वनस्पतिविचार/ऑस्मासिस क्रिया व मूलजनित शक्ति

विकिस्रोत कडून
११वे ].  ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति (Root pressure).  ९१
-----
प्रकरण ११ वें.
---------------
ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति (Root pressure).
---------------

 शोषणक्रियाः–प्रथम मुळ्या जमिनींतून अन्न कसे जमा करितात व पुढे ते कसे खोडांत पोहोचविले जाते, ह्याचा विचार करू.

 मुळे जमिनीत घुसल्यावर त्यांस निरनिराळ्या फांद्या येऊन, अग्राजवळ प्रत्येक फांदीवर अथवा आदिमूळावर बारीक बारीक एकपेशीमय केंस येतात, हें केंस अन्न शोषून घेण्याचे कामांत वनस्पतींस उपयोगी पडतात. सजीव तत्त्व, केंद्र व इतर पेशीद्रव्ये ह्या केसांच्या पेशींत नेहमी आढळतात. जेव्हा यांचा मातीशी संबंध येतो, त्या वेळेस दोहोंमध्ये ऑसमॉसिस क्रिया अथवा शोषणक्रिया सुरू होते. जमिनीत पाणी असून त्यामध्यें निरिंद्रिय द्रव्ये विरघळतात. केसांतील जीवन कणांची शोषकक्रिया जास्त असल्यामुळे बाहेरील द्रव्यमिश्रित पाणी पेशीभित्तिकेमधून आत शिरते. पाणी शिरल्या नंतर जीवनकण पातळ होऊ लागतात, पण पुढे लवकरच ह्या द्रव्याकरिता वेगळीं जडस्थाने उत्पन्न होऊन त्यांत ती सांठविली जातात. जीवनकण भित्तिकेजवळ राहिल्याने एकदां शोषण केलेली द्रव्ये बाहेर जाऊ शकत नाहीत. शुद्ध पाणी वाटल्यास बाहेर जाते. शुद्ध पाण्यास अटकाव नसतो. केसांत एक प्रकारचे आम्ल असून ते ऑसमासिस क्रिया सुरू झाल्यावर थोडे बाहेर येते व जमिनीतील पाण्याशीं मिसळते. बाहेर आलेल्या आम्लाचा उपयोग सुद्धा वनस्पति चरित्रांत होत असतो. कारण जमिनीत साध्या पाण्यात न विरघळणारी पुष्कळ द्रव्ये असून, विरघळल्याशिवाय पेशीभित्तिकेंत ती शिरणे फार कठीण असते; म्हणून वनस्पति कांहीं तजवीज न करील तर त्यांचा पोषणास उपयोगही होणार नाही. मग अशी द्रव्यें जमिनीत असून नसून वनस्पतीस काय उपयोग? पण ईश्वरी नियम असा आहे की, ही द्रव्ये वायां न जाऊ देतां वनस्पतीस उपयोगी पडावीत म्हणून त्याकरितां तजवीजसुद्ध केली असते. असल्याने विरघळणाऱ्या द्रव्यास विरघळून सोडणे हा त्या बाहेर येणाऱ्या आम्लाचा उपयोग असतो. खरोखर हा उपयोग मोठा महत्त्वाचा
९२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
असतो. त्यामुळे कठीण व टणक जमीन असली तरी त्यांतील द्रव्ये ह्या आम्लाचे योगाने विरघळतात. विरघळल्यानंतर हे पदार्थ पाण्याबरोबर पेशीचे आंत शिरतात. म्हणून हे आम्लाचे बाहेर जाणे तोट्याचे नसून फायदेशीर असते. अशारीतीने द्रव्य-मिश्रित पाणी शोषिल्यावर सजीवतत्त्व आपले घटणात्मक कार्य सुरू करिते. ह्या शोषित द्रव्यांपैकी कांहीं द्रव्ये नवीन सजीवतत्त्व उत्पन्न करण्यांत खर्चिली जातात. कारण सजीवतत्त्वांची परंपरा कायम राखिली पाहिजे. सजीवतत्वापासुन पेशीभित्तिका अथवा तिची वाढ होत असते. कांहीं जीवनकण ह्या कामीं खर्च होऊन कांहीं जडस्थाने तयार करण्यांत खर्च होतात, याप्रमाणे कांहीं द्रव्यांची विल्हेवाट येथेच लागते. तसेच जुने केंस जमिनीच्या खरखरीत कणाशी संबंध पावल्यामुळे झिजून शोषणक्रियेच्या कामी निरुपयोगी होतात. त्यांची दुरुस्ती अथवा नवीन व्यवस्था करणे हे सजीवतत्त्वाचे कर्तव्य असते.

