शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख

विकिस्रोत कडून





 इतिहास-राजांचा आणि शेतकऱ्यांचा


 शिवाजी महाराजांचा आणि तत्कालीन रयतेचा -शेतकऱ्यांचा इतिहास याचे इतिहासातील इतर कालखंडांपेक्षा एक देदीप्यामान वेगळेपण आहे. हा राजाच्या धाडसी पराक्रमाचा इतिहास आहे, रयतेचा राजासाठी बलिदान करण्याची तयारी दाखवण्याचा इतिहास आहे, राजावरील आक्रमण म्हणजे आपल्या घरादारावरील आक्रमण असे रयतेने प्रत्यक्ष समजून वागण्याचा इतिहास आहे. रयतेसाठी लष्करी पराभव स्वीकारणाऱ्या राजाचा इतिहास आहे. राजा- रयत, शासन-शेतकरी यांच्या परस्पर सौहार्दपूर्ण संबंधांचा इतिहास आहे.

 शिवाजी महाराज आणि त्यांची रयत यांच्या इतिहासाचे देदीप्यमान वेगळेपण समजण्यासाठी महाराष्ट्रातील आधीच्या इतिहासाची नोंद घेणे आवश्यक आहे. या इतिहासात राजा-रयत संबंधांची माहिती फारच कमी आहे.

 शेतीतून अतिरिक्त धान्य निर्माण झाले तरच दुसरा कोणी बिगरशेतीचे व्यवसाय करू शकतो. बिगरशेतीचे व्यवसाय म्हणजे त्या काळी गावोगावची बलुतेदारीची कामे, उद्योगधंदे व्यापार, किल्ले बांधणे, गढ्या बांधणे, लढाया इ.इ.इतर सर्व व्यवसायांचा जन्म शेतीतून निघालेल्या धान्याच्या मुठीतून होतो. पण इतिहास लिहिला गेला तो शेतीबाहेरील घडामोडींचाच. शेतीतून निर्माण होणाऱ्या संपत्तीच्या लुटालुटीचा, गुलामगिरीचा, वेठबिगारीचा, लुटणाऱ्या दरोडोखोरांचा,राजांचा, लुटलेल्या संपत्तीच्या कैफाचा, अवतीभवती जमणाऱ्या भाटांचा, पुरोहितांचा, नर्तक- नर्तकींचा आणि संस्कृती संस्कृती म्हणून ऊर बडविणाऱ्यांचा. या सगळ्या डोलाऱ्यात गाडीत गेलेली धनधान्य संपत्ती आली कुठून, जमा कशी झाली याचा विचार इतिहासकारांनी टाळला. संपत्तीमुळे खरेदी केले गेलेले तंत्रज्ञान, विकसित झालेले तंत्रज्ञान, कलाकुसार इ. गोष्टी संपत्ती निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या की नाही याची इतिहासकारांनी दखल घेतली नाही. या गोष्टी पोहोचल्या तर नाहीचत पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हव्या होत्या याची जाणीवही नाही. इतिहास व बखरी लिहिणारे शेतकरी समाजातले नव्हते. शेतीच्या लुटीवर पोसल्या

जाणाऱ्या राज्यकर्त्या पुरोहित किंवा व्यापारी समाजातील होते. शेतकऱ्यांच्या शोषणाचा ऊहापोह करणे त्यांना सोयीस्कर नव्हते.

 ज्या देशात ऐतिहासिक दस्तऐवज व्यवस्थित लिहिले जातात, ठेवले जातात, सांभाळले जातात-त्या देशांतसुद्धा केवळ कागदपत्रांवरून इतिहासात नेमक काय घडलं हे सांगण कठीण होतं. भारतासारख्या देशात, जिथे लेखी नोंदी क्वचितच ठेवल्या जातात-ठेवल्या तर सत्याच्या आग्रहापेक्षा स्वत:ची किंवा धन्याची भलावण करण्याच्या बुद्धीनं -दप्तरं सांभाळली जात नाहीत. अगदी शिवरायाचे दस्तुरखुद्द कागदपत्र -पहारेकरी हिवाळ्यात क्षणभराच्या उबेसाठी शेकोटीला वापरतात; तिथे तर कागदपत्रांवरून इतिहास समजणं आणखीच दुरापास्त! लढाया, लुटालुटी, जाळपोळ यातून अपघातानं बचावलेले कागद आणखी एका अपघातानं नजरेखाली घालायला मिळाले,तर त्या आधारावर इतिहास उभा करणं धार्ष्ट्याचंच होईल.

