शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/शिवपूर्व काळ

विकिस्रोत कडून



 शिवपूर्व काळ


 १३१८ साली देवगिरीचा पाडाव पूर्ण झाला. शिवाजीचा जन्म १६३० सालचा आणि त्याने रोवलेली स्वराज्याची मुहूर्तमेढ १६५४ सालची. असे धरले तर या दोन घटनांमध्ये सव्वातीनशे वर्षाच्या वर काळ लोटला. या प्रदीर्घ काळात महाराष्ट्राचे सर्व रंगरूपच आमूलाग्र बदलून गेले.हे बदल समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण त्याशिवाय शिवाजीने घडवून आणलेल्या क्रांतीची सर्वंकषता कळणे कठीण होईल.

 परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय करून टाकली त्यामुळे आता पृथ्वीवर संरक्षणाची जबाबदारी उचलणारा, राज्यभार सांभाळणारा कोणी शिल्लकच उरला नाही अशी मान्यता मुसलमानी आक्रमणाच्या आधी कित्येक वर्षांपासून होती. अकबराच्या काळात कृष्ण भट्ट शेष याने 'शूद्राचार शिरोमणी' नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि हिंदूधर्मात आता राजतेजाचे वा राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत, उरले ते फक्त ब्राह्मण व शूद्रच असे प्रतिपादन केले.

 महाराष्ट्रात देवगिरीच्या पाडावानंतर भूमी खरोखरच निःक्षत्रिय झाल्यासारखी दिसू लागली.राजवंशांचा व लष्करी पेशातील समाजाचा समग्र उच्छेद मुसलमानांनी मांडल्यामुळे तो समाज लुप्तच झाला. आसपासच्या उपजीविकेसाठी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांत मिसळून जाण्याखेरीज जिवंत राहण्याचीसुद्धा त्यांना काही शक्यता राहिली नाही. आपली हत्यारेपात्यारे गाडून टाकून ही मंडळी हाती नांगर घेऊ लागली. यामुळे शिलाहारांचे शेलार, परमारांचे पवार, कदंबांचे कदम आणि यादवांचे जाधव बनले. दरबारात मान असलेले मनसबदार दरकदार यांची वाताहत झाली. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी ही म्हण या आपत्कालात तरी प्रत्यक्षात आली.

 राजदरबारात सर्व महत्त्वाची स्थाने मुसलमानांकडे गेली. धर्मांतर केलेल्यांना दरबारात हलकिसलकि अपमानास्पद कामेच मिळाली. संस्कृत व मराठी भाषांचा उपयोगसंपला.फारशी वाचूशकणारे पारसनीस महत्त्वाचे ठरले. दररोतच्या बोलण्यातही हजारोंनी फारसी शब्द मराठीत घुसले. लोकांचा वेशभूषेचा, राहणीचा ढंगच मुसलमानी होऊन गेला. हिंदू देवदेवतांपेक्षा मुसलमानी पीर आणि फकिर जास्त सामर्थ्यवान

आहेत या भावनेने पोरे होण्यासाठीसुद्धा नवस त्यांचेच होऊ लागले आणि मुलांच्या नावात बाजीराव, हिम्मतराव, जानराव सर्रास आढळू लागले.

 मुसलमानी सत्तेच्या लाटेस तोंड देण्याचे जे काही किरकोळ प्रयत्न झाले ते समूळ मोडून काढण्यात आले. इ.स.१४७२ पर्यंत महाराष्ट्रात प्रतिकार करणारी संघटित शक्ती शिल्लकच राहिली नाही. या नंतरचा महाराष्ट्राचा सगळा इतिहास हा बहामनी राज्यांच्या मोडतोडीचा आणि विजयनगरच्या वैभवाचा. तालीकोटाच्या लढाईनंतर तर सर्वच आशा संपल्या आणि नामदेवाच्या म्हणण्याप्रमाणे कलियुगाचा अंत होईल तेव्हा कलंकी अवतारच म्लेंच्छांना नष्ट करेल, तोपर्यंत हरिनाम घेण्यापलीकडे पर्याय नाही अशी अगदी भल्याभल्यांची धारणा झाली होती.

 यानंतरचा इतिहास हा प्रामुख्याने मोगल सुलतानांच्या आपापसातील लढायांचा आहे. बहामनी राज्याचे तुकडे झाले; त्यांच्यातील लढायांचा शेवट म्हणून फक्त आदिलशाही व निजामशाहीच काय ती उरली आणि त्याचवेळी दिल्लीतील मोगल सत्ता स्थिर होऊन तिने दक्षिणेकडे नजर फिरवली आणि सहधर्मीय पातशाह्यांवर आक्रमण चालू केले. दिल्लीच्या आक्रमणाला तोंड देणे आदिलशहास व निजामशहास दोनशे वर्षांपूवी रामदेवरायास जितके कठीण गेले तितकेच कठीण वाटू लागले. अशा परिस्थितीत धर्माभिमान वगैरे बाजूला ठेवावा लागतो. दक्षिणेतील सुलतानांनी मराठे सरदारांना आपल्या पदरी ठेवून घेण्यास, एवढेच नव्हे तर त्यांना दरबारात मानमरातबाच्या जागा देण्यासही सुरूवात केली. मराठ्यांच्या अभ्युदयाला सुरूवात झाली ती उत्तरेतील मोगल आणि दक्षिणेतील सुलतानशाह्या यांच्यातील स्पर्धांच्या युद्धांमुळे.