 हे केंस जमिनीच्या भुसभुशित व हवायुक्त पोकळ्यांत घुसून तेथून पाणी व त्याबरोबरच इतर उपयुक्त पदार्थ शोषण करितात. केसाच्या बाह्यबाजूस जमिनीच्या मातीचे कण चिकटून राहतात. केसाच्या बाह्यत्वचेमध्ये भित्तिकेवर चिकट डिंक उत्पन्न होऊन, त्या योगाने ती द्रव्ये भित्तिकेवर घट्ट चिकटतात. ती लवकर जात नाहीत. त्यांचा अर्धवट जवळ जवळ आंत शिरकाव झाला असतो.

 पाण्याची उपयुक्तता- मुळे आपली जमिनीत घुसण्याची दिशा वारंवार बदलतात. जिकडे जिकडे त्यास मऊ जागा आढळते, अथवा जी जागा अन्न पुरविणारी असुन जेथे पाण्याचा भरपूर सांठा असतो, त्या जागेकडे ती आपला मोर्चा फिरवितात. मूळावर गुरुत्वाकर्षण शक्तीचा अंमल असतो, पण त्याबरोबरच आवश्यक कर्तव्य जे अन्नशोषण व संशोधन इकडे लक्ष्य पुरवून वारंवार दिशा बदलीत ती खाली खाली घुसत जातात. मुळ्यांचे अगर पाण्यासंबंधी फारच तीक्ष्ण असते, असे म्हटले तरी चालेल. त्यांस हे उपजत ज्ञान असते. प्रथम मुळे जर खडकाळ थरांत घुसली असली व जवळच दुसरा पाण्याचा थर असेल, तर लागलीच त्यांस उपजतज्ञान होऊन त्यांची अत्रे पाण्याचे थराकडे वळू लागतात. मुळांच्या वाढत्या बिंदूवर सर्द अथवा सुक्या परिस्थितीचा परिणाम होऊन वाढतां बिंदु सर्द बाजूकडे वाढू लागतो, व