 महाराष्ट्राचा इतिहास तर अभिनिवेशानंच जास्त भरलेला आहे. पाश्चिमात्य इतिहासकारांनी साम्राज्यशाही राजवटीला आधार देणारा इतिहास मांडला.त्या नेटिव्ह राजेरजवाडे, सरदार, दरकदार यांचं अज्ञान, भेकडपणा, कर्तृत्वशून्यता, आळस, स्वार्थलंपटपणा, देशभक्तीचा अभाव यावर भर दिला. यावर प्रतिक्रिया म्हणून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात भारतीय अस्मितेचं, राष्ट्रीयत्वाचं संरक्षण करण्याच्या बुद्धीनं अनेक इतिहासकार लेखणी सरसावून निघाले "या दोन्ही पद्धतींमध्ये सत्यसंशोधनाला आवश्यक असणाऱ्या अलिप्त आणि तटस्थ संशोधक दृष्टीला मर्यादा पडल्या. निर्भय वास्तववाद कित्येकदा गमावला गेला आहे." (लक्ष्मणशास्त्री जोशी, पुरस्कार, 'दासशूद्रांची गुलामगिरी-' लेखक : शरद पाटील.)

 "आम्ही प्राचीन आहोत. एवढंच नव्हे तर आज जगात शास्त्र, तत्त्वज्ञान, राजकारण वगैरे ज्या ज्या म्हणून काही गोष्टी आहेत-त्या सर्व एके काळी आमच्याजवळ होत्या व आम्हाला ठाऊक होत्या; हे सिद्ध करण्याचे भारतीय लेखकांना व इतिहासकारांना एक प्रकारचे वेडच लागले होते. तुम्ही म्हणता कांट हा महान तत्त्वज्ञानी होता काय? तर मग आमचा शंकराचार्य त्याहूनही महान होता. वाङ्मयात शेक्सपीअर श्रेष्ठ म्हणता तर आमचा कालिदास त्याच्यापेक्षा माठा साहित्यिक होता. तुमच्याकडे राजकारणात रुसोचा सामाजिक कराराचा सिद्धान्त निघाला ना ! तसा आमच्याकडेही होता. आमच्याकडे विमाने, रेल्वे, स्फोटक द्रव्ये सर्व काही होते. विशेष म्हणजे ज्यावेळी युरोपखंडातले लोक अस्वलाची कातडी परिधान करण्याच्या रानटी अवस्थेत होते. त्यावेळी आम्ही तलमदार कापड वापरीत होतो."

 "ज्यावेळी युरोपियन लोक निव्वळ रानवट होते त्यावेळी आम्ही संस्कृतिसंपन्न होतो ही कल्पना म्हणजे आमच्या इतिहासकारांची फारच मोठी प्रेरक शक्तद्द. आमच्या देशाचा संपूर्ण धुव्वा उडवू पाहाणाऱ्या परकिय शत्रूंना तोंड देण्यासाठी सुसज्ज व्हावे म्हणून आम्ही आमचे पुरातन कील्ले, खंदक, सनदा, भूर्जपत्रे गतेतिहासाच्या गर्तेतून उकरून काढली." (श्री.अ.डांगे -आदिभारत,पृष्ठ ४.)

 "एका खोट्याचा प्रतिकार करण्यासाठी दुसरं खोटं सांगून काही सत्य समजू शकत नाही. इतिहासाचं सार काढताना मग अशा बांधिलकिच्या विचारवंतांची त्रेधातिरपीट उडू लागते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना - 'सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती निव्वळ अधम अशा इंग्रजी व्यवस्थेपुढे का नमली?' याचं उत्तर देण्यासाठी चक्रनेमिक्रमाने - रहाटगाडग्याप्रमाणे इतिहासात वर गेलेले खाली येतात, खाली आलेले यथाक्रम वर जातात त्यासाठी कोणत्याही प्रकारे भारतीय व्यवस्थेत ढवळाढवळ करण्याचं काही कारण नाही, असं खास पुणेरी निदान मांडावं लागलं.