 संतांची कामगिरी

 मुसलमानी आक्रमणाखाली अनेक देश भरडले गेले. स्पेनसारख्या देशात मुसलमानांचा पराभव झाला. आर्मेनियासारख्या देशात मुसलमानी आक्रमकांशी स्थानिक जनतेने सतत तीव्र संघर्ष केला आणि त्यांना तुर्कस्थानात परत जाण्यास भाग पाडले. याच्या अगदी उलट्या टोकाला मलाया, इंडोनेशियासारखे देश ! या देशात मुसलमानी आक्रमणपूर्व संस्कृती नामशेष झाल्या. या देशांप्रमाणेच महाराष्ट्रही मुसलमानी आक्रमणाच्या पहिल्या धक्क्यामुळे कोसळला.पण ३०० वर्षांच्या प्रदीर्घ वनवासानंतर त्यातून बाहेर पडला ही एक विशेषच घटना आहे. या काळात पराभूत झालेले,उपासमारीने, दुष्काळाने दुःखाने गांजलेले लोक काय विचार करीत होते? आपल्या डोळ्यासमोर घरच्या मायबहिणींनाओढून नेत असताना हताशपणे पाहण्याची ज्यांच्यावर पाळी आली त्या लोकांनी मनात काय विचार आणला असेल? ३०० वर्षांपर्यंत हा समाज सुप्तावस्थेत गाडला गेला होता.३०० वर्षांनी तो त्यातून बाहेर

आला. ३०० वर्षांनंतर पुन्हा फुलून उठलेल्या या अस्मितेचे रहस्य काय?

 ज्यांच्या आयुष्याच्या एक क्षणाची शाश्वती नाही, ज्यांना संध्याकाळच्या भाकरीची भ्रांत आहे आणि पोराबायकांच्या अब्रूचीही खात्री नाही असा समाज कोणते तत्त्वज्ञान स्वीकारेल? हजारो गाईचे कळप बाळगणाऱ्या सुरक्षित, संपन्न आर्य समाजाच्या यज्ञयागांना त्याच्या दृष्टीने काहीच अर्थ नसणार. स्वस्थ गृहस्थीची यज्ञयाग आणि पुरुषार्थाचा गौरव करणारी नीतितत्त्वे पराभूत अपमानित समाजाच्या काय उपयोगाची?

 एका बाजूला देवगिरीवर हल्ला होत असताना संत ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्गाची गुढी रोवली. परमेश्वराशी एकरूप होण्याचा नामसाधन हा मार्ग भक्तिपंथाने मांडला.अगदी निराधार निराश्रितांनासुद्धा परमेश्वराचे नाव मुखी घेण्याची तरी शक्यता आणि स्वास्थ्य असते.हरघडी डोळ्यासमोर ओढवणाऱ्या दु:खातून मोकळे कसे व्हावे? तर या इहलोकीच्या दुःखाना काही महत्त्वच नाही. 'बाईल मेली बरे झाले, पोर मेले त्याहून बरे झाले.' अशाही परिस्थितीत तुकारामाला आयुष्य सार्थकी लावता येते तर आपल्याला निराश होण्याचे काय कारण? 'जयजय रामकृष्ण हरी' आणि 'पुंडलिक वरदा'च्या घोषाने दुःखे संपली नाहीत तरी या दुःखापलीकडे पाहण्याची ताकद समाजाला मिळाली.

 भक्तिमार्गाने समाजात एक मोठा बदल घडवून आणला. चातुर्वर्ण्याने समाजाची शकले पडली होती. जातीच्या बंधनांपलीकडे जाणे वरच्या वर्णातील लोकांनाही शक्य नव्हते. खालील जातीत जन्मलेल्यांना त्यांच्या अवस्थेविषयी तक्रार करण्याचीही शक्यता नव्हती. धर्म आणि अध्यात्म ही केवळ उच्चवर्णीयांची मक्तेदारी. जन्मभर काबाडकष्ट, निकृष्ट राहणीमान आणि दैनंदिन जीवनात पदोपदी अपमान आणि अवहेलना या पलीकडे शूद्रातिशूद्रांना दुसरे आयुष्य नव्हते.निव्वळ माणुसकि म्हणून त्यांच्याकडे पाहणेसुद्धा धर्मसंमत नव्हते. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरापासून तुकाराम महाराजापर्यंत सर्व संतांनी जातीव्यवस्थेतील उच्चनीचतेवर आपल्या लिखाणाने आणि वागणुकिने उघडपणे आघात केले. शूद्रातिशूद्रांना समाज पारखा झाला होता. मुसलमानी आक्रमणाचे त्यांना दु:ख वाटणे तर सोडूनच द्या पण सोयरसुतक वाटत नव्हते. संतांनी उपदेशिलेल्या भक्तिमार्गामुळे त्यांच्या मनात आसपासच्या समाजाशी आपले काहीतरी लागेबांधे आहेत अशी भावना तयार होणे शक्य झाले. पण भक्तिमार्गामुळे जातीव्यवस्था संपली नाही. ती आजतागायतही संपलेली नाही; पण निदान परकिय आक्रमणाला तोंड देण्यापुरते का होईना वेगवेगळ्या जातीचे लोक एक फळी उभारायला तयार होऊ लागले.