११वे ].  ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति (Root pressure).  ९३
-----
अशा वाढण्याने गुरुत्वाकर्षण शक्तिसुद्धां मागे पडते. शोषणक्रिया सुलभ होणे हे पाण्याच्या कमी अधिक अस्तित्वावर अवलंबून असते. जर पाणी नसेल तर क्रिया अजीबात बंद पडणार. उन्हाळ्यात अथवा अवर्षणकाली जमीन सुकी होऊन पाण्याचा थेंबही जमिनीत राहत नाही. अशा वेळेस जमिनीत बीं पेरिले असता उगवणार नाही. जरी कदाचित् थोडे वरून पाणी घालुन उगवले, तरी जमिनीत पाण्याच्या अभावामुळे ते चांगले पोसणार नाहीं म्हणजे त्यापासून उत्पन्न होणाऱ्या मुळ्यांंस आपल्या शोषणक्रिया पाण्याचे अभावें बरोबर रीतीने चालविता येणार नाहीत. शोषक क्रिया बेताच्या झाल्यामुळे अन्नांचा साठा कमी होऊन झाड वाढावे तसे वाढत नाहीं.  मूलजनितशक्ति:-वनस्पतीस जरूर लागणारे निरिंद्रियक्षार व आम्लें ही सर्व पाण्याबरोबर वनस्पतिशरीरांत शिरतात. ही शोषणक्रिया मुळाकडून होते. दुसऱ्या कोणत्याही अवयवास अशी शोषकशक्ति असत नाहीं. ऑसमासिस क्रियेने बाह्यत्वचेच्या केंसांत प्रथम जमिनीतून पाणी शोषिले जाते व त्यामुळे ती केंसाची पेशी चोहोबाजूनी तणाणते. जवळील सालीच्या पेशींत त्याच क्रियेने पाणी जमत जाते. बाह्यत्वचेवर पुष्कळ केंस असल्यामुळे त्या सर्वांच्या आकर्षणामुळे पुष्कळसे पाणी आंत शिरून सालीचा प्रदेश तणाणून जातो. पेशींतील पाण्यामुळे भित्तिकेवर एक प्रकारचा अंतरजोर पडला असतो, सालींच्या प्रदेशांतील प्रत्येक पेशी-भित्तिकेवर पाण्यामुळे उत्पन्न होणारा जोर पडून भित्तिका पूर्ण चोहोबाजूनी तणाणल्या असतात व पाण्याचा उपसा झाल्याखेरीज नवीन पाणी आंत शिरणे शक्य नसते. मुळाच्या मध्यभागांकडे स्तंभामध्यें ( Stele ) काष्ठान्वित पेशी असतात. बाह्य प्रदेशांत पाणी खेचिलें असल्यामुळे त्या खेचण्याचा परिणाम आतील भागांवरही होतो. ह्या काष्ठपेशींच्या नळ्यांसारख्या वाहिन्या खोडांतून पानापर्यंत गेल्या असतात. जेव्हां सालींतील पेशी-भित्तिका पाण्याने तणाणून जातात, त्या वेळेस ह्या काष्ठवाहिन्या बहुतेक रिकाम्या असतात. खेचिलेले पाणी अगदी जवळच्या भित्तिकेंतून हळू हळू ह्या काष्ठवाहिन्यांत ओतिले जाते; पुढे ते जवळील पेशीतील पाणी आकर्षून लौकर जलदीने वर नेणे हा काष्ठवाहिन्यांच्या भित्तिकेचा स्वभावधर्म आहे. ह्याप्रमाणे पाण्याचा उपसा काष्ठवाहिन्यांत झाल्यावर पुनः नवीन पाणी केंसांतून पूर्वीसारखे शोषिले जाते, व पूर्वीसारखीच तणाणलेली

