शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/शेतकऱ्यांचा राजा

विकिस्रोत कडून



 शेतकऱ्यांचा राजा


 शिवाजीराजांच्या पन्नास वर्षांच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनाचे अर्थ लावण्याचे काम निरनिराळ्या विचारवंतांनी, इतिहास संशोधकांनी, तत्वचिंतकांनी, धर्माभिमान्यांनी आपापल्या दृष्टिकोनांतून केले आहे; परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे मावळ्यांचे राजे होते. खऱ्या अर्थाने ते केवळ शेतकऱ्यांचेच राजे होते, इतक्या सुस्पष्टपणे शिवाजी महाराजांच्या जीवनकालाचा अर्थ कोणी लावला नाही. कारण असा खरा अर्थ शेतकऱ्यांपुढे येणे त्यांच्या दृष्टीने सोयीचेही नव्हते व नाही.

 त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा राजा कधी मिळालाच नाही. शिवपूर्वकालीन अवस्था ही कोणीही येऊन रयतेस लुटावे आणि राज्य करावे अशी राहिली. पण स्वराज्याची मुहूर्तमेढ करताना व नतरही महाराजांनी प्रसंगी अतिशय कठोरतेने, प्रसंगी मृदुतेने, प्रसंगी सामंजस्याने, गनिमी काव्याने सर्व बुद्धिकौशल्य पणाला लावून पहिल्यांदा शेतकऱ्यांचे राज्य निर्माण केले. वाढवले. हरवलेली सुरक्षितता परत मिळवून दिली.

 शिवपूर्व काळात शेतकरी समाज हा वतनदारांच्या लहरीवर जीवन जगत असे. दुष्काळ असो, नापिकी असो की अतिवृष्टीमुळे नासाडी होवो, वसुलीचा रेटा हा वतनदाराच्या मर्जीप्रमाणे आणि लहरीप्रमाणे असे. अगदी नापिकीच्या काळात म्हणजे दुष्काळातसुद्धा वसुलीसाठी वतनदारांची फौज येत आहे असे कळताच शेतकरी प्राणभयाने डोंगरदऱ्यांमध्ये लपून बसत याची नोंद इतिहासात पदोपदी आढळते. वतनदारांना विरोध करणे म्हणजे त्याचे वैर विकत घेणे; वसुली नाकारणे म्हणजे संसाराची राख-रांगोळी करून घेणे, धूळधाण करून घेणे होते. शेतकऱ्यांची लूट करून बादशहाच्या खजिन्यामध्ये पैसा भरणारे वतनदार आणि त्यांचे राजे पातशहा यांना रयतेची फारशी चिंता नसे. त्यामुळे शेती, शेतकरी किंवा गावगाड्याशी राज्यकर्त्यांचा संबंध पूर्णपणे तुटलेला होता. शेतकरी, गावकरी यांच्यावर सत्ता चाले ती गाव-वतनदार, परगणे वतनदार किंवा सुभेदारांची. वतनदारांचे धोरण हे या निमित्ताने जाणून घेणे आवश्यक आहे. देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी हे

त्या काळचे वतनदार. तत्कालीन व्यवस्थेनुसार गावच्या काळीवर व पांढरीवर म्हणजेच शेतीवर व रयतेवर, तसेच गावचे शिवार अथवा चराऊ पडीत जमिनीवर पाटलांची सत्ता चाले. तर कुलकर्णी हा वतनदार असे. आणि परगण्याची रयत व भूमी यांच्यावर मालकी देशमुखांची असे. त्यांचे सहायक देशपांडे होते. ज्या राज्याशी परगणा जोडलेला असे त्या राज्याच्या राजाला धान्य, रोख रक्कम जी लागेल ती वतनदार पुरवीत असत. अर्थात वसुलीच्या परगण्यासाठी ते राजाला जबाबदार असत. म्हणजे रयतेच्या दृष्टीने परगण्याचा राजा देशमुख. तो आपल्या पदरी 'पेशवा' बाळगे. या देशमुखांना स्वतंत्र मुद्रा मिळत होती. परगण्याच्या दप्तरावर देशमुखाचा शिक्का असणे अत्यंत आवश्यक होते. कोणत्या गावच्या शेतीवर किती महसूल वसूल करायचा, व्यापाऱ्याकडून किती जकात घ्यायची हे निर्णय परगण्याचा देशमुख स्वमर्जीनुसार ठरवी. गाव शिवारातील जमिनीचे बांध कायम राखणे, तंटेबखेडे मिटविणे,गुराढोरांवर, पिकांवर व रयतेवर दुसऱ्याकडून जुलूम न होऊ देण्याची काळजी घेणे, नव्या वसाहती करणे, इनाम देणे हे अधिकार देशमुखाकडे. राजाला द्यायचा महसूल वतनदार राजाशी किंवा सुभेदारांशी परस्पर स्वतंत्रपणे ठरवून घेत. तिजोरीत भरायच्या वसुलापेक्षा कितीतरी पटीने अधिक रक्कम वतनदारांची फौज रयतेकडून वसूल करीत. या संदर्भात सभासदांनी केलेले वर्णन फार बोलके आहे. ते लिहितात,

 "आदिलशहा, निजामशहा, मोगलाईतील ज्यांनी देश काबील केला, त्या देशात पाटील, कुलकर्णी व देशमुख यांच्या हाती रयत सोपविली. त्यांनी हवी तेवढी कमाई करावी आणि मोघम रक्कम भरावी. हजार दोन हजार मिरासदाराने जमा करावी आणि त्या गावच्या नावावर मात्र दोनशे ते तीनशे दिवाणखान्यात खंड भरावा. यामुळे मिरासदार श्रीमंत होऊन गावात गढी, वाडे, कोट, बांधून सैन्य बाळगून बळावले.... ज्या दिवाणास भेटणे नाही, दिवाणाने गुंजाईस अधिक सांगितल्याने भांडावयास उभे राहतात, ये जातीने पुंड होऊन देश बळकाविले."

 'आज्ञापत्र' काराने वतनदारांबद्दल लिहिताना म्हटले आहे, "राज्यांतील देशमुख आदी करून यांची वतनदारी ही प्राकृत परिभाषा मात्र होती. ते स्वल्पच परंतु स्वतंत्र देशनायक आहेत. हे लोक म्हणजे राजाचे वाटेकरी आहेत." वरील वतनदार म्हणजे बुलंद शक्तद्द होती. या शक्तद्दला सांभाळणे हेच रयतेसाठी काम होऊन बसले होते. जर या वतनदारांना त्यांच्याच राजाकडून थोडा जरी उपद्रव झाला तरी ते शत्रूच्या गोटात सामील होत आणि आपल्याच राज्याच्या विरुद्ध लढायला उभे राहत.

 ही वतनदारी आली कशी? अगदी शिवपूर्व काळाच्या शेकडो वर्षे आधीपासून

राजाराजांतील लढाया अखंड चालत; परंतु प्रजेला त्याची तोशीस पोचत नसे. युद्धांत भाग न घेतलेल्या प्रजेला लुटणे किंवा ठार मारणे टाळले जात असे. लढाई सुरू असली तरी शेतकरी शांतपणे आपल्या शेतात काम करीत आणि या गोष्टीची नोंद अगदी परकीयांनीसुद्धा करून ठेवली आहे. मुसलमानी आक्रमणापासून लढायांचा आणि फौजेच्या हालचालीचा जाच गावगाड्याला होऊ लागला. शत्रूराष्ट्राला सर्वथैव लुटणे हे मान्यताप्राप्त तत्त्वच झाले. सत्तेच्या लालसेतून प्रचंड सैन्यबळ बाळण्याची गरज निर्माण झाली. सैन्य बाळगण्यासाठी आवश्यक असलेले द्रव्य शत्रूराष्ट्राची लूट करून मिळवावे हा पायंडा पडला. विजापूरचा आदिलशहा तर आपल्या सैन्यासोबत आठ हजार लुटारू सदैव बाळगत असे. याचा उल्लेख मद्रासकार इंग्रजांनी करून ठेवला आहे. त्या काळातील बादशहाची लूट फार भयानक होती. देवस्थाने फोडणे, स्त्री-पुरुष-मुलांना कैद करून गुलाम म्हणून विकणे, स्त्रियांचा भोगार्थ म्हणून उपयोग करणे, उभ्या शेतातील पीक कापून नेता येत नसेल तर त्याचा तुडवून नाश करणे, गावेच्या गावे जाळून बेचिराख करणे ही पद्धत त्या काळी अवलंबिली गेली. यथावकाश मुसलमानी सत्ताधाऱ्यांना स्थानिक लोकांच्या मदतीची आवश्यकता वाटू लागली. ते बारगीर, मनसबदार, सरदार बाळगू लागले. फौजेच्या खर्चाकरता त्यांना वतने तोडून मिळत. या व्यवस्थेतून त्या त्या भागातील शिरजोर पुंड यांच्याकडे आपोआपच वतनदारी चालत आली.

 स्वराज्याच्या निर्मितीत या वतनदारांचा प्रश्न अतिशय नाजूक होता. त्यांच्या मदतीने परगण्यांची सुरक्षितता ठेवणे. शेती पिकविणे हे तर करून घ्यायचे पण त्याचबरोबर वतनदार रयतेवर जो जुलूम करीत त्या जुलूमातून रयतेची मुक्तता करून तिचा प्रत्यक्ष संबंध स्वराज्याशी जोडायचा होता. ही अतिशय अवघड, नाजूक कामगिरी शिवाजीराजाने फार कौशल्याने करून दाखविली.