 "एखाद्या पोलिसी चतुरकथेत खून कसा आणि कोणी केला असावा यासंबंधी अजागळ पोलिस अधिकाऱ्यानं आपली अटकळ मोठ्या आत्मविश्वासानं मांडली आणि त्याच्या अटकळीत अनेक गोष्टीचा खुलासा होत नाही असं लक्षात आलं म्हणजे ज्या प्रकारची रुखरुख लागते, त्या प्रकारची रुखरुख मला राष्ट्रवादी इतिहास वाचताना लागते. इतिहासाची साक्ष काहीतरी दडवण्यासाठी काढली जात आहे. काहीतरी लपवलं जात आहे, इतिहासात प्रत्यक्ष काहीतरी वेगळंच असलं पाहिजे असं वाटत राहावं.

 "आपला तो बबड्या आणि लोकाचं कारटं" या वृत्तीनं महाराष्ट्राच्या इतिहासात काही आत्मकौतुकाचा भाग यावा हे समजण्यासारखं आहे. पुण्याला पेशव्यांचा विश्रामबागवाडा पाहिला आणि त्याच्या दीडदोनशे वर्ष आधी दिल्लीश्वरांनी केलेले बांधकामं पाहिली म्हणजे सर्व देशाच्या इतिहासात पेशव्यांचं स्थान काय होतं याबद्दलची वर्णनं अवास्तव असावीत हे स्पष्टच होतं. छत्रसाल, बंदा बहादूर, सूरजमल जाट,हैदर, टिपू यांसारख्या इतर प्रदेशातील पुरुषांच्या कामाच्या संदर्भात मराठ्यांचा इतिहास लिहिला पाहिजे याची जाणीव होते. महाराष्ट्राचा इतिहास हा आत्मकौतुकानं भरला आहे आणि अवाजवीपणे आत्मकेंद्रीही आहे.

 आपलं विशिष्ट ऐतिहासिक तत्त्वज्ञान लक्षात घेऊन त्याच्या अनुरोधानं गतकाळ तपासून बघण्याचा कार्यक्रम काही मार्क्सवादी लेखकांनीही पार पाडला आहे. डांगे, राजवाडे, जयस्वाल, देवीप्रसाद चट्टोपाध्याय, शरद पाटील यांनी आदिभारत काळातील अर्थव्यवस्थेचा विकास, हा मार्क्सच्या अनुमानाप्रमाणेच झाला असं

मोठ्या विस्तारानं मांडलं, त्यासाठी शंकास्पद विश्वसनीयतेच्या वेदोपनिषदकालीन साहित्याचं त्यांनी एखाद्या महामहोपाध्यायापेक्षा विस्तारानं अवगाहन केलं. याउलट, मुसलमानी आक्रमणापासूनच्या इतिहासाचा अन्वय लावण्याचं काम मार्क्सवाद्यांनी फार किरकोळ केलं,' मध्ययुगीन राजेरजवाड्यांच्या एकमेकांतील लढाया' असा शिक्का मारुन हा उभा कालखंड त्यांनी दुर्लक्षित केला. सैद्धान्तिक दृष्टिकोनातून त्यांनी हा इतिहास तपासून बघितला असता तर इतिहासाचा पुरा अर्थ मार्क्सच्या विश्लेषणातही लागत नाही हे त्यांच्यासुद्धा लक्षात आलं असतं.