९४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
स्थिति पेशींत येते. पण पूर्वीप्रमाणेच त्याही पाण्याचा उच्छ्वास काष्ठवाहिन्यांत होऊन सारखा पाण्याचा प्रवाह वर जाऊ लागतो. खरोखर केसाच्या पेशी तसेच सालींच्या प्रदेशांतील ( Cortex) पेशी पंपाप्रमाणे पाणी काष्ठवाहिन्यांत खेचून वर चढवीत असतात. पाणी खेचण्यास उपयोगी पडणारी शक्ति ही खरोखर मुळांतील पेशीच्या तणाण्यामुळे उत्पन्न झाली असते. ही शक्ति म्हणजे पेशीच्या तणाणण्यास मिळालेले एक प्रकारचे प्रत्युत्तर होय. ह्याच शक्तीमुळे वनस्पतिशरीरांत पाणी सारखें वर चढत असते, अशा शक्तीस मूलजनितशक्ति ( Root Pressure ) म्हणतात.  ही शक्ति केवळ पाण्याच्या जोराने उत्तेजित असते, असे म्हणता येणार नाही. ही उत्पन्न करण्यांत सजीवतत्त्वाचेही सहाय्य असते. तिला व्यवस्थित स्वरूप आणून ती सारखी चालू राखणे हे सजीवतत्त्वामुळेच होते. कारण जेव्हां पाणी ऑसमॉसिस क्रियेने सालीच्या प्रदेशांत शिरते, त्यावेळेस पेशीतील सजीवतत्त्व उत्तेजित होऊन त्या फाजील शिरणाच्या पाण्यास आपल्या कणांतून पुढे जाण्यास जागा देते. सजीवतत्त्व संकुचित न होतां पाण्याबरोबर आपण आपलं घनत्व कमी करून पाण्यास दुसरे पेशींत जाण्यास सुलभ करते. जर पाणी शिरले असतां सजीवतत्त्व पातळ न होता तसेच राहते, तर पाण्यास पुढे जाण्यास जरा अडचण पडती. पण तसे न होतां व्यवस्थितपणे पाणी बाहेर दुसरे पेशींत जाण्याची तजवीज सजीवतत्व पातळ होण्याने होते. काष्ठग्रंथीतील वाहिन्यांत सजीवत्त्वाचा अभाव असल्यामुळे त्यात सारखे पंपाप्रमाणे पाणी ओतण्याची व्यवस्था झाली म्हणजे बस्स असते. सारखे पाणी ढकलल्यामुळे पहिले पाणी वर वर चढत जाते. शिवाय हे पाणी पानांत पोहोंचल्यावर शिरांतून बाहेर हरित् पेशींत जातांना पूर्वीप्रमाणे पुनः ऑसमॉसिस क्रिया सुरु होते. ह्या पेशींतील जीवनकणाचे घटक अधिक शोषक असल्यामुळे शिराच्या सर्द भित्तिकेपासून भराभर पाणी ओढून घेतात. रात्रीच्या वेळी बाष्पीभवन बंद असल्यामुळे ऑसमॉसिस् क्रिया व त्यामुळे मुळ्यांत पेशी तणाणण्यापासून उत्पन्न होणारा पाण्याचा जोर ही दोन्ही चांगली दृष्टीस पडतात. अंतर प्रदेश पाण्याने तणाणण्यामुळे वाहिन्यांतून पाणी वर पानापर्यंत चढत जातें. दिवसा उजडी पानांतील पाण्याचा उपसा होत असल्यामुळे ही क्रिया स्पष्ट दिसत नाही. रात्री पाण्यास बाहेर जाण्यास मार्ग नसल्यामुळे पानाच्या

११वे ].  ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति (Root pressure).  ९५
-----
अग्रांतून दंवासारखे बिंदू पानाच्या पृष्ठभागांवर चमकू लागतात. पानांतील पेशींत फाजील पाणी भरल्यामुळे कधी कधी बाह्यत्वचा फाटून बाहेर पाणी गळू लागते. उन्हाळ्यांत असले प्रकार फारसे आढळत नाहींत. पानांतून अशा रीतीने पाणी वाहणे म्हणजे खरोखर वनस्पतीचे एक प्रकारे नुकसान होते. कारण ह्या पाण्यात पुष्कळ उपयोगी पडणारी पौष्टिक द्रव्ये असतात. अशा पाण्याचे रसायनशास्त्र-पद्धतीने पृथक्करण केले असतां किती तोटा होतो, हे सहज कळणार आहे. ही निरिंद्रिय द्रव्ये अशा रीतीने बाहेर न जाती तर त्यांचा उपयोग वनस्पति-आयुष्यक्रमांत होऊन त्यांपासून पोषणकार्य घडले असते. तसेच त्याचा परिणाम वनस्पतीच्या आरोग्यावरही झाला असता.