 त्याने सर्वप्रथम कूळ, वतने अनामत करून त्यांना नगदी उत्पन्न त्या- त्या गावची परिस्थिती पाहून बांधून दिले. स्वराज्यातील वतनदारांनी बुरुजाचा वाडा बांधून किंवा कोट बांधून किल्ल्यात राहू नये, घर बांधून राहावे असा प्रथम नियम केला. वतनदारांचे कोट पाडून त्यांत स्वराज्याची ठाणी वसवली. रयतेवर जुलूम केल्यास हातपाय तोडण्यापासून प्राणदंडापर्यंत उग्र शिक्षा ठोठावल्या. सुभेदार, मामलेदार, कमाविसदार, हवालदार, मुजूमदार, तरफदार यांसारखे पगारी अधिकारी, सरकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आणि रयतेचा संबंध सरळ स्वराज्याशी हळूहळू जोडला. मात्र हे करीत असताना वतनदारांचे पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेले जमीन मालकिचे हक्क, प्रतिष्ठा, मानसन्मान

यांना जराही धक्का लागू दिला नाही. वतनदारी नष्ट करताना महाराजांनी प्रसंगी जी कठोरता दाखविली त्याप्रमाणे मायेची कुंकर घालून, स्वराज्याचे महत्त्व पटवून देऊन स्वाभिमानाला आणि शौर्याला आवाहन करून काही वतनदारांना राज्यकारभारात गुंफून घेतले. जेधे, बांदल, पासलकर या वतनदारांनी स्वराज्य उभारणीसाठी केलेली कामगिरी अतिशय बहुमोल आहे. महसुलाची वसुली आपल्या सरकारी अधिकाऱ्यामार्फत करून स्वराज्याचा खजिना समृद्ध करीत असतानाच वतनदारी मोडून काढण्याचे राजांचे कसब अनन्यसाधारण होय. हे सर्व करीत असतानाच राजा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संबंध जोडत होता. ही त्या काळात अगदी जगावेगळी घटना. शेतकऱ्यांच्या शेकडो वर्षाच्या लुटीचा कालखंड संपत होता. शेतकऱ्यांच्या नव्या राज्याची स्थापना हळूहळू होत होती.

 शिवाजीराजाच्या जीवनातील अनेक प्रसंगावरून असे दाखविता येईल की, तो जनसामान्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा होता. व्यक्तिगत मानसन्मानाचा प्रश्न कधी प्रतिष्ठेचा होऊ न देता प्रसंगी शेतकऱ्यांच्या हिताचे व शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी शिवाजीराजाने माघारसुद्धा घेतली आहे. स्वराज्यात घुसून कोणालाही रयतेस उपद्रव देता येऊ नये याची काळजी त्यांनी क्षणोक्षणी घेतली. इ. स. १६४८ ते १६६६ हा शिवाजी राजाच्या एतद्देशियांच्या राज्याचा परीक्षेचा कठीण काळ होता. १६६८ मध्ये विजापूरकरांचे पहिले आक्रमण झाले त्यावेळी राजाचे सैन्य ते काय? जहागिरीच्या संरक्षणाचे काम करणारे मर्यादित सैन्य आणि कालपर्यंत ज्यांनी किंवा ज्यांच्या बापांनी हाती नांगरच धरला होता आणि आज तलवारी घेतल्या होत्या असे सवंगडी. तरीसुद्धा त्यांनी विजापूरकरांच्या पहिल्या आक्रमणात शत्रूसैन्याला आपल्या रयतेच्या मुलुखात घुसू दिले नाही. त्यावेळच्या स्वराज्याच्या सीमेवरच्या पुरंदर गडाखाली बाजी पासलकर वगळता कोणीही वतनदार म्हणजे वतनदारच्या पदरीचे सैन्य महाराजाबरोबर नव्हते. कान्होजी जेधे त्यावेळी शहाजीराजांबरोबर कर्नाटकातच होते. केवळ यावेळी मावळे शेतकरीधारकरी पोरं त्या युद्धात लढली, विजयी झाली.

 एक नवा जोम मावळी मुलूखात पसरला. आपली आपण शेतीभाती तर करू शकतोच, शेतीच्या संरक्षणाची व्यवस्था तर करू शकतोच पण त्याबरोबर बादशाही सैन्याला पराभूत करू शकतो हे रयतेतून उभ्या राहिलेल्या धारकऱ्यांना आणि त्याचबरोबर रयतेला कळून आले.

 १६५६ पर्यंतच्या काळात परत रयतेला बटिक समजणाऱ्या चंद्रराव मोरे आणि संभाजी मोहिते यांना याच सैन्याने नेस्तनाबूत केल आणि दुसरीकडे विस्तारलेल्या

राज्यात दादोजी कोंडदेवाने घालून दिलेली व्यवस्था लावणे, कोंढवा, शिवापूर येथील धरणे बांधणे अशीही कामे चालू होती.

 १६५६ चे अफझलखानाचे आक्रमण, सिद्दी जोहार आणि शाहिस्तेखानाबरोबरची लढाई, मिर्झा राजाचे आक्रमण हा खरे तर रयतेचे अतोनात हाल होण्याचा काळ. कायमच्या लष्करी हालचालीमुळे शिवाजीराजाला रयतेच्या कामात स्वत:लक्ष घालण्याला वेळ मिळालेलाच दिसत नाही.पण स्वत:च्या राज्याचा सुखद अनुभव घेतलेली प्रजा या सर्व काळात स्वराज्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली. शिवाजीराजाच्या बाजूने लढायलाच काय, मरायची खात्री असताना बलिदानालाही लोक उभे राहिले. अफझलखानाच्या वेळी वतनावर पाणी सोडायची जेध्यांनी तयारी दाखविली. काही खोपड्यांसारखे अपवाद वगळता मावळातील देशमुख उभे राहिले. या राज्यात एक शिक्का दरबारातून उठवून आणून रयतेला लुबाडायची सोय नाही हे माहीत असूनही देशमुख मंडळी राजाच्या बाजूने उभी राहिली. यातीलच काही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील धारकरी परक्या मुलूखात, कोल्हापूर जिल्ह्यातील अंधाऱ्या राक्षसी पावसात, जळवांचा आणि रानगव्यांचा त्रास असणाऱ्या परिसरात घोडखिंडीत स्वत: मरण्याची खात्री असताना लढायला उभे राहिले, मेले. नवजात स्वराज्याचा नाश होऊ नये म्हणून; शेतकऱ्यांचा राजा जिवंत राहावा म्हणून.

 अफझलखानाची स्वारी ही अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. एकतर प्रथमच प्रचंड मोठी बावीस हजारांची फौज चालून येणार होती. अफझलसारखा सेनापती नेमला गेला होता. तो सामान्य सेनापती नव्हता. दिल्लीचा राजपुत्र औरंगजेबाची विजापूरकरांवरची स्वारी त्याने रोखली होती. औरंगजेबाला कैद करण्याइतकी परिस्थिती निर्माण केली होती त्यामुळे अफझलखान चालून येणे हीच मुळी स्वराज्याच्या वाढत्या सामर्थ्याची पावती होती. अफझलखानाची जहागीर सुपीक अशा वाई प्रदेशाची. वाई प्रदेशांत शेतीभाती नीट चालावी आणि वसूल व्यवस्थित गोळा होऊन खानाकडे पोचता व्हावा याची जो काळजी घ्यायचा. या जहागिरीच्या उत्तरेलाच जेधे-बांदल मंडळींचा-राजांच्या अंगद हनुमानाचा प्रदेश. वाई प्रातांच्या पश्चिमेला जावळी, तीही शिवाजीराजाने काबीज केलेली होती. वाई प्रांत आज ना उद्या राजा घेणार ही शक्यता होतीच. खानाला वाई प्रांत हातचा जाऊ द्यावयाचा नसावाच. त्यात भोसल्याबद्दल या खानाला द्वेशबुद्धी होती आणि जावळीवर त्याचा पूर्वीपासूनच डोळा होता. राजानेही हे ओळखले होते. शिवाजीराजा स्वत: सिंहगड, राजगड परिसरात राहता तर बावीस हजार फौजेचा रगाडा स्वराज्याच्या रयतेत

घुसणार हेही स्पष्टच होते. पागा आणि त्यातले घोडे जगवायचे म्हणजे धान्य-धुन्य दाणा-वैरण दूध-दुभते खाण्यासाठी गाई-बैल लागणार आणि ती शेतकऱ्यांकडूनच लुटली जाणार हे स्पष्ट दिसत होते. शिवाजीराजा राजगड सोडून प्रतापगडावर तळ देऊन राहिला. खानाने तुळजाभवानी तोड, पंढरपूरवर चालून जा असे प्रकार केले. स्वत:च्या सैन्यात निदान आठदहा मोठे मराठा सरदार असतानाही केले. शिवाजीराजा चिडून डोंगरातून मैदानात यावा म्हणून सर्व हिकमती झाल्या. राजाने संयम राखला. अफझलखानाला सैन्याचा रगाडा स्वत:च्याच जहागिरीतून, वाई प्रांतातून प्रतापगडच्या दिशेने न्यावा लागला.

 रयतेने शत्रूला मदत केल्यास रयतेचे हाल करणे हे सुलतानी राज्यात होतेच. पुढे राजाने सिधुदुर्ग बसवायला घेतला तेव्हा भूमीपूजनाचे मंत्र सांगायला येणारा ब्राह्मण सुरूवातीला येईना. तो म्हणाला, आज मंत्र सांगितले आणि उद्या या प्रांती बादशहाचे सुभेदार आले तर शिवाजीला याच बामणानी कील्ला बांधायला मंत्र सांगून मदत केली असे म्हणून पकडतील, मारतील, हाल करतील. ही बादशही रीत होती.

 अशा प्रकारचा रयतेवर सूड उगवला जाण्याचा प्रसंग राजाने टाळला. अफझल- सैन्याच्या रसदीसाठी स्वराज्याला तोशीस झाली नाही. तोशीस पडली असेल तर अफझलच्याच वाई प्रांताच्या रयतेला. कदाचित त्यांनी शिव्याशाप घातले असतील आणि नंतर खानाला मारल्यावर राजाने वाई प्रांत हस्तगत केल्यावर तिकडच्या शेतकऱ्यांनी शिवाजीराजाचे स्वागतच केले असेल.