 संतांनी बजावलेली आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे अध्यात्म व धर्म

जनसामान्यांच्या मराठी भाषेत मांडणे. संस्कृत भाषा फक्त ब्राह्मण समाजापुरती मर्यादित. सर्व धर्मग्रंथ संस्कृत भाषेतलेच. धार्मिक विधीच्या वेळी ब्राह्मणांच्या तोंडून न समजणाऱ्या मंत्रांचे घोष ऐकण्यापलीकडे लोकांची धर्मविचाराशी वा तत्त्वाशी तोंडओळख होण्याची काहीही शक्यता नव्हती. सर्व धर्मकारण मराठीत आणून अत्यंत दुष्कर परिस्थितीत कथाकिर्तनांचा जोर लावून आणि स्वत:च्या शुद्ध, सात्त्विक आचरणाच्या प्रतिष्ठेची जोड देऊन संतांनी सामान्यजनांना धर्मविचाराचे एक नवीन दालन उघडून दिले. धर्म म्हणजे निरर्थक वटवट नाही. धर्मविचार सामान्य जीवनातही महत्त्वाचा आहे. सामान्यांनाही कळण्यासारखा आहे याची जाणीव जनसामान्यांना पहिल्यांदा झाली आणि या नव्या दालनातील विचारांच्या वैभवाने ते दिपून आणि मोहरून गेले. तुकडे तुकडे झालेल्या समाजाला एकत्र जोडण्याकरिता संतांनी केलेले हे काम अद्वितीयच मानावे लागेल.

 वारकरी पंथाची शिकवण व त्या पंथाने तयार केलेल्या संस्था समकालीन समाजाच्या परिस्थितीशी निगडित होत्या. पंथाला समाजात जी मान्यता मिळाली त्याचे कारण समाजाची अत्यंत आवश्यक गरज वारकरी पंथ भागवीत होता. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे वारकरी पंथाचा गाभा समजली जाणारी पंढरपूरची आषाढी यात्रा. भर खरिपाच्या हंगामात बहुसंख्य कोरडवाहू शेतकरी लाखालाखाच्या संख्येने शेतीतील कामे-धामे संपवून पंढरपूरला जातात ही तर्काला न पटणारी गोष्ट. पंढरीच्या वारीतील भक्तिभावपाहून अनेकांनी भक्ति रसाने ओथंबलेली काव्ये रचली. विठोबाच्या भक्तद्दची पेठ उघडली गेली आणि विठोबा रखुमाई हा मोठा किफायतशीर व्यवसाय बनला. पंढरपूरला जाणारा वारकरी शेतीतील कामे सोडून भक्तद्दच्या पुरात वाहात पंढरपूरला जातो ही गोष्टच मुळात खोटी. देहू, आळंदी तसेच पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या जेथून जेथून निघतात ते सगळे विभाग कोरडवाहू शेतीचे आहेत. त्या भागात भूगर्भातील पाणी जवळ जवळ नसल्यासारखे. अस्मानी आणि सुलतानीने शेतकऱ्यांची परिस्थिती अशी की शेवटचे धान्य खाऊन शिमगा साजरा करायचा. मुळे,पाने, गवताचे बी असे खाऊन आणखी काही पंधरवडे डबरा भरायचा. आगोठीला बियाण्यांची ज्वारी जी शिल्लक असेल ती नाहीतर उसने पासने करून आणलेली शेतात फेकायची; आणि हाती काही तरी पीक येईपर्यंत देशोधडीला लागायचे. पंढरपूरच्या आसमंतातील जमिनीच्या पोटात उदंड पाणी आहे. आजही तेथील एकेका विहिरीवर सात आठ एकर ऊस निघू शकतो. ज्वारीचे पीकही भरभरून येते. कोरडवाहू शेतकरी पोटाच्या सोयीकरिता निघाले की त्यांचे पाय साहजिकच पंढरपूरकडे वळत. साहजिकच वाटेने भले शेतकरी त्यांना भातरतुकडा घालायला मागेपुढे पाहत नसत. आजही देहू आळंदीहून

निघालेल्या दिंडीतील वारकरी चिंचवडभोसरीपर्यंतच उदार भाविकांनी वाटलेले कुरमुरे, केळी आणि दशम्या किती हव्यासाने गोळा करतात हे पाहिले म्हणजे पंढरपूरची वारी हा निराधारांचा आधार आहे हे स्पष्ट होते. वारकरी पंथाने या चलनवलनातील लाचारीचे रूप काढून टाकले. पंढरपूरला जाणारे पोटार्थी भिकारी राहिले नाहीत. पंढरीनाथाचे पुण्यवान भक्त झाले. त्यांना भाकरतुकडा घालणारे श्रीमंत दाते राहिले नाहीत. विठोबाच्या भक्तांच्या सेवेचे मानकरी झाले. महाराष्ट्रातील भक्तिमार्ग हा एका अत्यंत बिकट दैनावस्थेत समाजाला तगवून धरणारा चमत्कार ठरला तो असा.