 पश्चिमी इतिहासकारांचं लिखाण वाचताना जागोजाग असमाधान राहतं. लेखकाला देशाची कल्पना किती तुटपुंजी आहे याची ओळीओळीला जाणीव होते. ते साहजिकच आहे. पण भारतीयांनी लिहिलेला भारताचा किंवा महाराष्ट्राचा इतिहास वाचतानाही त्याच प्रकारचं असमाधान वाटतं. या इतिहासातले धागे एकमेकांशी जुळत नाहीत. कुठेतरी काहीतरी चुकतं आहे अशी रुखरुख लागून राहते. ( शरद जोशी - रामदेवरायाचा धडा-प्रचलित अर्थव्यस्थेवर नवा प्रकाश)

 इतिहासाच्या या अनेक मांडण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीला स्थान कुठेही नाही. इतिहासाची एक मांडणी महात्मा जोतिबा फुल्यांनीही केली. आजवरच्या कोणत्याही मांडणीत संपत्ती - उत्पादक शेतकऱ्याला स्थान नव्हते. ते महात्मा फुल्यांच्या मांडणीत आहे.

 "इतिहासाचा अर्थ सलगपणे, एका सूत्रामध्ये ओवण्याचं पहिलं काम महात्मा जोतिबा फुल्यांनी केलं, अगदी विष्णूच्या मत्स्यावतारापासून ते वासुदेव बळवंत फडक्यांच्या बंडापर्यंत -'शूद्रांची गुलामगिरी' या एका सूत्रात त्यांनी सर्व घटना गुंफून दाखवल्या. राष्ट्रवादी आघाडीची पर्वा न करता त्यांनी मोगलांना शूद्रांच्या मुक्तद्दचं श्रेय दिलं.

 ('आर्य धर्म श्रेष्ठ भट वाखाणीती। जुलमी म्हणती । मोगलास ॥ भटपाशातून शूद्र मुक्त केले। ईशाकडे नेले। कोणी दादा?' मानव- महंमद- महात्मा फुले सग्रम वाङ्मय, पृष्ठ ४९०) आणि राष्ट्रवाद्यांच्या महापुरुषांवर कडाकड आसूड उडवले. ('शेतकऱ्यांचा असूड' समग्र वाङ्मयः पृष्ठ २०१)

 'तेव्हा अखेरी शंकराचार्याने तुर्कि लोकास मराठ्यात सामील करून घेऊन त्यांजकडून तरवारीचे जोराने येथील बौद्ध लोकांचा मोड केला. त्यावर काही काळ लोटल्यानंतर हजरत महंमद पैगंबराचे जहामर्द शिष्य, आर्यभटांच कृत्रिम धर्मासहित सोरटी सोमनाथ सारख्या मूर्तीचा तरवारीच्या प्रहारांनी विध्वंस करून, शेतकऱ्यास आर्यांच्या ब्रह्मकपाटातून मुक्त करू लागल्यामुळे भटब्राह्मणांतील

मुकुंदराज, ज्ञानोबांनी भागवत बखरीतील काही कल्पित भाग उचलून त्याचे प्राकृत भाषेत विवेकसिंधू व ज्ञानेश्वरी या नावांचे डावपेची ग्रंथ करून शेतकऱ्यांची मने इतकि भ्रमिष्ट केली की, ते कुरणासहित महंमदी लोकास नीच मानून त्यांच्या उलटा द्वेष करू कागले. नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नावाचा साधू शेतकऱ्यामध्ये निर्माण झाला. तो शेतकऱ्यांतील शिवाजीराजास बोध करून त्याचे हातून भटब्राह्मणांच्या कृत्रिम धर्माची उचलबांगाडी करून शेतकऱ्यांस त्यांच्या पाशातून सोडवील, या भयास्तव भटब्राह्मणांतील अत्यंत वेदांती रामदास स्वामींनी महाधूर्त गागाभटाचे संगन्मताने, अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून, अज्ञानी शिवाजीचा व नि:स्पृह तुकारम बुवांचा पुरता स्नेह वाढून दिला नाही.'