 दिल्लीश्वर औरंगजेबाचा पराभव करणाऱ्या अफझलखानाचा वध केल्यानंतर साहजिकच राजाला अखिल भारतीय महत्त्व प्राप्त झाले. त्या काळीही देशातल्या कानाकोपऱ्यात अशा बातम्या जात होत्याच. शाहिस्तेखान महाराष्ट्रातून अपमानित होऊन आसाम-बंगालच्या सुभेदारीवर गेला तेव्हा तेथील स्थानिक राजाने "शाहिस्तेखान म्हणजे शिवाजीने ज्याची बोटे तोडली तो तूच काय" असे त्याला विचारल्याचा उल्लेख-आसामी बखरीत-बुरंजीत आहे. त्यामुळे अफझलवधानंतर दिल्लीश्वरांची स्वारी महाराष्ट्रावर येणे अटळ होते. ती वेळ साधून आली. राजा सिद्दी जौहरच्या पन्हाळा वेढ्यात अडकला असताना आली. बरोबर जवळजवळ एक लाखाचा फौजफाटा घेऊन आली. ही फौज मार्च १६६० ते एप्रिल १६६३ एवढा प्रदीर्घ काळ स्वराज्यात पुणे प्रांतात होती. हा सर्व काळ आणि पुढे जयसिंग-दिलेरखान स्वारीचा काळ हा रयतेने राजासाठी जे-जे सोसले त्याचा साक्षी आहे.

 स्वराज्यात घुसताच त्याने सुपे काबीज करून जाधवराव या सरदाराला तेथे ठेवले आणि स्वत: पुण्याला गेला. जाधवरावावर जबाबदारी होती ती खानाने

पुण्यात टाकलेल्या प्रचंड तळाला धान्यधुन्य, दाणा वैरण आणि गाई गुरे पुरवण्याची. राजाच्या रयतेवर सैन्याचा रगाडा सुरू झाला पण रयत खचलेली दिसत नाही जागोजाग कोणत्याही प्रमुख सेनानायकाच्या आज्ञेविना आणि अनुपस्थितीत खानच्या सैन्यावर गनिमी हल्ले झाले. गनिमी काव्याला अनुकूल असलेला समाज-सर्वसामान्य रयत जमेल तेवढी लढू लागली. जमेल तेव्हा असहकारही रयतेने खानाविरुद्ध पुकारलेला दिसतो. खान पुण्यात पोहोचेपर्यंत त्याला तीनचार ठिकाणी मराठ्यांच्या हल्ल्याची चुणूक अनुभवावी लागली. तर पुण्याला पोहोचताच बातमी आली की पुण्याच्या उत्तरेच्या भागातील सर्व धान्याचे साठे, वैरण लोकांनी जाळून टाकली आहे. राजावर चालून येणाऱ्या सैन्याचे आमचे धान्यधुन्य लुटून नेण्यापेक्षा आम्हीच ते जाळून टाकू अशी भावना लोकांनी दाखविली. एकिकडे "लोकयुद्धाची” चुणूक मावळे मोगलांना दाखवत होते तर दुसरीकडे राजाच्या आजोळचा माणूस जाधवराव सुपे कऱ्हे पठारातील शेतकऱ्यांना लुटून खानाच्या छावणीला रसद पाठवत होता.
 यातच एक चाकणच्या परिसरात घडलेला छोटा प्रसंग आहे. शाहिस्तखानाने चाकणाचा किल्ला काबीज करायचे ठरविले. खानाचे सैन्य चाकणला पोहोचण्याच्या आतच चाकण-चौऱ्याऐंशीतील शेतकरी जमेल तेवढे धान्य-धुन्य घेऊन उरले सुरले जाळून खाक करून निघून गेले.

 खरोखर कसा घेतला असेल हा निर्णय त्यांनी? एकतर खान चालून येणार ही बातमी चाकण परिसरात आधीच पोहोचली असली पाहिजे. त्यात राजा पन्हाळ्याला अडकला आहे. सैन्य कोठे आहे माहीत नाही. इथे असलेले सैन्य रयतेचे रक्षण करायला पुरेसे नाही हे दिसत असेल, कदाचित चाकणच्या किल्लेदाराने फिरंगोजी नरसाळ्याने सांगितलेही असेल. कदाचित गावोगावची मंडळी घाईघाईने आळंदीसारख्या ठिकाणी एकत्र जमली असतील. कुणीतरी कऱ्हेपठाराहून पूर्ण नागवला गेलेला एखादा शेतकरी नातेवाईकांकडे जाऊन राहावे म्हणून चाकणला आला असेल. त्याने कऱ्हेपठाराची दुर्दशा सर्वांना सांगितली असेल. कुणी जुन्या माणसानं कशाला या मोठ्या लोकांच्या भांडणात पडता, आपण गरीब हकनाक मरू, गोडीगुलाबीने घ्या. मागे शहाजीराजाच्या वेळी पार घरादारावर गाढवाचे नांगर फिरले त्याची आठवण दिली असेल.लगेच कुणीतरी दादोजीपंतामुळे शिवाजीराजामुळे सुखात शेतीभाती तरी करता यायला लागली, आता राजाची पाठ सोडायची नाही असे म्हटले असेल. कुणी आपला राजा देवाचा माणूस आहे, त्याशिवाय का अफझलखानासारखा राक्षस त्याने मारला असे म्हटले असेल. कुणी

लोणीचे काळभोर खानाला जाऊन मिळाल्याचा आणि घरदार वाचवल्याचे सांगितले असेल बरेच काही झाले असेल, पण एक नक्कि. सगळ्यांनी मिळून ठरवले असेल की लढायला येतंय, हत्यारं-पात्यारं आहेत त्यांनी किल्ल्यात जायचं, जमेल तेवढा दाणागोटा किल्यातल्या लढणाऱ्या लोकांना ठेवायचा, जमेल तेवढा घेऊन डोंगरात भीमाशंकराकडे निघून जायचं. पण मागं काही शिल्लक ठेवायचं नाही, जाळून टाकायचं. आपल्या मुलखावर, आपल्यावर चालून येणाऱ्याला मदत करायची नाही

 शिवाजीराजाने पन्हाळ्यातून निसटून परत आल्यावरही गनिमी काव्यानेच शाहिस्तेखानाशी लढा चालू ठेवला. अगदी मोजक्या माणसांनिशी प्रचंड फौजेने वेढलेल्या खानावरच घातलेला यशस्वी छापा अनेक गोष्टी सांगतो. मोगलांचा बेशिस्त अनागोंदी कारभार, त्याचा अचूक फायदा उठवून नियोजनबद्ध साहस करण्याचे राजाचे धैर्य, बरोबरीच्या माणसांची निष्ठा, बलिदानाची तयारी तर सांगतोच, पण खानाच्या मोठ्या डेऱ्यामध्ये काम करणाऱ्या पुणे प्रांतातल्या सामान्य माणसांची सहानुभूती, मदत कदाचित नियोजनातील साहाय्य याही गोष्टी सांगतो.

 शाहिस्तेखानाच्या आक्रमणाच्या धामधुमीतही शिवाजीराजास गोरगरीब शेतकऱ्यांची, रयतेची चिंता किती होती हे एका पत्रावरून समजते. मोगल सैनिक जेध्यांच्या भागात हिरडस मावळात घुसून जाळपोळ, लुटालूट करतील अशी शक्यता दिसताच राजाने हे पत्र बाजी सर्जेराव जेध्यांच्या लिहिलेले आहे. शाहिस्तेखानाच्या छाप्याच्या सुमारे सहा महिने आधी हे पत्र लिहिले आहे. पत्रात शिवाजीराजा लिहिता, "पत्र मिळताच गावागावात ताकिद करून लेकरेबाळे तमाम रयत घाटाखाली शत्रूचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी पाठवावी. हयगय करू नये. असे न केल्यास मोगलांनी माणसे धरुन नेल्यास, त्रास दिल्यास त्याचे पाप तुमच्या डोक्यावर बसेल म्हणून रात्रीचा दिवस करून माणसे हलवा. तुम्ही आपल्या माणसांसह हुशारीत राहा. शेतीवाडीचे राखण करायला जी माणसं राहतील त्यांनाही हुशार राहायला सांगा, डोंगरावर अवघड जागी आसरा घेऊन रहा. गनिम दुरून नजरेस येताच त्याच्या वाटा चुकवून पळून जा असे सांगा. तुम्ही तुमच्या जागी तयारीत राहा."

 शेतकऱ्यांची शेतीची अशी ससेहोलपट होत असतानाच याच शेतकऱ्याच्या घरची माणसे महाराजांच्या सैन्यात असल्याने व सैन्याची मुलूखगिरी चालू असल्याने शेतकऱ्यांचे घरी तगून राहता येईल एवढे धान्य नक्कद्दच पोहोचत असावे.

 मिर्झाराजे जयसिंगाच्या आक्रमणात स्वराज्याच्या रयतेचे असेच हाल झाले.

मिर्झा राजाच्या सैन्याने जुन्नर, जुन्नरखालचे कोकण या भागात धुमाकूळ घालणे, राजगड म्हणजे राजाच्या राजधानीच्या परिसरातील ५० खेडी आणि त्यांची शेती-भाती उद्ध्वस्त करणे, शिवापूर सिंहगड परिसरातील खेड्यात जाळपोळ लुटलूट, कोरीगडाच्या लोहगडाच्या आसपासची लागवड जाळून टाकणे, गुरेढोरे पळविणे असे अनेक पराक्रम केले. १६६५ च्या एप्रिल-मे या दोन महिन्यात स्वराज्याची रयत नागवण्याचे हे उपद्व्याप चालू होते. पुरंदर किल्ल्याला वेढा चालू होता.