 १६ व्या शतकाच्या शेवटी आणि १७ व्या शतकाच्या सुरूवातीस मुसलमान अंमलाखालीच का होईना मराठी सरदारांचा पुन्हा उदय होऊ लागला आणि नवीन बदलाची पहाट दिसू लागली त्यावेळी निवृत्तीपर संतपंथाबरोबरच रामदासांच्या आचार्य परंपरेलाही जोम आला. पुन्हा रामदासांच्या ओजस्वी वाणीत आपले प्रतिबिंब पाहू लागला होता.

 मराठ्यांचा अभ्युदय

 १६ व्या शतकाच्या शेवटी मोगलांची धास्ती तयार झाल्यापासून दक्षिणेतील सुलतानांनी मराठी माणसांना आश्रय अन् मान देण्यास सुरूवात केली. या वेळेपर्यंत सुलतानांच्या दरबारातही अंदाधुंदी आणि बेबंदशाही माजलेली होती. दरबारातील वजिरापासून मनसबदारापर्यंत सगळेजण सतत कटकारस्थानात गुंतलेले असत. कधी सुलतानाची मर्जी सांभळण्याकरिता, कधी सुलतानाला गादीवरून उठवून लावण्याकरिता, कधी दरबारातील दुसऱ्या मानकऱ्यांचा पाडाव करण्याकरिता, कधी आपल्या मर्जीतील सरदारांना मोठे करण्याकरिता कारस्थाने आणि लढाया सतत चालू असत. सुलतानांनाही कधी दरबारातील एका पक्षाकडे तर कधी दुसऱ्या पक्षाकडे झुकावे लागे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. मुसलमान सरदाराबरोरब महाराष्ट्रात घोरपडे, घाटगे, निंबाळकर, जाधव, भोसले इत्यादी घराणी बारगिरांचा फौजफाटा बाळगून नावारूपास येऊ लागली. दरबारातून मनसबदारी मिळवावी, आपले सैन्य बाळगावे, सरकार दरबारात सारा भरावा, दरबाराच्या अधिकाऱ्यांशी आणि जवळच्या कील्लेदारांशी लाचारी करावी म्हणजे आपल्या मुलखात आपल्याला सार्वभौम राजाप्रमाणे बेबंद वागता येते हे त्यांना पुरतेपणी कळले होते. आपल्या वतनांपलीकडे जाऊन दुसऱ्याच्या वतनातूनही लूटमार करावी अशी त्यांची प्रवृत्ती. त्यामुळे रयतेचे जीवन पुन्हा एकदा मोठे कठीण होऊन गेले. देवगिरीपूर्व काळातील जुलमातून आणि लुटीतून मुसलमान आल्यामुळे जी शाही मुक्तता झाली होती ती संपुष्टात आली आणि शेतकऱ्यांचे जीवन एकदा अत्यंत दुःसह झाले. शिवाजीच्या जन्माच्या वेळी

महाराष्ट्रावर विजापूरचा आदिलशहा, नगरचा निजामशहा आणि दिल्लीतील मोगलशाहीच्या सुभेदारांचा अंमल होता. सर्व शाह्यांच्या ताब्यातील मुलूखांच्या सीमा लागून असल्यामुळे एकमेकांचा मुलूख बळकावण्याच्या सरदाराच्या सत्ता स्पर्धा नेहमीच चालत. महाराष्ट्रातील जनतेला त्या काळात जाच होत होता. आपपल्या मुलूख वाढवणे राज्याच्या सीमा विस्तारित करणे, गेलेले मुलूख परत मिळविणे, जिंकून नवा मुलूख ताब्यात घेणे याचा परिणाम त्यावेळच्या रयतेवरच होत असे. खेडूत, शेतकरी, बलुतेदार कोणाच्या तरी फौजेकडून लुटूनच घ्यायचे आहे अशा अपेक्षेत जगत.

 देशमुखी व वतनदारी ही त्या काळात रूढ झालेली होती. वतनदारांनी फौजा ठेवायाच्या, त्या फौजांनी शेतकऱ्यांची लूट करायची आणि लुटीचा एक भाग हा ज्या सरदाराची वतनदारी त्या भागात असेल त्याला द्यायचा. शिवाजीराजाच्या जन्मापूर्वी फक्त २ वर्षे आधी म्हणजे १६२८ ते १६३० या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. सतत दोन वर्षे पावसाचा थेंबही नाही. त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादनही नाही. बादशहाच्या फौजांकडून वेळोवेळी झालेल्या लुटीमुळे शेतकऱ्यांकडे धान्याचा साठा म्हणून शिल्लक राहिला नव्हताच. साहजिकच महाराष्ट्रामध्ये अन्नानदशा निर्माण झाली. याचे समर्थ रामदासांनी अतिशय बोलके असे वर्णन केलेले आहे.

 पदार्थमात्र तितुका गेला । नुसता देशचि उरला
 जन बुडाले बुडाले, पोटेविण गेले
 बहु कष्टले, किती येक मेले
 माणसा खावया अन्न नाही। अंथरुण पांघरुण तेहि नाही
 कितेक अनाचारी पडिली । कितेक यातिभ्रष्ट जाली।
 कितेक ते आक्रंदली । मुलेबाळे ॥
 कितेक जिवे घेतली। कितेक जळी बुडाली।
 जाळिली ना पुरली। किती येक ॥
 भिक्षा मागता मिळेना । अवघे भिकारीच जना । काय म्हणावे।
 लोके स्थानभ्रष्ट जाली। कितेक तेथेचि मेली।
 उरली ते मराया आली। गावावरी ॥
 प्राणिमात्र जाले दु:खी।


 याच परिस्थितीचे वर्णन 'बादशहानाम्या'त अत्यंत भेदक केलेले आहे.या दुष्काळाचा परिणाम मराठी मुलखास दीर्घकाळ भोगावा लागला.