 महात्मा जोतिबा फुल्यांच्या इतिहासमांडणीला संशोधनाचा वा कागदोपत्री साधनांचा आधार नव्हता. अशा तऱ्हेचा पुरावा पाच हजार वर्षांचा इतिहास लिहिणाऱ्याला मिळवणं शक्यही नव्हतं. शूद्रांच्या गुलामगिरीच्या सूत्रावर त्यांनी प्रचंड प्रतिभेनं एक इतिहासाचा प्रपंच उभा केला. पण विद्वत्मान्य इतिहासकारांत आज जोतिबांना काहीच मान्यता नाही. (शरद जोशी- रामदेवरायाचा धडा.प्रचलित अर्थव्यवस्थेवर प्रकाश)

 शेतीमध्ये वरकड उत्पन्न तयार होऊ लागल्यापासून एका वेगळ्या कालखंडाला सुरूवात झाली. शेतीवर कष्ट करणाऱ्यांनी राबराबून अन्नधान्य तयार करावे आणि ते अशा अन्नधान्य लूटमार करणाऱ्या दरोडेखोरांनी लुटून न्यावे अशा व्यवस्थेचा हा नवीन कालखंड होता. लुटणाऱ्यांची संख्या वाढत गेली. तसे या लुटारूंचे रूपांतर सरकार राजामहाराजांत झाले. राज्यव्यवस्थेची सुरूवात हीच लुटीतून झाली. प्रत्येक लुटारू टोळीच्या प्रमुखाने स्वत:ची हत्यारबंद लुटीची फौज तयार केली. त्या फौजेच्या उदरभरणाकरिता आणि टोळीप्रमुखांच्या चैनीकरिता आसपासच्या शेतीतून तयार होणारे अन्नधान्य ताब्यात घेणे हे एकमेव साधन होते. काही काळानंतर या लुटीला व्यवस्थित स्वरूप देऊन महसुलाची यंत्रणा तयार झाली. प्रत्येक लुटारू-प्रमुख काही प्रदेशातील शेतकऱ्यांकडून त्यांच्या उत्पादनातील वाटा मिळविणे आपला स्वयंसिद्ध हक्क मानू लागले. मग आपापल्या राज्याच्या प्रदेशातील शेतकऱ्यांकडून लूट मिळवून त्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते. राज्यातील शेतकऱ्यांवर दबाव आणण्यासाठी तयार केलेली फौज आसपासच्या राज्यावर चालून जाण्याकरिता राबवली जाऊ लागली. या लढाया जो जिंकेल तो सार्वभौम राजा. जो हरेल तो मांडलिक राजा. मांडलिक राजाच्या

ताब्यातील प्रदेश कायमचा ताब्यात घेण्याची आवश्यकता नव्हती. मांडलिक राजांकडून त्यांच्या प्रदेशात केलेल्या लुटीचा एक भाग मिळाला की सर्व जेत्या राजांचे समाधान होत असे. अशा लढाया निरंतर चालत. लक्ष्मी संपादण्याचा सर्वात फायदेशीर मार्ग नांगर चालवणे, बलुतेदारांचे व्यवसाय करणे हा नाही तर तलवार चालवणे हा बनला.

 राजा-रयत परस्पर संबंधांचा काही परिणाम इतिहासात उल्लेखलेल्या मोठ्या राजकीय स्थित्यंतरावर होणे स्वाभाविक आहे. राजा-रयत संबंधात सौहार्द असेल तर त्या संबंधांचा परिणाम आणि राजाविषयी कदाचित त्यातूनच निर्माण होणाऱ्या स्वामिनिष्ठेचा परिणाम म्हणून आपल्या राजाविरुद्धच्या राजकिय स्थित्यंतराला प्रजेचा सक्रिय विरोध होण्यात दिसू शकतो. गनिमी काव्याला अनुकूल भौगोलिक रचनेबरोबरच अनुकूल समाजाचीही तेवढीच आवश्यकता असते. केवळ लुटीचे संबंध असतील तर राजाच्या लढायांबद्दल प्रजा पूर्ण उदासीनही होऊ शकतो. प्रसंगी राजाविरोधीही होऊ शकते. रयत राजा संबंधाचे सूत्र ध्यानात ठेवले तर इतिहासातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ लागतो.

 महाराष्ट्रातील इजिहासात एतद्देशियांचे राज्य जाऊन मुसलमानी सत्ता येणे, ती स्थिर होणे, मुसलमानी सत्ता जाऊन मराठ्यांची सत्ता येणे मराठ्यांची सत्ता जाऊन इंग्रजांची सत्ता येणे ही तीन स्थित्यंतरे घडली.