 केवळ दीड कील्ला मोगलांनी घेतलेला होता. लष्करीदृष्ट्या जास्त नुकसान झालेले नव्हते. लोक लढायला तयार होते, पण नागवल्या जाणाऱ्या प्रजेसाठी राजाने जून महिन्यात तह केला स्वत: शरण आले, पण रयतेची छळवणूक थांबवली. जून महिन्यात हा पुरंदरचा तह झाला. त्यामुळे दोन महिने नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना परत पावसाळ्यात शेतीची लागवड करता आली असावी. गावखेडी वसवता आली असावीत. कोणताही शक्तद्दचा मुद्दा उपस्थित न करता अजून खूप कील्ले स्वत:च्या ताब्यात असतानाही आपल्यासाठी हाल सोसून उभे राहणाऱ्या शेतकऱ्यांची, त्यांच्या मुला माणसांची, गावच्या कारुनारुची वाताहत होते हे पाहून राजाने अवघ्या तीन महिन्यात शरणागती पत्करली. प्रजा तीन वर्षांचे हाल सहन करू शकते हे तिने आधीच्या शाहिस्तेखानाच्या आक्रमणात दाखवून दिले होते. पण राजाला प्रजेच्या या वाताहतीची कल्पना सहन होईना, त्याने शरणगती पत्करली.

 स्वराज्यात घुसून धुमाकूळ घालण्यात यश मिळाले ते मिर्झा राजे जससिंग यालाच. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाची फौज स्वराज्याच्या हदयात तळ ठोकून बसली होती. या स्वराज्याची पूर्ण सफाई करूनच परत जायचे असा संकल्प सोडून मिर्झाराजे आणि त्यांच्या मदतीला शिवाजीराजाबद्दल अत्यंत द्वेष असलेला दिलेरखान हे दोन्ही सरदार आले होते. मिर्झाराजे जयसिंगाने याच काळात सैन्यसत्तेचे सर्व अधिकार औरंगजेबाकडून आपणास मिळविले होते. औरंगजेबाने हे अधिकार देताना अतिशय महत्त्वपूर्ण वाक्य वापरले, "तुमच्या मुत्सद्देगिरीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. शिवाजीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी तुम्हाला जे जे योग्य वाटेल ते ते सर्व करा."<

 ३१ मार्च १६६५ रोजी दिलेरखानने पुरंदर चहू बाजूंनी वेढला. मिर्झाराजे जयसिंग हे अतिशय हुशार सेनापती होते. पुरंदरची एकंदर भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पुरंदरच्या समोर असलेला वज्रगड ताब्यात घेतल्याशिवाय पुरंदरवर तोफा डागता येणार नाहीत हे मिर्झाराजा जससिंग याने बरोबर ताडले. जयसिंग १ एप्रिल रोजी पुरंदरच्या पायथ्याशी आला आणि तेथेच तळ ठोकून बसला. १२ एप्रिल

१६६५ रोजी वज्जगड पडला. मोगलांच्या तोफा आता वज्जगडावरून पुरंदरवर आग ओकू लागल्या. ही घनघोर लढाई ३० मे पर्यंत म्हणजे तब्बल ४९ दिवस सुरू होती. पुरंदरच्या बुरुजाच्या उंचीएवढे दमदमे उभे करण्याचे काम सुरू होते. हे काम अगदी सफेद बुरुजाच्या समोर सुरू होते. अर्थातच हा दमदमा उभा न करू देण्याची कोशीस पुरंदरावरील सैन्य करीत होते. प्रथम ३० मे १६६५ रोजी एक घनघोर लढाई झाली. मराठ्यांच्या माऱ्यामुळे मोगलांचे अतोनात नुकसान झाले. मिर्झाराजाच्या भूपतसिंह नावाच्या सरदाराबरोबरच असंख्य सैनिक ठार झाले. दिलेरखानाच्या हाताखालील एक सरदारही कामी आला. परंतु पुरंदरावरील सैन्याचे दुर्दैव आडवे आले आणि सफेद बुरुजावरील दारूचा स्फोट होऊन अपघात झाला आणि सफेद बुरुज पडला (२ जून १६६५).

 शिवाजीराजाची नस कोणी ओळखली असेल तर फक्त मिर्झाराजा जयसिंगानेच. अफझलखान, शाइस्तेखान, दक्षिणेचा सुभेदार असताना औरंगजेब, विजापूरचा आदिलशहा, रणतुल्लाखान असे किती किती शत्रू राजाने अंगावर घेतले. अद्भुत विजय मिळवले, पराभव पचवले. परंतु यांच्यातील एकालाही जो शिवाजी समजला नाही तो मिर्झाराजा जयसिंगांला कळला. जयसिंग अतिशय हुशार, शूर आणि मुत्सद्दी सेनापती होता. ३१ मार्च १६६५ रोजी पुरंदरला वेढा घातल्यानंतर तब्बल ७० दिवसांनंतरही पुरंदरच्या तटाच्या वाळूचा कणसुद्धा बाहेर पडू शकत नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याचवेळी राजगडावर बसलेल्या राजाला पुरंदरावर हातघाईची लढाई सुरू असताना विशेष चिंता वाटत नाही याची जाणीवही जयसिंगाला झाली. त्याच्या लक्षात आले की राजाचा जीव किल्ल्याच्या बुरुजामध्ये किंवा राजगडच्या राजधानीत अडकलेला नाही. गड, किल्ले जिंकून राजा शरण येणार नाही, त्याचे प्राण आहेत ते रयतेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये. जोपर्यंत ही रयत त्यांच्या राजाच्या बाजूने आहे तोपर्यंत किल्ले बुरुजावर मराठ्यांच्या सैन्याचा पराभव करता येऊ शकेल, पण स्वराज्याचा बीमोड करता येऊ शकणार नाही, याबद्दल जयसिंगाची खातरी पटली. त्याने एका नव्या रणनीतीचा अवलंब सुरू केला.

 मोगलांच्या फौजांना जुन्नर व तळकोकणात धुमाकूळ घालण्याचे आदेश देण्यात आले. २७ एप्रिल रोजी दाऊदखान रोहिडे किल्ल्याजवळ पोहोचला. मोगली धुमाकुळाला चहूबाजूंनी ऊत आला. रोहिडे ते राजगड या परिसरातील किमान ५० खेडी मोगलांनी जाळून उद्ध्वस्त करून टाकली. उभ्या पिकाची नासाडी केली. चाऱ्याच्या गंजी पेटविल्या. या भागातील शेतकरी डोंगरातील दऱ्याखोऱ्याच्या

आधाराने चार खेड्यात गोळा झाले. मोगलांच्या एका तुकडीबरोबर त्यांच्या संघर्ष झाला. जबर झुंज झाली. मोगलांच्या मदतीला दाऊदखानाची कुमक आली. राजे रायसिंह, अचलसिंह कछवाह यांच्या फौजा मोगलांच्या मदतीला आल्या. चार खेड्यांत गोळा झालेले शेतकरी, मराठे जीव वाचवून डोंगरात पळून गेले. मोगलांनी तेथील चारही खेडी जाळून खाक केली. गरीब प्रजा, गुरेढोरे, मालमत्ता मोगलांच्या हाती लागली. अनेक माणसे कैद झाली. २८ एप्रिलला मोगली सैन्याने याच भागात ठाण मांडले. ३० एप्रिलला राजगडच्या रोखाने हे सैन्य निघाले, पायथ्याशी पोहोचले. राजगडावरील तुफानी माऱ्यासमोर दाऊदखानाच्या प्रचंड फौजेचा टिकाव लागला नाही. दाऊदखान माघारी वळला. गुंजणखोऱ्यामार्गे तो शिवापूरला आला व तेथून कोंढाण्याच्या दिशेने नासधूस करीत जाऊ लागला. (२ मे १६६५). मिर्झाराजेला हे वृत्त कळताच त्याने दाऊदखान व कुतुबुद्दीन यांना लोहगडाकडे जाण्यास आज्ञा केली. मोगली पथक लोहगडच्या परिसरात घुसले. अकस्मात मराठे त्यांच्यावर तुटून पडले. या धुमश्चक्रीत मराठ्यांची मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली. मोगलांच्या फौजांनी लोहगडच्या पायथ्याची सर्व लागवड जाळून टाकली. गरीब प्रजा, गुरेढोरे कैद झाली. दुसऱ्या दिवशी लोहगड, विजापूर, तिकोणा, तुंग या किल्ल्यांच्या डोंगरालगतची खेडी जाळून नष्ट करण्यात आली. या सर्व लढाईचा परिणाम म्हणजे कुतुबुद्दीनखानाच्या हातात ३०० स्त्री-पुरुष व ३००० गुरे-ढोरे सापडली. या सर्व लढाईत जागोजागी मराठे आणि मोगल यांचा संघर्ष होत होता. स्वराज्याचे सैन्य डोंगर किल्ल्यावर सुरक्षित होते, पण प्रजानन मोगलांकडून कैद होत होते. त्यांचा अनन्वित छळ सुरू होता. कैद केलेल्यांना नगर -परांड्यांच्या किल्ल्यात ठेवले जाऊ लागले. राजाची रयतेकडूनची ही अशी नाकेबंदी मिर्झाराजे जयसिंगाने अतिशय कौशल्यपूर्ण रणनीती व दबावतंत्राचा वापर करून केली होती.

 या सर्वांना परिणाम म्हणून स्वराज्याची खरोखरी कोंडी झाली.