 '१६३० ते १६५३ या काळात दक्षिणेतून बादशहाच्या खजिन्यात एक पैसाही जमा झालेला नाही, एवढेच नव्हे तर स्थानिक प्रशासनाचा खर्च करण्यासाठी आवश्यक

तेपढा महसूलसुद्धा गोळा होत नसे....भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वत:ला विकून घ्यावयास तयार होते. पण विकत घेणाराच कोणी नव्हता. एका भाकरीसाठी लोक आपल्या पदाचा त्याग करावयास तयार होते. पण त्याची कोणाला पर्वा नव्हती. शेवटी दारिद्र्य इतके शिगेला पोहोचले की, माणसे माणसाला खाऊ लागली आणि पुत्रप्रेमापेक्षा त्याचे मांस हे त्याला प्रिय वाटू लागले.'

 याचवेळी उत्तरेतही पाऊस पडला नाही. पण दिल्ली दरबाराच्या कार्यवाहीमुळे दक्षिणेतेल्याइतके दुष्काळाचे भीषण परिणाम जाणले नाहीत. महाराष्ट्रात मात्र यापेक्षा वेगळी परिस्थिती होती. महाराष्ट्रात नेमका अंमल कोणाचाच नव्हता. एक राजा नव्हता. बेबंदशाही माजली होती आणि सगळीकडे लुटारूंचे साम्राज्य पसरले होते.

 राजवाडे या दुष्काळासंबंधी 'राधा-माधव विलास चंपू'च्या प्रस्तावनेत म्हणतात, "एका हंदक्यास म्हणजे लहान होनास २०० दाणे झाले. अखेर करवसुली शक्य नसल्यामुळे मूर्तजाची (निझाम) आधीच खंगलेली तिजोरी पूर्णपणे शुष्क होऊन गेली.'

 परमानंदाच्या शिवभारतातसुद्धा या दुष्काळाचा उल्लेख आहे. अर्थात त्यात कवीला शोभेल अशी अतिशयोक्तद्द असणे शक्य आहे.

 "पुष्कळ काळापर्यंत अहमद निझामानंतरच्या देशात धान्य महाग आणि सोने स्वस्त झाले. श्रीमंत लोक शेरभर रत्ने देऊन मोठ्या प्रयासाने शेरभर कुळीथ घेत. खाण्यास काही नसल्यामुळे एकच हाहाकार उडून पशू पशूस आणि माणसे माणसास खाऊ लागली.' (शिवपूर्व शिवभारत अध्याय ८; ५३- ५५)

 या दुष्काळाबद्दल इंग्शिल फॅक्टरी रेकॉर्डस्मध्ये एका समकालीन व्यापाऱ्याने असे म्हटले आहे, 'लोकांची एकच मागणी होती- आम्हास खावयास द्या, नाही तर मारुन टाका.'

 या दुष्काळात वतनदाराची वागणूक शेतकऱ्यांशी कशी होती कशी होती याचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक होतील. शेतकऱ्याकडील महसूल हे वतनदारांचे मौजमजा उडवायचे साधन असल्यामुळे या दुष्काळी परिस्थितीतसुद्धा वतनदाराचे महसूल अधिकारी वसुली करण्यासाठी थैमान घालीत. वसुलीसाठी गावे बेचिराख केली जात.

 सैनिक उभ्या पिकाचा फडशा पाडत. या दुष्काळी परिस्थितीत तर शेतकऱ्याकडे रोख काही नसल्यामुळे अधिकाऱ्यांची वक्र दृष्टी त्यांच्या घराकडे वळे आणि असेल नसेल ते किडूकमिडूकही लुटले जाई.

 या दुष्काळाचा फटका तुकाराम महाराजांसारख्यांना बसला. तुकाराम महाराजांची पहिली बायको व त्यांचा एक मुलगा या दुष्काळात अन्न अन्न करीत मरण पावला.

तुकारामासारख्या वैरागी संताची प्रतिक्रिया अभंगात लिहिली गेली.

 बाईल मेली मुक्त झाले । देवी माया सोडविली ॥
 पोर मेले बरे झाले । देवे मायाविरहित केले॥
 माता मेली मजदेखता । दु:खात मना पळाली चिंता ॥
 बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरे या दुष्काळे पिडा गेली ॥
 बरे झाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोगे गुरे ॥

 पण संसारी गृहस्थांच्या मनात आपली पोरेबाळे आणि बायामाणसे डोळ्यासमोर भुकेने पटापट प्राण सोडताना पाहून काय आगीचा डोंब उसळला असेल याची कल्पनादेखील कठीण आहे.