 महात्मा फुल्यांच्या काळातच मराठ्यांचे राज्य जाऊन इंग्रजांचे राज्य येत होते. 'पेशवाईच्या सावलीत' या लेखामध्ये इतिहासकार शेजवलकरांनी वर्णन केलेल्या गोष्टींचे फुले कदाचित जवळचे साक्षीदार होते. १८५७ च्या इंग्रजांविरुद्धच्या एकेिशियांच्या राज्य टिकवण्याच्या शेवटच्या प्रयत्नाचे फुले साक्षीदार होते.

 "सामाजिक प्रगतीला आणि क्रांतीला प्रतिकूल ठरलेल्या ब्राह्मणी राज्यापेक्षा इंग्रजी राज्य परवडले. नानासाहेब पेशवे जिवंत असले तर ब्राह्मणांचे जातिश्रेष्ठत्व मानणारे अन्यायी आणि प्रतिगामी राज्य पुन: महाराष्ट्रात आले असते," अशी भीती त्यांना वाटत होती. ( म.जोतिबा फुले- धनंजय किर : पृष्ठ ९१)

 मराठा राज्यातून इंग्रजी राज्य येण्याच्या स्थित्यंतराची अनुभवलेली भावना जोतिबांनी हिंदू राजवट जाऊन मुसमानी राजवट येण्याच्या स्थित्यंतरात पाहिली.

 महात्मा फुल्यांच्या मते सर्वसाधारण रयतेची हीच भावना त्यांच्या जवळच्या गढीत, किल्ल्यावर किंवा राजधानीत राहणाऱ्या स्वदेशबांधव व स्वधर्मीय सरदार, राजाविषयी असावी. मुसलमानी आक्रमकांडून एतद्देशीय राजाच्या पराभवात

रयतेला सूडाचे समाधान असावे. म्हणून परकिय लुटारूंच्या रूपाने विमोचक आला असे वाटले असावे. किमान पक्षी दोन लुटारूंच्या लढाईत स्वत:चा जीव धोक्यात घालण्यात व धारातीर्थी पडण्यात रयतेला स्वारस्य वाटले नसावे.

 महाराष्ट्रामध्ये देवगिरीची यादवांची सत्ता जाऊन मुसलमानी सत्ता आली याचे एक कारण सर्वच जण 'एकराष्ट्रीयतेचा अभाव' असे देतात. याचे उदाहरण म्हणून या प्रांतातच अनेक छोटी छोटी राज्ये होती, प्रत्येक राजा स्वत:ला 'राजाधिराज', 'पृथ्वी वल्लभ' इ. बिरुदे घेत होता आणि सर्व राजे आपआपसात भांडत होते- ही वस्तुस्थिती मांडली जाते. फुल्यांनी या एकराष्ट्रीयतेच्या अभावाचे अधिक खोलात जाऊन विश्लेषण केले आहे. त्यातल्या त्यात मोठ्या, प्रभावशाली असणाऱ्या हिंदुधर्मीयांच्या राज्याच्या अंतर्गतही एकराष्ट्रीयत्वाची भावना नव्हती असे सूचित केले आहे.

 "अठरा धान्यांची एकि होऊन त्याचे चरचरीत कडबोळे म्हणजे एकमय लोक (Nation) कसे होऊ शकेल?" असा प्रश्न जोतिबांनी विचारला.

 रयतेला आपण राजाच्या राष्ट्राचे आहोत असे वाटत नसेल, रयतेचे अगदी स्वकिय राजांशी असलेले संबंधही रक्त, अश्रू आणि घाम यांनीच भरलेले असतील तर एकराष्ट्रीयत्वाची भावना कशी निर्माण होऊ शकणार?

 'एकमय लोक' या अर्थाचे राष्ट्र मुसलमानपूर्व महाराष्ट्रातही नव्हते. जोतिबांच्या वेळीही नव्हते आणि आजही तयार झालेले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतीच्या लुटीचे युग सुरू झाल्यापासून एकसंध शेतकऱ्यांच्या, बलुतेदारांच्या हिताचे असे राष्ट्र उभे करण्याचा प्रयत्न एका लहानशा कालखंडात झाला. या कालखंडाचे नायक होते छत्रपती शिवाजी महाराज.