 मिर्झाराजेच्या या रणनीतीमुळे निराश्रित झालेल्या रयतेच्या, त्यांच्या अनन्वित छळाच्या, मोगल फौजांकडून झालेल्या अत्याचाराच्या लुटीच्या खबरी राजापर्यंत तातडीने पोहोचत ज्या रयतेसाठी आपण यास्वारीची संकल्पना केली, ज्या प्रजाजनांच्या कल्याणासाठी आपण या स्वराज्याची मुहूर्तमेढ केली त्याचीच मोगलांच्या फौजांनी केलेली दैना पाहून पुरंदरच्या खबरीनी विचलित न झालेला राजा चिंतेत पडला. स्वराज्याचे गड कील्ले खूप होते. एका गडावरून दुसऱ्या गडावर मोगलांशी संघर्ष करायचा म्हटले तरी अनेक वर्षे निकराची झुंज देता आली असती. जयसिंगाचे त्यावेळचे वय लक्षात घेता त्याच्या हयातीत तरी शिवाजीराजाचा पूर्ण

पराभव त्याला करता आला नसता. (मिर्झराजेचा मृत्यू २८ ऑगस्ट १६६७). या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर राजा कायम झुंजत राहू शकला असता. पण राजाचा जीव किल्ल्यांच्या भिंतीमध्ये, बुरुजामध्ये अडकला नव्हता. किल्ल्यांच्या संख्येत नाही तर किल्ल्यांच्या पायथ्याशी राहून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुखी संसारत त्याचे सुख सामावलेले होते. त्यामुळेच अखेरीस १२ जून १६६५ रोजी राजाने शरणागती पत्करली. अहंकार, प्रतिष्ठा ही गौण ठरली व रयतेची सुरक्षितता ही श्रेष्ठ ठरली. राजाच्या शरणागतीचा एवढाच तर्कशुद्ध अर्थ लागू शकतो. ३१ मार्च ते १२ जून हा ७३ दिवसांचा काळ मिर्झाराजेला गड जिंकण्यासाठी लागला. यावरून अगदी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा राजाचे सैन्य चिवटपणे झुंज देत होते हे कळते. रणभूमीतील परिस्थिती पाहता शरणागतीची आवश्यकता नव्हती. १२ जून ही तारीखही महत्वाची आहे. हे आगोठीचे दिवस. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पुढे शेतीच्या पेरणीचे दिवस येतात. धुमश्चक्री थांबली नाही आणि शेतकऱ्यांची सबंध शेती जर तशीच पडून राहिली तर थोरल्या दुष्काळाप्रमाणे (सन.१६२८-३०) रयतेची अन्नानदशा होईल ही भीती आ वासून उभी राहिली असणार. नंतरच्या पुरंदरच्या तहानंतर त्या परिसरात शेतकरी आपल्या कामास लागले व शांतता निर्माण झाली. म्हणजे राजाचा हेतू साध्य झाला. त्याला शेती व शेतकरी यांच्याबद्दल वाटणाऱ्या आस्थेचे हे अत्यंत जिवंत आणि बोलके उदाहरण आहे.

 अफझलस्वारी ते पुरंदरचा तह या काळाचा लष्करी अर्थ देशातील इतर सत्तांना एक नवे राज्य उभे रहते आहे याची जाणीव होणे आणि ते नेस्तनाबूत करण्याचा त्यांनी प्रयत्न करणे. तर शेतकरी रयतेच्या दृष्टीने अर्थ असा की, त्यांना हवे असलेले राजकीय स्थित्यंतर घडून येणे. हा बदल प्रजेला हवासा वाटत होता हे प्रजेने आणि सामान्य माणसातून उभ्या राहिलेल्या स्वराज्याच्या शिपायांनी दाखवून दिले. शाहिस्तेखानाविरुद्धच्या गनिमी युद्धात दाखवून दिले. शिवाजीराजा आग्ऱ्याला गेला असता तिथे अडकून पडला असताना राज्य सुरक्षित राखून दाखवून दिले.

 हे रणांगणावर घडलेले उदाहरण म्हणजे काही अखेरचा पुरावा नाही. पण युद्धप्रसंग सोडून अगदी रोजमुऱ्याच्या जीवनात राजा शेतीची व शेतकऱ्यांची जातीने काळजी घेत होता.

 या संदर्भात राजाने प्रभावळीचे रामाजी अनंत सुभेदार यांना लिहिलेले पत्र आताच्या तथाकथित राज्यकर्त्याच्यासुद्धा डोळ्यांत अंजन घालेल इतके स्पष्ट आणि स्वच्छ आहे.

 "साहेब मेहरबान होऊन सुभात फर्माविला आहे. ऐसियास चोरी न करावी,
इमाने इतबारे साहेब काम करावे, ऐसी तू क्रियाच केलीच आहेस. तेणेप्रमाणे एक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास व दुरुस वर्तणे. या उपरि कमाविस कारभारास बरे दरतूरोज लावणी संचणी उगवणी जैसी जैसी जे जे करीत जाणे. हर भातेने साहेबाचा वतु (अधिक)... होये ते करीत जाणे. मुलकात बटाईचा तह चालला आहे परंतु रयतीवर जाल (न पडता-शब्द सुटले) रयेतीचा वाटा रयेतीस पावे आणि राजभाग आपणास येई ते करणे. रयेतीवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुजवर राजी नाहीत ऐसे बरे समजणे. दुसरी गोष्टी की, रयेतीपासून ऐन जिनसाचे नख्त घ्यावे येसा एकंदर हुकूम नाही. सर्वथा ऐन जिनसाचे नख्त घेत घेत नव जाणे ऐन जिनसाचे ऐन जिनसच उसूल घेऊन जमा करीत जाणे आणि, मग वेलचे वेलेस विकित जाणे, की ज्या ज्या हुनेरेने माहाग विकेल आणि विकरा यैसा करावा की, कोण्हे वेलेस कोण जिनसच विकावा हे हंगामी तो जिनस विकावा. जिनस तरी पडोन जाया नव्हे आणि विकरा तरी महाग ऐसे हुनेरेने नारळ खोबरे सुपारी मिरे विकित जाणे. महाग धारणे जरी दाहा बाजार ऐन जिनस विकले तर तो फायेदा जाहलियाचा मजरा तुझाच आहे येसे समजणे. त्या उपरि रयेतीस तवाना करावे आणि कीर्द करवावी हे गोष्टीस इलाज साहेबी तूज येसा फर्माविला आहे की, कष्ट करून गावाचा गाव फिरावे. ज्या गावात जावे तेथील कुलबी किती आहेती ते गोळा करावे. त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणुसबल आसेली त्या माफद्दक त्यापासी बैल दाणे सच आसीला तर बरेच जाले. त्याचा तो कीर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर, पोटास दाणे नाही, त्यावीण तो आडोन निकामी झाला असेल, तरी त्या रोख पैके हाती घेऊन दोचौ बैलाचे पैके द्यावे, बैल घेवावे व पोटास खंडि दोन खंडि दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल तितके करवावे. पेस्तर त्यापासून बैलाचे व गल्याचे पैके वाढी दिडी न करता मुदलच उसनेच हळूहळू याचे तबानगी माफद्दक घेत उसूल घ्यावा. जोवरी त्याला तवानगी येई तोवरी वागवावे. या कलमास जरी दोन लाख लारी पावतो खर्च करिसील आणि कुणबिया कुनब्याची खबर घेऊन त्याला तवानगी येतो करून कीर्द करिसील आणि पडजमीन लाऊन दस्त जागती करून देसील, तरी साहेब कबूल असतील. तसेच कुलबी तरी आहे पुढे कष्ट करावया उमेद धरतो आणि मागील बाकिचे जलित त्यावरी केले आहे ते त्यापासून घ्यावया मवसर तरी काही नाही. ते बाकिचे खडवे तो कुलबी मोडोन निकाम जाला या उपरी जाऊन पाहातो. येसी जे बाकि रयतेतीवरी आसेल ते कुलाचे कुल माफ करावया खडवे तोकूब करून पेस्तर साहेबास समजावणे की, ये रवेसीने कीर्द करऊन साहेबाचा

फायेदा केला आहे आणि आमकि एक बाकि गैर उसकि मफलिस कुलास माफ केली, येसे समजावणे. साहेब ते माफद्दची सनद देतील जे बाकि नफर निसबत आसली ते हिसेबीच उसूल घेत जाणे बाकिदार माहाल न करणे . ये रवेसीने तुजला पदनसी येत तपसिले करून हा रोखा लिहून दिधला आसे. आकलेने व तजवजीने समजोन याप्रमाणे कारबार करीत जाणे की, तुझा कामगारपणाचा मजरा होये आणि साहेब तुजवरी मेहेरबान होत ते करणे..."

 या पत्रात शिवाजीराजाची शेतीबद्दलची दृष्टी फार स्पष्ट आणि स्वच्छपणे मांडलेली आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या सबंध इतिहासात शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेला शिवाजी राजा याच्याशिवाय दुसरा कोणताही राजा नव्हता. यासाठी वेगळा पुरावा देण्याची काही वेगळी आवश्यकता रहात नाही. रामाजी अनंत यांना पत्र लिहिताना राजाने काही गोष्टी अत्यंत स्वच्छपणे सांगितलेल्या आहेत. शेतीचे व्यवहार कसे असावेत? नियोजन कसे असावे? महत्त्वाचे काम काय? हे सांगताना राजा काय म्हणतो, "सरकारी अधिकाऱ्यांनी स्वत: जातीने गावोगाव दौरे करून तेथील कुणबी (शेतकरी) गोळा करावेत. त्यांच्या अडचणी स्वतः समजावून घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या कुवतीनुसार त्याला जमीन द्यावी. त्याची कुवत असेल तर त्यास बैल, नांगर आणि उदरनिर्वाहासाठी ज्याच्याकडे धान्य नाही अशांना रोख पैसे द्यावेत. बैल घेऊन द्यावेत. खंडी दोन खंडी धान्य उदरनिर्वाहासाठी द्या व शेतकऱ्यांच्या कुवतीनुसार त्याला शेती द्यावी.

