्हता. गाव राबते व्हावे, बलुतेदारांनी व्यवसाय सुरू करावा यासाठी राजांनी रयतेला दिलेले हे अभयदान होते. स्वराज्य उभे करायच्या कित्येक वर्षे आधी शेतकऱ्यांच्या शेतीच्या संरक्षणाचे आणि विकासाचे प्रयोग शहाजी भोसल्यांच्या वतनाच्या मुलखात केले गेले.

 इतके दिवस वतनदारांच्या पदरी असलेल्या आणि खून-मारामाऱ्यांच्या सुपाऱ्या घेणाऱ्या रामोशांना दादोजीपंतांनी गावाच्या पांढरीच्या आणि काळीच्या रक्षणासाठी नेमले. त्यांच्या मदतीसाठी हत्यारबंद पायदळ फौज सदैव तयार ठेवली.

 शेतीची व्यवस्था लावत असतानाच पंतानी न्यायदानाची व्यवस्था निर्माण करून रयतेमध्ये राजांबद्दल विश्वास निर्माण केला. काझी देईल तोच न्याय अशी व्यवस्था होती. पंतानी काझींना दूर करून पुण्याच्या लाल महालात कज्जेखटले चालू केले. बालशिवाजीला घेऊन पंत स्वत: न्याय करीत.अर्थातच यामुळे शिवाजीराजांवर न्यायाचे संस्कार बालपणीच घडत गेले. पंतांनी दिलेली न्यायाची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. खेडेबारे तर्फे तील मौजे रांझे गावच्या मुकादम रामजी चोरघे यांनी दांडगाईने मुकादमाचे वतन पूर्णपणे गिळंकृत करायला प्रारंभ केला. याविरुद्ध गणोजी चोरघे, भणगे पाटील व चव्हाण यांनी महाराजांकडे जाऊन फिर्याद केली. त्यावेळी दादोजींनी उन्मत रामजी चोरघे यांना ठार मारले व वतन जप्त करून तेथे विहीर, बाग केली. पुढे रामजीचा पुत्र विठोजी याला महाराजांनी कौल देऊन परत बोलाविले व वडिलांचे वतन मुलास परत दिले.

 आसवलीची पाटीलकी दत्ताजी व त्याचा पुतण्या दमाजी यांच्याकडे निम्म्या हिश्शाने होती. दत्ताजीने पुतण्याचा खून करून त्याच्या हिस्सा बळकाविला. दहशतीमुळे न्याय मागण्यास कोणीच पुढे येईना. दमाजीचा धाकटा मुलगा सूर्याजी बंगलोरला शहाजीराजांकडे गेला. राजांनी दादोजी कोंडदेवास चौकशी करून निवाडा करण्यास सांगितले. दादोजींनी गुन्हेगारांना कैद करून सूर्याजीच्या बाजूस पुन: पाटीलकि मिळवून दिली.

 कृष्णाजी नाईक बांदल भोरचे देशमुख जबरदस्तीने परस्पर स्वत:कर वसूल करू लागले. त्याच्या या गुंडगिरीविरुद्ध तक्रारी सुरू झाल्या. प्रथम पंतांनी समज दिली व तसे न करण्याबद्दल सांगितले; परंतु तो इतका आडदांड होता की त्याने पंतांच्याच घोड्याची शेपटी साफ छाटून टाकली. पंतानी बांदल देशमुखास कोंढाणा किल्ल्यावर आणून त्यास पुन्हा समजावून सांगितले. तरी तो ऐकेना. पंतांनी त्यांचे हातपाय कलम केले.

 बारा मावळातील पाटील, देशमुख, कुलकर्णी इत्यादी छोट्या वतनदारी रयतेची परस्पर नाडणूक करण्याचे प्रकार पंतांनी अजिबात बंद केले. पूर्वी मलिकंबरचा धारा काहीही असो, रयतेने प्रत्यक्ष दिलेला वसूल हा जास्तच असायचा.पंतांच्या व्यवस्थेमध्ये रयतेची लूट बंद झाली. न्यायाची खात्री निर्माण झाली.

 बाबजी भिकाजी गुजर, खेड शिवापूर जवळच्या रांझे गावचा पाटील. बाबजी पाटलाने पाटीलकिच्या मस्तीत गावातील एका स्त्रीवर बदअंमल केला. चौकशीसाठी महाराजांनी पाटलाला बोलावणे धाडलं. "जहागीर शहाजीराजांची आहे, शिवाजीला हुकूम देण्याचा अधिकार काय?" अशा घमेंडीत पाटलाने नकार दिला. पाटलाला मुसक्या बांधून जेरबंद करून आणण्यात आले. महाराजांनी गुन्ह्याची रीतसर चौकशी केली. गुन्हा शाबीत झाला. हुकूम केला. पाटलाचे कोपरापासून दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून टाकण्यात आले. (२८ जानेवारी १६४५) पाटलाची पिढीजात पाटीलकि जप्त करण्यात आली. हीच पाटीलकि २० होन अनामत घेऊन बाबाजी पाटलांना म्हणजे बाबजीच्याच दुसऱ्या नातेवाईकाला दिली. हातपाय अपंग केलेल्या पाटलाचा सांभाळ करण्याची अट घालून राजांनी आपण स्थापन करीत असलेल्या स्वराज्यामधील न्यायदानाचा अशा अनेक उदाहरणांनी आदर्श घालून दिला.

 जहागिरीतील सर्व बारा मावळांवर दहशत बसली. शहाजी महाराजांच्या सारख्या जहागीरदारांचा हामुलगा तत्कालीन इतर जहागिरीरदारांच्या मुलांपेक्षा वेगळा निघाला. याने मित्र सवंगडी जमवून गरीब मावळ्यांची, शेतकऱ्यांची पोरं गोळा करायला सुरूवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालूसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरुजी

चोर, कावजी मल्हार, तर वतनदारांचे चिरंजीव बाजी जेधे, सोनोपंत डबीर यांचा मुलगा, बापूजी मुदगल, देशपांड्याची मुले, नारो चिमणाजी, बाळाजी देशपांडे हे सगळे एका वयाचे होते असे नाही, काही लहान काही मोठे. सर्वात वयाने मोठे होते बाजी पासलकर, जवळजवळ महाराजांच्या आजोबांच्या वयाचे. अशा सवंगड्यांना बरोबर घेऊन महाराज स्वराज्याची तयारी करत होते.