 समर्थ रामदास याच काळात महाराष्ट्रात लोकदर्शनासाठी संचार करीत होते. त्यांनी या काळात महाराष्ट्राच्या परिस्थितीचे केलेले वर्णन असे-

 किती येक छंद ते छंद ना बंद नाही। किती येक बेबंद ते ठायि ठायी।
 किती येक ते धान्य लुटूनि नेती। किती येक ते पेव खणोनि नेती ॥
 किती येक ते पूरिले अर्थ नेति । किती पूरिलीं सर्व पात्रेचि नेती ॥
 किती येक ते प्राण कर्णेचि घेती। किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टवीती॥

 अशा परिस्थितीत त्या वेळेचे समाजधुरीण कसे वागत होते हे पाहण्यासारखे आहे. विद्वान पंडितराज जगन्नाथ हे शहाजहान राजाचा आश्रयाने होते. त्यांना जयपूरच्या हिंदू राजाने आपल्या राजसभेचे भूषण होण्यासाठी बोलाविले असता त्याला त्यांनी उत्तर दिले.

 दिल्लोश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान् पुरवितुं समर्थः
 अन्यैनृपालैः परिदीयमानं शाकाय वा स्थल्लवणाय वा स्थान

 (माझे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य केवळ दिल्लीश्वर व जगदीश्वर या दोघांच्यातच आहे. बाकि राजांनी मला काही देण्याचे मनात आणलेच तर ते फार तर माझ्या मीठमिरचीला पुरण्याइतपतच राहील.)

 पंडितराज जगन्नाथांसारख्या विद्वान माणसाची ही अवस्था, तर महाराष्ट्रातील किरकोळ पंडितांच्या अधिपत्याखालील धार्मिक संस्था तर पार रसातळालाच बुडाल्या होत्या. धर्माचा किंवा धार्मिक संस्थाचा सामान्य रयतेला आधार वाटावा अशी परिस्थितीच शिल्लक राहिली नव्हती. धार्मिक संस्थांवरील आपला हक्क ब्राह्मण लोकही वतनदार देशमुखांप्रमाणेच बादशहाकडून सही शिक्का आणून मिळवीत. धार्मिक संस्थाचे उत्पन्न कोणी घ्यायचे? यावर हक्क कोणाचा? यासाठी त्या काळातील तथाकथित विद्वान समाजधुरीण आपापसात भांडत आणि हे भांडण सोडविण्यासाठी

ते सुलतानाकडे धाव घेत. नाशिक येथील 'वेदोनारायण' ऋग्वेदी यांत्रेकरूंची पिंडे कुणी पाडायची आणि यजुर्वेदी यात्रेकरूंची पिंडे कोणी पाडायची याकरिता भांडत होते.आणि आपापसात भांडून निर्णय मागायला बादशहाकडे किंवा वजिराकडे जात होते.

 सप्तशृंग भवानीची पूजा कोणी करायची हा तंटा सुलतानी ठाणेदारापुढे जात होता. याचवेळी कित्येक वेदशास्त्रसंपन्न शास्त्री, पंडित केवळ वर्षासनाच्या भिकेसाठी गोदावरीच्या तीरावर किंवा कृष्णेच्या तीरावर पूजाअर्चा करून. "हजरत साहेबांना परमेश्वराकडून दुवा' मिळवून देत होते. पंढरपूरचे बडवे व महाजन देवापुढच्या विड्यासाठी भांडत होते. कोकणात देवरुखे व इतर ब्राह्मण देवरुख्यांच्या घरी ब्राह्मणांनी जेवायचे की नाही यासाठी वितंडवाद घालीत. सबंध महाराष्ट्र जुलूम, अत्याचार आणि गुलामगिरीच्या टाचेखाली भरडला जात आसताना वैदिक धर्माचा वारसा सांगणारे भिकेसाठी, वतनाच्या एका तुकड्यासाठी, खोट्या प्रतिष्ठेसाठी आपापसात भांडत होते. विद्वान वेदशास्त्रसंपन्न समाजधुरीणांची ही अवस्था होती. दुसरीकडे, क्षात्रतेजाचा वारसा सांगणाऱ्या मराठे सरदारांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. ते लढत होते, शौर्य गाजवत होते. मोगल, निझाम किंवा आदिलशहाच्या तख्ताच्या रक्षणासाठी आणि रयतेला लुटून बादशाही खजिना भरण्यासाठी. छत्रपती शिवाजीमहाराजांचे वडील शहाजी राजे यांचा सुपे आणि पुणे परगणा हा प्रांतसुद्धा मराठ्यांच्या या लुटीतून सुटू शकला नाही. शहाजीराजांनी आदिलशहाचा मुलूख मारला तो निझामासाठी. पण आदिलशहाचा वजीर खवासखान याने शहाजीराजांची बंडखोरी मोडण्यासाठी रायाराव व मुरारपंत या दोन मराठी सरदारांना पाठविले. आदिलशहाच्या फौजा पुण्यात घुसल्या. सैनिकांनी पुण्यात थैमान घातले. शहाजीराजांचे वाडे पेटविले. गरिबांच्या हालाला तर पारावारच उरला नाही. तलवारीचे वार आणि आगीच्या ज्वाळांचा तडाखा चुकविण्यासाठी ते पुणे सोडून पळत सुटले. रायारावाने पुण्याच्या भोवती असलेली तटबंदी पार पाडून टाकली, पुण्याच्या डौलदार वेशी सुरूंगाने उद्ध्वस्त केल्या. महंमद आदिलशहा आणि खवासखानाच्या मनातील शहाजीराजांची जहागिरी उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न पूर्ण केले ते मराठे सरदार मुरारपंत आणि रायारावाने. या शौर्यासाठी रायारावाला आदिलशहाने 'प्रतापराव' असा किताब बहाल केला. रायाराव व मुरारपंतानी खरोखरीच चार पायाची गाढवे आणून त्यांचा नांगर पुण्यावरून फिरवला. लोखंडी पहार जमिनीमध्ये ठोकली. फुटकी कवडी आणि तुटकी वहाण पुण्यात टांगून ठेवली. हेतू हा की स्वाभिमानाने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा होतो अशी दहशत बसावी.