 "अशा शेतकऱ्याला दिलेल्या कर्जाचे व्याज न आकारता फक्त मुद्दल हळूहळू त्याच्या कुवतीनुसार व परिस्थितीनुसार वसूल करून घ्यावे. यासाठी स्वराज्याच्या खजिन्यातून लाख दोन लाख लारीपर्यंत परस्पर खर्च करण्याची परवानगी सुभेदाराला मुक्तपणे देण्यात आली होती. एखादा शेतकरी शेती करण्याची उमेद बाळगून असेल पण त्याच्या दुर्दैवाने दुष्काळी परिस्थितीमुळे अस्मानी संकटामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे (सुलतानी संकटामुळे) जर तो कर्ज फेडू शकला नाही व त्याची अडचण खरी असल्याचे अधिकाऱ्याने राजाना पटवून दिले तर अशा शेतकऱ्याला मागील कर्जाची माफी दिली जाईल.

 ३५० वर्षांपूर्वी शिवाजी राजाला शेतकऱ्यांबद्दल जी स्वच्छ व स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली होती त्याचा लवलेश तरी आज क्षणोक्षणी शिवाजी राजाचे नाव घेणाऱ्या राज्यकर्त्याच्या वर्तणुकीत त येतो काय हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.

 महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात शेतकऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेणारा असा दुसरा दस्तऐवज सापडणे केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे. शेतकऱ्याच्या

जीवनातील दैनंदिन घडणाऱ्या घटनांचे इतक्या बारकाव्याने निरीक्षण केले व कृतीत उतरविले याचा अर्थ असा की शेतकऱ्याच्या जीवनाशी राजा किती समरस झाला होता हे या पत्रावरून फार चांगल्या प्रकारे ध्यानात येते.

 केवळ आपल्याच राज्यातील शेतकऱ्यांची राजा काळजी घेत होता असे नाही. तर परमुलुखात जात असतानाही शेतकऱ्यांच्या पिकाची तो अतिशय काटेकोरपणे काळजी घेत असे. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाकडे शिवाजी राजा निघाले असतांना आपल्या सैन्याला त्याने ताकिद दिली की, "एक काडी रयतेची घेऊ नये, आवश्यक त्या वस्तू बाजारातून विकत घ्याव्यात. कोणीही लुट करू नये. या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करावे." ऐतिहासिक दाखल्यावरून असे दिसून येते की, या आज्ञेचे उल्लंघन झाले तर राजाने शिरच्छेदाची शिक्षा करून जबर बसविली. परमुलुखात राहणाऱ्या शेतकऱ्यांची काळजी घेणारा शिवाजी राजा हा सबंध भारतवर्षाच्या इतिहासामध्ये एकमेव आहे.

 जसवंतराव पालवणकर यांची जहागिरी शिवाजीराजाने ताब्यात घेतली. राजाने या मुलखाची नीट व्यवस्था लावताना स्वाऱ्यांमुळे घाबरून त्या प्रांतातून पळून गेलेल्या प्रजेला परत बोलावले. सर्वांना विश्वासपूर्वक कौल दिला. पाहता पाहता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ब शूद्र, कासार, सोनार, न्हावी, तमासगीर, माळी, कुंभार, कारवार, कोष्टी, शिंपी, रंगारी, डोंबारी, तेली, परीट इत्यादी अठरा पगड जातीचे लोक पुन्हा नांदते केले आणि स्वराज्याच्या सुरक्षिततेच्या छायेखाली लोक नांदू लागले आणि दिवसेंदिवस होणारी भरभराट पाहून राजा आनंदीत झाला. याचा दाखला शिवभारतकार कवी परमानंद यांनी दिला आहे.

 शिवाजी राजे आपल्या सैनिकांना एका आज्ञापत्रात आदेश देताना म्हणतो, आपल्या वागणुकिने रयतेला त्रास होता कामा नये. या गोष्टीची कडक शब्दात राजा ताकिद ते देतो, तो येणेप्रमाणे:-

 "कसबे चिपळूणी साहेबी लष्कराची बिले केली आणि याउपरी घाटावरी कटक जावे ऐसा मान नाही. म्हणून एव्हा छावणीस रवाना केले. ऐसियास चिपळूणी कटकाचा मुक्काम होता याकरिता दाभोळच्या सुबेयांत पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता. तो कितेक खर्च होऊन गेला व चिपळून आसपास विलातीत लष्कराची तसवीस व गवताची व वरकड हरएक बाब लागली. त्याकरिता हाल काही उरला नाही. ऐसे असता वैशाखाचे वीस दिवस, उनाळा, हेही पागेस अधिक बैठी पडली. परंतु जरूर झाले, त्याकरिता कारकुनाकडून व गडोकडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास (माने)
ऐसा दाणा, रतीब गवत मागाल, असेल तोवरी धुंदी करून चाराल. नाहीसे जाले म्हणजे मग काही पडत्या पावसांत मिळणार नाही, उपासपडतील. घोडी मारायास लागील. म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व रयतेस तसवीस देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोणी कुणीब्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोणी भाजी, कोण्ही पाले ऐसे करू लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेहि जाऊ लागतील, कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुनकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही. ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची सारी बदमानी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावखलक हो बहुत यादी धरून वर्तणुक करणे, कोण्ही पागेस अगर मुलकात गावोगाव राहिले असाल त्यांनी रयतेस कडीचा आजार द्यावया गरज नाही. आपल्या राहिला जागाहून बाहीर पाय घालाया गरज नाही. साहेबी खजानांतून वाटणिया पदरी घातलिया आहेती. ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गुरेढोरे वागवीत असाल त्यास गवत हो अगर फाटे, भाजीपाले व वरकड विकावया येईल ते रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावे. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हाही कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे . ऐसे तजविजीने दाणा रतीब कारकून देत जातील तेणेप्रमाणेच घेत जाणे, की उपास न पडता राजेबरोज खायाला सापडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसे करणे. नसतीच कारकुनासी धसफस कराया. अगर अमकेच द्या तमकेक द्या ऐसे म्हणाया, धुंदी करून खासदारकोठीत, कोठारात शिरुन लुटाया गरज नाही व हाली उन्हाळ्याला आहे तईसे खलक पागेचे आहेत, खण धरून राहिले असतील व राहातील, कोण्ही आगट्या करीतील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील, कोण्ही तंबाकू ला आगी घेतील, गवत पडिले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनास न अणिता म्हणजे अविस्त्राव एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली म्हणजे सारे खण जळोन जातील. गवताच्या लहळ्यास कोणीकडून तरी विस्तो जाऊन पडला म्हणजे सारे गवत व लहळ्या आहेत तितक्या एके एक जाळी जातील. तेव्हा मग काही कुणबियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनास ताकिद करावी तैसी केली तऱ्ही काही खण कराया एक लाकूड मिळणार नाही, एक खण होणार नाही. हे तो अवघियाला कळते. या करणे, बरी ताकिद करून खाते असाल ते हमेशा फिरत जाऊन रंधने करिता आगट्या लाविता, अगर रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल. ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वांचेल

ते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचली. नाही तर मग घोडी बांधावी न लगेच. खायास घालावे, न लागे, पागाच, बुडाली. तुम्ही निसूर जालेत, ऐसे होईल. या कारणे तपशिले तुम्हास लिहिले असे. जितके खासे खासे जुमलेदार, हवालदार, कारकून आहा तितके हा रोख तपशिले ऐकणे. आण हुशार राहाणे. वरचेवरी, रोजचा रोज खबर घेऊन, ताकिद करून येणेप्रमाणे वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल ज्याचा गुन्हा होईल. बदनामी ज्यावर येईल. त्यात मराठियाची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा?..."

 "घोडी वाटेल तशी चारू नका, आता चारा संपवलात तर पावसाळ्यात मिळणार नाही. मग घोडी तुम्हीच मारली असे होईल. अशा परिस्थितीत लोक जातील कोणी शेतकऱ्याचे दाणे आणतील, कोणी भाकरी, कोणी गवत, कोणी जळण, कोणी भाजीपाला, असे जर तुम्ही वागू लागलात जे बिचारे शेतकरी कष्ट करून जीव सांभाळून राहिलेत ते जाऊ लागतील. कित्येक बिचारे उपाशी मरतील आणि त्यांना असे वाटले आपल्या मुलखात मुघल आला त्यापेक्षा तुम्ही जास्त त्रासदायक आहात. त्यांचा तळतळाट होईल तेव्हा रयतेची आणि घोड्यांची सारी बदनामी तुमच्या माथी येईल. हे तुम्ही जाणून असावे. घोडेस्वार असो अगदी पायदळ असो ही गोष्ट विसरता कामा नये."

 रयतेच्या रक्षणात शिवाजी राजा किती सावध होता याचे अतिशय बोलके उदाहरण या पत्रावरून दिसून येते.

 आग्ऱ्याहून परत आल्यानंतर कोणतीही मोहीम हाती न घेता शिवाजीराजाने स्वराज्याची व्यवस्था लावण्यात लक्ष घातले. या शांततेच्या काळात महसुलाच्या उत्पन्नाची साधने त्याने ठरविले आणि एकदंर सर्व परिस्थितीचा विचार करता राजाने शेतजमिनीच्या साऱ्याच्या वसुलीसाठी एक आदर्श पद्धत घालून दिली. शेतकऱ्यांची सारा आकारणी त्या काळी दोन प्रकारात केली जाई. नगदी आणि धान्य. सारा म्हणून धान्य रूपाने गोळा केलेले धान्य कोठ्यामध्ये साठवून अडचणीच्या दिवसात विक्रीला बाहेर काढले जाई. दुष्काळी परिस्थितीला तोंड देताना या धान्याचा उपयोग केला जात असे. शिवपूर्व काळात जमिनीची मोजणी करण्याची पद्धत नव्हती. नजरेने अंदाज करून वतनदार साऱ्याची रक्कम ठरवीत. स्वराज्य स्थापनेनंतर मात्र या कार्याला शिस्त लागली. उदा. अंजनवेल तालुका १६७६ पर्यत आदिलशहाकडे होता. जमिनीची मोजणी झाली नव्हती. केवळ नजरेने साऱ्याची रक्कम ठरविली होती. असा उल्लेख आढळतो. हा प्रांत १६७६ मध्ये शिवाजी राजा येताच लगेच जमिनीची मोजणी झाली व जमिनीची प्रतवारी ठरविण्यात आली.