 बाष्पीभवन होत नसतांना ह्या शक्तीचा जोर मोजितां येतो. वसंत ऋतूच्या सुरवातीस पाने ही पूर्ण आली नसतां द्राक्षाचा खोड आडवा कापून टाकावा. ह्या कापिलेल्या भागांतून पाण्याचा प्रवाह बाहेर पडू लागेल. हा प्रवाह मूलजनितशक्ति-परंपरेने सारखा वाहत राहतो. द्राक्षाच्या खोडांतच हा चमत्कार दिसतो असे नाही. इतर पुष्कळ वनस्पतींमध्ये ह्या प्रकारचा चमत्कार दिसून येईल. लिंबाच्या खोडांतून कधी कधी अशाच प्रकारचा रस आपोआप गळत असतो. हा रस सुद्धां मूलजनित शक्तीचा एक प्रकार आहे.

 मुळांचा जोर इतका असेल व त्यापासून असे कार्य घडत असेल, असे जोंपर्यंत पूर्णपणे माहीत नव्हते, त्यावेळेस मुळावरील केसांत पाणी शिरणे तसेच ते पाणी वर चढणे ही कार्य केशाकर्षक (Capillary) असावीत, असा समज होता. तेलामध्ये वात बुडवून ठेविली असतां, आपोआप हळू हळू वातीच्या अग्नांकडे तेल येत जाते. हा नैसर्गिक चमत्कार नेहमी पाहण्यांत असतो. तद्वतच तो चमत्कार वनस्पतिमुळांत पाणी शिरण्यासंबंधी असावा, असा पूर्वीचा समज होता. सूक्ष्म मुळ्या अथवा मुळावरील केंस, ही जमिनीतील पाण्यात बुडाली असून, जसे तेल वातीतून वर चढते, त्याप्रमाणेच पाणी त्या केसांतून आपोआप वर चढते. तसेच पाण्याच्या कमी अधिक घनतेप्रमाणे पाणी वर चढत असावे असा नेहमी कोटिक्रम करण्यात येत असे. कारण जितकें तेल पातळ असते, तितके ते लवकर वातींत शिरून वर येते, तसेच जितकें तें घन व घट्ट असते, त्या मानाने ते सावकाश चढत जाते.

९६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
ह्याच प्रकारची पाणी वर चढण्याची क्रिया असावी, असे अनुमान काढीत असत; पण हा कोटिक्रम अलीकडील शोधाअंती चुकीचा ठरत आहे. एक तर कांहीं वाहिन्यांची बुडाकडे तसेच अग्रांकडे तोंडे बंद असल्यामुळे अशा प्रकारची केशाकर्षक (Capillary) क्रिया त्यांमध्ये सुरू होणे अशक्य असते. तथापि जरी अशी क्रिया सुरू झाली अशी कल्पना केली तरी, त्यामुळे पाणी दूरवर चढणे शक्य नसते. फारतर थोड्या अंतरापर्यंत ह्या क्रियेने पाणी वर जाऊ शकेल. पण मुळाच्या क्षुद्रपेशीपासून खोडांत, तसेच खोडांतून पानांस अथवा निरनिराळ्या फांद्या व पोटफांद्यांतून शेंड्यापर्यंत पाणी वर चढणे ह्या रीतीने शक्य नसते. कारण आम्हांस शेंड्यावरील पानांतून सुद्धां पाणी गळलेले दृष्टीस पडते. शिवाय ही गोष्ट उघड आहे की, पुष्कळ झाडांत जेव्हां बाह्यत्वचेपासून बाष्पीभवनाचा जोर कमी असतो, अशा वेळेस, द्रवात्मक रस जोराने वर चढत असतो; म्हणजे बाष्पीभवनामुळे उत्पन्न होणारा अंतर जोर नसतांनासुद्धां ज्याअर्थी रस जोराने वर चढतो, त्याअर्थी दुसरी एखादी शक्ति अशी असली पाहिजे की, त्यामुळे हे रसाचे वर चढणे घडत असले पाहिजे, व ती दुसरी शक्ति म्हणजे ' मूल जनित शक्ति' ( Root pressure ) असे आतां सिद्ध झाले आहे.  झाडांस पूर्ण पालवी फुटला नसतांना हिवाळ्याचे शेवटीं व वसंतऋतूचे सुरवातीस हे चमत्कार विशेष पाहण्यांत येतात. खरोखर हिंवाळ्यांत झाडांतून पाण्याचे बाष्पीभवन कमी होत असते, शिवाय ज्यांतून बाष्पीभवन होते ती साधने म्हणजे झाडांची पाने ही त्यावेळेस पूर्ण नसतात. म्हणून अशा चमत्कारांत बाष्पीभवन अथवा बाष्पीभवनोत्पादित जोर ह्यांचा मुळीच संबंध नसतो. केवळ ऑसमॉसिसक्रियेने पेशींत पाणी शिरून मुळांच्या पेशी तणाणून त्यापासून उत्पन्न होणारा मुळांचा जोर (Root pressure ) असल्या चमत्कारास कारणीभूत असतो. मुळांच्या शोषकक्रिया सभोवतालच्या परिस्थिती वर अवलंबून असतात. विशेषेकरून हवेची तसेच जमिनीची उष्णता असली तर मुळाच्या जोराने बाहेर जाणारे पाणी अधिक जोराने वाहू लागते, व त्यामुळे वनस्पतीचे बरेच नुकसान होते. ज्यावेळेस बाष्पीभवन अधिकाधिक होऊ लागते, त्यावेळेस मृळांत उत्पन्न होणाऱ्या जोरामुळे घडणारे चमत्कार कमी होऊ लागतात. तसेच उलट जेव्हा हे चमत्कार अधिक होत असतात, त्यावेळेस