 अशा या असुरक्षित राजकिय अस्थिरतेच्या वातावरणात मराठे सरदार मात्र

जमिनीच्या तुकड्यावरून आणि शेतकऱ्यांच्या लुटीच्या मोबदल्यावरून आपापसात भांडत होते. जेधे-बांदल संघर्ष हा त्या दृष्टीने ठळक आणि महत्त्वाचा आहे. अखेर या दोन सरदारांच्या आपापसातील वैराचा निर्णय लढाईनेच लागला. अगदी ठरवून युद्ध घडवून आणले. रणखांब ठोकले गेले. युद्धाच्या ठरलेल्या तिथीनुसार परस्परांना आव्हान देत बांदलांचे १२५० लोक आणि जेध्यांचे ७०० लोक रणभूमीवर आले. ३०० माणसे लढाईत कापली गेली. मृतांचे देह जातवार वेगळे गेले. घरे मोडून त्याचे वासे काढून प्रेते एकत्र जाळली गेली.

 कारीचे जेधे व उतरावळीचे खोपडे यांचे पिढ्यान्पिढ्यांचे वैमनस्य होते. बिदरच्या बादशहाकडून आबाजी जेध्यांना देशमुखीच्या वतनाची सनद मिळाली. ती घेऊन येत असल्याची बातमी खोपड्यांना कळताच गाडे खिंडीत गाठून जेध्यांना त्यांनी ठार मारले. तेव्हा जेध्यांच्या वंशाने हे वैर पुढे कायम ठेवले आणि खोपड्यांचे एक लग्न करनवडे मुक्कामी येत असल्याचे कळताच पाळत ठेवून लग्नाचे सारे वऱ्हाडच जेध्यांनी कापून काढले. या हत्याकांडात बायकाही कापल्या गेल्या. चोरगे - शिळीमकरांचे वैरही असेच प्रसिद्ध आहे. पायगुडे, ढमाले, देशमुख यांच्यामध्ये जीवघेणी हाणामारी सुरू झाली. पाटीलकीसाठी कोंडाजी तानवणेने लुमाजीच्या कुटुंबात ६ खून पाडले, तर लुमाजीच्या कुटुंबाने कोंडाजीचे दोन. कानदखोऱ्यातील बळवंतराव देशमुखांनी आपल्या भाईबंदांच्या गावावर अचानक छापा घालुन कापाकापी केली. घरेदारे पेटवून दिली. आगीत १० बैलगाड्या व १० म्हशी ८ पारडी जळून खाक झाली. रंगोजी कृष्णाजी याने आपला मुलूख देऊन जावई करून घेतले. पाहुणचारासाठी बोलावून जावयाला जहर खाऊ घातले. हेतू हा की, 'वतन दरोबस्त लेकीचे होईल व मग ते आपल्या हाती येईल.' अशामुळे आपली लेक विधवा होईल याची यत्किंचितही काळजी त्यांना नव्हती

 या संघर्षामागे वतन मिळविणे हेच उद्दिष्ट असेल असे नाही. जाधव-भोसल्यांच्या संघर्षांमध्ये शहाजीराजांचे सरदार खंडागळे यांचा हत्ती बेफाम झाला. रस्त्यात दिसेल त्याला सोंडेने उचलून टाकू लागला. शिवाजीराजांचे सख्खे मामा दत्ताजी जाधवराव या उन्मत्त हत्तीला आवरण्यासाठी पुढे आले. तर विरुद्ध बाजूने संभाजी राजे व खलोजी भोसले हे हत्तीच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावून उभे राहिले. तुंबळ युद्ध झाले. या संघर्षाला हत्ती हे फक्त कारण मात्र झाले. दत्ताजी जाधवराव आणि संभाजीराव भोसले निजामशहाच्या महालापुढे ठार झाले. सारांश एवढाच, हिंदू हिंदूतील वतनदार खानदानी घराण्यांतील भांडणांमध्ये नात्यागोत्याचासुद्धा विसर पडत असे.

 महाराष्ट्रातील क्षात्रतेज, ब्राह्मतेज असे लोप पावत चाललेले होते. सर्वच क्षेत्रात

बजवजपुरी माजली होती. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता.