जमिनीमापाचे प्रमाण हे हात आणि मूठ यावर होत असे.

 "काठी मोजणीने" जमीन मापली जाई. ५ हात ५ मुठी = १ काठी. १ काठी ८२ तसू. २०+२० काठ्या =१ बिघा. १२० बिघे =१ चावर. (शके १८३८ च्या भा. इ. सं. म. च्या अहवालात थोडे वेगळे कोष्टक दिलेले आढळते. ते असे-२० काठ्या लांब व १ काठी रुंद = १ पांड, २० पांड = १ बिघा. ६० बिघे =१ पाव. ४ पाव =१ चाहूर. १ चाहूर =६४ कुरगी. ८ नवटाक =१ चाहूर. यातील बिघ्यास आदिलशाही बिघा संबोधले जाई.)

 जमिनीच्या १२ प्रती केलेल्या आढळतात:

 १) अव्वल, २)दूम, ३) सीम, ४) चारसीम, ५) बावील. (खडकात) ६) खारवट (समुद्रकाठची), ७) रहु, ८) खारी (खाडीजवळची), ९) खुड्याळ किंवा खरियत (दगडाळ), १०) राजपाल (झुडपांची), ११) खुरवटे (व्दिदल झाडांची), १२) मनूत ( झाडांची मुळे असलेली व साफ न केलेली) नापीक व वरकस हेही प्रकार करण्यात आले. त्यास वजत म्हणून. जमिनीच्या प्रतवारीवरून सारा ठरविला गेला.

 जमिनीच्या प्रतवारीवरून तिची सारा आकारणी केली जाई. दर बिघ्याला अव्वल- १२ मण, दुय्यम १२ मण, सीम ८ मण, राजपाळ ८ मण, खारवट ७.५, बावल ६.५ मण, खुरी ६। मण, खुड्याळ ६। मण, रहु ५ मण, तुरवटे व मनूतही ५ मण. वजत व वरकस जमिनीवरील आकारणी बिघ्याऐवजी नांगराप्रमाणे केली जाई. १ नांगर = साधारणत: ६-७ बिघे. एवढ्या जमिनीला एक बिघा समजून आकार घेतला जाई. हा साराही नजरमान = ५ लोकांनी जमीन तपासून खडीच्या पिकावरून स्थळ नजरेस येईल. त्याप्रमाणे सारा वसुली ठरे. कोरडवाहू जमिनीला जिराईत तर ओलिताच्या जमिनीस बागाईत म्हणत. बागाईत जमिनीतही मोटस्थळ, पाटस्थळ, बागमळा व राई असे पोटविभाग पाडले जात.

 जमिनीची पाहणी करणारा अमीन, कारकून असे. मोजणी करणारा काटकर. त्यांच्या वतनदारांशी असलेला संबंध तुटला व त्याला सरकारी अधिकारी म्हणून पगार सरकारातून मिळू लागला. बिघे, चावर, सीमा ठरल्या. जमिनीची काटेकोर मोजणी झाली. प्रतवारी ठरली. मिराजदार, कूळ शेतकरी यांना सनदा दिल्या गेल्या. गाववार जमीन झाडा तयार केला जाऊ लागला. या कामी अण्णाजीपंत दत्तो सुरनीस (त्यावेळचे महसूलमंत्री) हे स्वत: जातीने तपासणी करीत. जमीन मोजणी. पीक पाहणी, प्रतवारी व सारा वसुली याबाबतीत अण्णाजी पंत अतिशय हुशार होते. स्वराज्याचे "पेशवे" मोरोपंत हेही या कामी लक्ष घालत होते. शिरवळ

परगण्याची साराबंदी स्वत: स्वराज्याच्या पेशव्यांनी केली, असा ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख आढळतो. स्वराज्यातील साऱ्याचे दर मोघल साऱ्यापेक्षा कमी होते. मोघल १/२ सारा वसूल करीत असत. म्हणजेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोघलांचा वाटा अर्धा होता. १/२ सारा वसूल करणे हा दरबारी नियम. प्रत्यक्षात वसुली वतनदारांमार्फत म्हणजे अर्थातच बेहिशेबी होत असे. शिवाजीराजाचे हे प्रमाण उत्पन्नाचे पाच हिस्से करून दोन सरकारकडे आणि तीन शेतकऱ्याकडे असे ठरविले. वतनदारांकडून हे काम सरकारी अधिकाऱ्यांकडे आले आणि राजा अतिशय काटेकोर लक्ष घालत असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी गोळा केलेला हा वसूल सरळ स्वराज्याच्या खजिन्यात जाऊ लागला. कोकणात नारळ, सुपारी हे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन. या वस्तूंचे भाव सरकारातून ठरविले जात. आणि या वस्तू व्यापाऱ्यांना विकताना सरकारी अधिकाऱ्याला उपस्थित राहणे हे त्याच्यावर बंधनकारक होते. गावाची रचना करतानासुद्धा अत्यंत आदर्श पद्धती ठेवली. वसवलेल्या गावात बाजारपेठेचा कारभार त्या गावापेक्षा पूर्णत: वेगळा केला. पेठाची वस्ती वेगळी केली. गावाचे दोन भाग केले. मुजेरी म्हणजे शेतकऱ्यांची वसाहत व मोहोवाकि म्हणजे बारा बलुतेदारांची वस्ती.

 स्वराज्याची स्थापना करताना शिवाजीराजाने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या काळजीची ठळक उदाहरणे फक्त वर नमूद केलेली आहेत. सबंध चरित्रातील अशी अनेक घटनास्थळे दाखविता येतील की ज्या धोरणांचा शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंध आहे. त्यात धर्माचीबाबसुद्धा ही दुय्यम मानली. शिवाजी राजा आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आदिलशहा, कुतूबशहा आणि मोघलांकडून फौजेच्या बळावर चवथाई वसूल करी. सुरत, नंदूरबार, धरणगाव, चोपडा, मलकापूर, कारंजे इत्यादी गावांत राजांनी चवथाई वसूल केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. आपल्या मुलखाचे व रयतेचे रक्षण करण्यासाठी आपल्याला फौज बाळगावी लागते तिच्या खर्चासाठी ही वसुली करणे भाग आहे असे रास्त समर्थन राजाने या संदर्भात केले आहे.

 आर्थिक, सामाजिक, राजकिय अशा सर्व जाचातून महाराष्ट्रातील शेतकरी मुक्त होत असतानाच मोगल राजधानीच्या परिसरातील शेतकरीही या सर्व जाचांनी पिळून निघत होता. ज्यावेळेला स्वराज्यात शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जात होती आणि शेतकऱ्यांचे राज्य स्थापन करण्याचे काम सुरू होते, बरोबर त्याचवेळेला उत्तरेतील जाट शेतकऱ्यांनी दिल्ली तक्ताविरुद्ध बंडाचा उठाव केला होता. रयतेतील शेतकऱ्यांमधील हा धगधगणारा असंतोष संघटित होऊ लागला. अंसतोषाचा पहिला

भडका पेटला तो मथुरेला. तेथील जमीनदार गोकला यांच्या नेतृत्वाखाली जाट शेतकऱ्यांनी बंडाचा झेंडा उभारला. मथुरेच्या आसपासची सर्व खेडी एकत्र झाली. हा शेतकऱ्यांच्या अंसतोषाचा वणवा विझविण्यासाठी अब्दुल नबी हा औरंगजेबाचा सरदार चालून गेला. त्या ठिकाणी झालेल्या झुंजीत दि.१० मे १६६९ रोजी चिडलेल्या लोकांनी अब्दुल नबीला नेमके टिपले. गोकलाच्या विजयी सैन्याने सदाबाद हा औरंगजेबाजा परगणा लुटून फस्त केला. पहिल्याच संघर्षात यश मिळाल्यामुळे मथुरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या असंतोषाच्या वणव्याची झळ आग्ऱ्यापर्यंत पोहोचली. मोघलांच्या राजधानीभोवतालच्या प्रदेशातील शेकडो खेड्यातील हजारो जाट व अन्य शेतकरी यांनी औरंगजेबाची शाही सत्ता उधळून लावली. अव्यवस्था, धुमाकूळ आणि कत्तली बेसुमार झाल्या.

 जाटांपाठोपाठच सतनामी लोकांनीही औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध उठाव केला. दिल्लीच्या ईशान्येस ७५ मैलांवरील नरनौळ जिल्ह्यात सतनामांचा जबर जोर होता. हा भाग तर त्यांचा बालेकिल्लाच झाला. चारित्र्यसंपन्न प्रामाणिक बंधुत्ववादी सतनामी फकिरासारखी वेशभूषा करून अगदी किरकोळ भांडवलावर शेती आणि व्यापार करीत, गैरमार्गाने धनसंपत्ती गोळा करणे यास ते पाप समजत. जाटांबरोबरच सतनामी औरंगजेबाच्या लुटारू सत्तेविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. संतनाम्यांचे नेतृत्व एका वृद्ध महंतणीकडे होते. पाहता पाहता ही चळवळ प्रचंड फोफावली. औरंगजेबाचे धाबे दणाणले . बादशाही सैन्याची लांडगेतोड होऊ लागली. या चळवळीचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या छोट्या-छोट्या पथकांची अन्यायाविरुद्ध कंबर कसून उभा राहिलेल्या शेतकऱ्यांनी लूट आणि दारुण परावभ केला. औरंगजेबाच्या अमर्यादित सत्तेवर धार्मिक छळाचा डाग पण होता. साहजिकच सतनाम्यांमध्ये महंतिणीच्या मंत्रसामर्थ्यामुळे आपण औरंगजेबाच्या शाही फौजेचा पराभव करू शकू ही भावना निर्माण झाली. नारनौळच्या लढाईत पराभव होऊन संपूर्ण शहर चवळवकर्त्यांच्या ताब्यात आले.

 लूट, अत्याचार, बेबंदशाही, जुलूम याविरुद्ध उभा राहिलेला हा संघर्ष महाराष्ट्रातातील छत्रपती शिवाजीराजाच्या स्वराज्याप्रमाणे मूर्तरूप घेऊशकला नाही. याची तत्कालीन कारणे अनेक असतीलही. तरी पण अशा उठावापूर्वी कींवा संघर्षापूर्वी रयतेमध्ये राजकर्त्याबद्दल जो विश्वास निर्माण व्हायला हवा होता तो या उठावकर्त्यांना करता आला नाही, हे निश्चित. नेमकि हीच गोष्ट शिवाजीराजाने स्वराज्याची निर्मिती करीत असताना बरोबर हेरली आणि सुरुवातीपासूनच धर्माचा, जातीचा क्षुद्र विचार न करता जो जो स्वराज्यासाठी उभा राहणार आहे त्यास बरोबर

घेतले. रयतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आणि म्हणूनच हातामध्ये रुमणे घेणारा शेतकरी आपल्या शेतीच्या रक्षणासाठी सुगीचे दिवस संपताच तलवार घेऊन उभा राहिला.

 समाजाच्या प्रगतीची बीजे रोवली

 शिवाजीराजाच्या राज्यात रयतेच्या "स्वराज्यात" रयतेला सुरक्षितता प्राप्त झाली. सन्मानाची वागणूक मिळू लागली. या सर्वांबरोबरच समाजाच्या प्रत्येक घटकाला स्वत:च्या विकासाची दिशाही स्वराज्यात दिसू लागली हे नि:संशय. स्वराज्याचा मूळ मुलूख हा काही समृद्ध शेतीचा प्रदेश नाही. आजचा विदर्भ आणि मराठवाडा हे दोन प्रदेश सपाटीचे, जास्त शेतजमीन असलेले आणि म्हणूनच शेतीच्या जास्त उत्पन्नाचे प्रदेश.हे स्वराज्यात नव्हतेच. त्यामुळे शेतीच्या बरोबरीने इतर जोडधंदे निर्माण होणे, ते रयतेला उपलब्ध होणे यातूनच रयतेची आर्थिक परिस्थिती अधिक सुधारू शकत होती. शेतीतून राज्यव्यवस्थेने नेलेला महसूल काही थोड्याच लोकांनी वापरले यापेक्षा त्या महसुलातही रयतेचा पुरेपूर वाटा असणे हे राजाच्या आणि शेतकऱ्यांच्या निरोगी देवघेवीचे लक्षण आहे.

 महाराष्ट्राच्या भूमीत सैनिकि पेशा हा तसा शेतीचा जोडधंदाच होता. दसऱ्यापर्यंत शेती करायची नंतर मुलूखगिरीला बाहेर पडायचे. अक्षयतृतीयेला परत येऊन शेतीच्या कामाला लागायचं ही पद्धत. मुलूखगिरीतून सैन्याला पगार होते. रणागंणात कामी आले तर मान होता. अशा वीरमृत्यूनंतर घरच्यांची काळजी घ्यायला राजा होता. मावळातल्या रयतेतीलच लोक या सैन्यात होते आणि किनारपट्टीवरच्या आगरी, कोळी, भंडारी, आणि मुसलमान या दर्यावर्दी जमातींना आरमारात स्थान होते. एरवी समुद्रावरच्या सर्व हालचाली हबशी आणि इंगजांनी ताब्यात घेतलेल्या होत्या. आरमारातील सर्व प्रकारच्या नोकऱ्या रयतेला उपलब्ध झाल्या. त्याचबरोबर किनारपट्टीवरच अनेक ठिकाणी जहाजे आणि अनेक प्रकारच्या छोट्या नौका करण्याचे कारखाने होते. एकशेसाठ आणि अनेक इतर अनेक प्रकारच्या छोट्या नौका आरमात होत्या. जहाजे तयारकरायला कोणी टोपीकर इंग्रज वगैरे बाहेरच्यामाणसांना नोकरीला ठेवले होते की नाही माहीत नाही. कदाचित काही काळ असतीलही. आरमार आणि जहाजे तयार करणे, तेलपाणी करून व्यवस्थित ठेवणे एक मोठे क्षेत्र किनारपट्टीवरच्या जातीजमातींना राजाने खुले केले यात संशय नाही.

 तीच गोष्ट गावोगावच्या लोहारांची , चाभारांची, सुतारांची आणि गवंडी यांची म्हणता येईल. स्वराज्याच्या सुरुवातीपासूनच तोरणा दुरुस्ती, राजगड उभारणी,

प्रतापगड उभारणी, मोहनगड दुरुस्ती व उभारणी, रायगडाचे प्रचंड बांधकाम, भूपाळगडासारखा कित्येक किल्ल्यांची डागडूजी व उभारणी, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग (कासा) अलिबाग(कुलाबा), खांदेरी उंदेरी यासारख्या किल्ल्यांची उभारणी ही व काही धरणांची इत्यादी कामे झालेली दिसतात. शिवाजीराजांच्या १६४६ ते १६८० या कारकीर्दीत झालेली एवढी अभियांत्रिकि क्षेत्रातील कामे निदान महाराष्ट्रात तरी इतर कोणत्या काळात झालेली नाहीत.

 निरनिराळ्या अठरापगड जातीजमातींना त्यांचे पिढीजात धंदे किंवा नोकऱ्या करता येऊ लागल्या. सुलतानीत हे सर्वच दडपले गेले होते. वसुलीचा हक्क वतनदार जहागीरदारांच होता. त्यांचे प्राबल्य. बळजोरी आणि आपसातील मारामाऱ्या यांनाच ऊत आला होता. महारांना एरवी वतनदारांच्याकडे नोकऱ्या मिळाल्या तर ठीकच एरवी हालच कारण शेतीचेच हाल चालू. जवळजवळ प्रत्येक किल्ल्यावर देवडीवरचे राखणीचे काम, स्वराज्यातील अनेक ठाण्यांवरचे, मेट्यांवरचे राखणीचे काम महार-रामोशांकडे होते. त्यांना "नाईक" या सन्मानदर्शक संबोधनाने बोलावले जायचे. पाटील, कुलकर्णी या गावकामगारांना त्याचे परंपरागत कामच दिलेले पण वसुलीचे हक्क काढून घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवलेले होते.

 स्वराज्यात मुलकि अधिकाऱ्यांची संख्याही बरीच होती. हे सर्व पगारी नोकरच होते. यात लेखणीचे काम जास्त असल्यामुळे ब्राह्मण, प्रभू इ. जातीचे लोक होते.रयतेतील लोक मुलखगिरीवर जाणे व मुलूखगिरीवर न जाणारे रयतेच्या व्यवस्थेला लागणे ही व्यवस्था होती. दोन्ही कामांना राजांनी महत्त्व दिले.

 इ.स. १६७० च्या सुमारास जेव्हा औरंगजेबाविरुद्धचा तह मोडून पुन: मोगली सत्ता स्वराज्यातून उचकटून काढायचे काम चालू होते तेव्हा शिवाजीराजाने निळोपंत मुजुमदारांनी गड घेणे इत्यादी मुलूखगिरीच्या कामातून काढून मुलकिचा कारभार करण्याकडे बदली केली. "एकाने सिद्ध संरक्षण करावे, एकाने साध्य करावे. दोन्ही कामे साहेब बरोबरी मानताती" तरीपण शिवाजीराजांनी मुलकि अधिकाऱ्यांना शिरजोर होऊ दिले नाही. प्रभावळीच्या सुभेदाराला एका कामात चुकारपणा केल्यावर त्यांनी खलिता पाठवला होता आणि "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो?" या शब्दात समज दिली होती.

 भूमिचे संरक्षण, भूमिसेवक शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या शेतीभातीचे संरक्षण, शेतकऱ्यांचाच संरक्षणामध्ये संवर्धनामध्ये सहभाग, शेतकऱ्यांच्या शेतीतून आणि बलुतेदारांच्या उत्पादनातून मिळणाऱ्या वसुलीचा संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी होणारा वापर या सर्व गोष्टींना रयत साक्षीदार होती.

 त्या काळात सर्व कला, विद्या, तंत्रज्ञान या पुस्तकि किंवा बिगरपुस्तकि ज्ञानाचे हस्तांतर पारंपरिक पद्धतीने वडील पिढीने नवीन पिढीला घरोघरी देणे या पद्धतीनेच होत होते. या ज्ञानाचा वापर सर्वांसाठी होणे यात सुलतानशाहीचा व वतनदारीचा राजकिय व आर्थिक अडसर मोठा होताच. त्यामुळे कला विज्ञान, व्यावसायिकांना त्यांचे धंदे सुरळीत सुरू करण्याच्या विरोधातले अडसर दूर होणे ही विकासाची मूलभूत पायरी व त्यानंतर कला विज्ञान तंत्रमानाचे विकसन, नवीन गोष्टी विकसित करणे परत त्यांचा सर्वसामान्यांसाठी वापर होणे ही दुसरी पायरी ठरावी.

 महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या राज्यात ही पहिली पायरी समाजाने ओलांडली हे निश्चित. त्या धकाधकिच्या काळात दुसऱ्या पायरीकडे जाण्याइतका वेळ, स्थिरस्थावरता स्वराज्याच्या धुरीणांना मिळाली नाही. पण या दुयऱ्या पायरीची बीजे पुरंदर किल्ल्यावरचा तोफाचा कारखाना, आरमारी व व्यापारी हालचालींसाठी लागणाऱ्या नौकांचे कारखाने इ. अनेक गोष्टीत दिसतात.