 शहाजींचा स्वराज्याचा प्रयत्न

 १९२६ ते २७ या काळात निजामशाहीचा कर्तबगार वजीर मलिक अंबर, विजापूरचा इब्राहीम आदिलशहा आणि दिल्लीचा सम्राट बादशहा जहांगीर या तिघांचाही एकापाठोपाठ एक मृत्यू झाला. त्यानंतर जी राजकीय अंदाधुंदी माजली त्याचा फायदा घेऊन अनेक मराठे सरदार उदयाला आले आणि काही काळ तरी त्यांनी सुलतानांच्या दरबारातील सत्ता आपल्या हाती ठेवली. निजामशाहीत मलिक अंबराचा मुलगा फतेहखान आणि हमीदखान यांच्या लठ्ठालठ्ठीत लखुजी जाधवांचा खून पाडला गेला. विजापूरच्या दरबारातही मुस्तफा खान व खवासखान यांचे दोन तट पडले. दोन्ही शाह्या मोगलांच्या मदतीने एकमेकांस ग्रासण्याचा प्रयत्न करू लागल्या. या परिस्थितीचा फायदा घेऊन शहाजीराजांनी पुणे प्रांतात उठाव केला. त्याचा बंदोबस्त विजापूर दरबारने मुरारपंतांना पाठवून केला ही हकीकत पूर्वी आलेलीच आहे. मुरारपंताशी सल्लामसलत करून शहाजीने नंतर नाशिक, त्र्यंबकेश्वर, संगमनेर, जुन्नर व कोकणापर्यंत प्रदेश ताब्यात घेतला व निजामशाही वंशातील एक मूल गादीवर बसवून ते स्वत:च या राज्याचे कारभारी बनले. एका बाजूला मोगल आणि दुसऱ्या बाजूस आदिलशाही यांना एकमेकांत खेळवून १६३३ साली शहाजीने पेमगिरी येथे निजामशहास राज्याभिषेक करवला. आदिलशाहीतील परिस्थितीत उलथापालथ होताच 'महाराज राजाधिराज मुरारी पंडित साहेब' एकटे पडले, कैद झाले. त्यांची जीभ छाटून गाढवावरून धिंड काढली व त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले. विजापूर व दिल्लीतील तहानुसार शहाजीच्या निजामशाहीस मान्यता नाकारण्यात आली व दोन्ही राज्यांच्या फौजा शहाजीविरुद्ध चालून आल्या. शहाजीला निजामशहा मोगलांच्या हाती द्यावा लागला आणि विजापूरची चाकरी पत्करावी लागली.

 मुसलमान अंमलाच्या पडत्या काळात शहाजीने काही हिंदू सरदार, तर दरबारातील रणदुल्लाखान, खवासखान यांसारखे काही मुसलमान सरदार एकत्र करून आपल्या अंमलाखाली एक राज्य तयार करण्याच्या प्रयत्न केला. रयतेला लुटणाऱ्या वतनदारांची आघाडी बांधून स्वत:चे राज्य उभे करण्याचा प्रयत्न शहाजीने केला. त्यात त्याला यश आले नाही. आले असते तरी नवीन राज्यात रयतेच्या दु:खात, हलाखीत काही फरक झाला नसता. मुसलमान सुलतानांची जागा हिंदू सुलतानांनी घेतले असती एवढेच. रयतेच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी, वतनदारी मोडून काढून मावळ्याची, रयतेची फौज तयार करून शेतकऱ्यांना नाडणाऱ्या मुसलमान दरबार व हिंदू वतनदार यांच्याशी एकाच वेळी टक्कर देऊन स्वराज्याची स्थापना करणे आवश्यक होते व हेच काम

इतिहासाने शिवाजीराजाकडून करून घेतले.

 मराठ्यांचा अभ्युदय

 १६ व्या शतकाच्या शेवटी मोगलांची धास्ती तयार झाल्यापासून दक्षिणेत सुलतानांनी मराठी माणसांना आश्रय व मान देण्यास सुरूवात केली. या वेळेपर्यंत सुलतानांच्या दरबारातील वजिरांपासून मनसबदारापंत सगळेजण सतत कट कारस्थानात गुंतलेले असत कधी सुलतानाची मर्जी सांभाळण्याकरिता, कधी सुलतानाला गादीवरून उठवून लावण्याकरिता, कधी दरबारातील दुसऱ्या मानकऱ्यांचा पाडाव करण्याकरिता, कधी आपल्या मर्जीतील सरदारांना मोठे करण्याकरिता कारस्थाने आणि लढाया सतत चालू असत. सुलतानांनाही कधी दरबारातील एका पक्षाकडे तर कधी दुसऱ्या पक्षाकडे झुकावे लागे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. मुसलमान सरदारांबरोबर महाराष्ट्रात घोरपडे,घाटगे, निंबाळकर, जाधव, भोसले इत्यादी घराणी बारगिरांचा फौजफाटा बाळगून नावारूपास येऊ लागली. दरबारातून मनसबदारी मिळवावी. आपले सैन्य बाळगावे, सरकारदरबारात सारा भरावा, दरबारच्या अधिकाऱ्याशी आणि जवळच्या कील्लेदारांशी लाचारी करावी म्हणजे आपल्या मुलखात आपल्याला सार्वभौम राजाप्रमाणे बेबंद वागता येते हे त्यांना पुरतेपणी कळले होते. आपल्या वतनांपलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या वतनातूनही लुटमार करावी अशी त्यांची प्रवृत्ती यामुळे रयतेचे जीवन पुन्हा एकदा मोठे कठीण होऊन गेले. देवगिरीपूर्व काळातील जुलमातून आणि लुटीतून मुसलमान आल्यामुळे जी काही मुक्तता झाली होती ती संपुष्टात आली आणि शेतकऱ्यांचे जीवन पुन्हा एकदा अत्यंत दुःसह झाले.