११वे ].  ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति (Root pressure).  ९७
-----
बाष्पीभवन कमी असते, म्हणजे एकंदरींत ह्या दोन्ही क्रिया परस्पर विरोध वेळेत चालतात, असे म्हटलें असतां चालेल.

 मुळाच्या शोषक क्रियेस ऑक्सिजन वायूचीही जरूरी असते. जेव्हा मुळ्यांस पूर्ण स्वच्छ हवा मिळत असते, अशावेळेस त्यांची शोषकं, क्रिया जोराने चालू राहते, पण स्वच्छ हवेच्या अभावी ती क्रिया मंद होते. म्हणूनच शेतकरी जमीन नांगरून पूर्ण रंध्रमय करून टाकतो. त्यामुळे जमिनीत घुसणाच्या मुळ्यांस त्या रंध्रांतून स्वच्छ हवा मिळून तीं आपलें अन्न शोषण करण्याचे काम उत्तम करितात.

 जमिनीतील क्षारांच्या प्रमाणावरही मुळाची शोषकक्रिया अवलंबून असते. जसे जमिनीत मीठ पुष्कळ असले तर तेथील पाणी बहुतेक खारट असून मुळांत शिरण्या ऐवजी मुळांतील पाणी कधी कधी बाहेर जाऊ लागते.

 जेव्हां वनस्पति लहान व कोवळी असते, त्यावेळेस तीस जरूर लागणारे पाणी व इतर पौष्टिक पदार्थ थोड्या प्रमाणांत पुरतात; पण जसे जसे ती वनस्पति वाढू लागते, त्या प्रमाणांत तिच्या गरजा अधिक वाढत जातात. कोवळेपणी मुख्य मुळांवरील केंस अन्न शोषण करण्याचे काम करीत असतात, पण जेव्हां जून स्थिति येत जाते. त्यावेळेस केसांची जागा मोठी विस्तृत असण्याची जरूरी असते. म्हणूनच मुख्य मुळापासून पुष्कळ पोटफांद्याच्या अग्रा जवळ नवीन नवीन केस येतात. हे सर्व केंस आपले शोषणकाम करीत असल्यामळे वनस्पतींच्या वाढत्या गरजा भागतात. नाहीतर अन्नशोषण कमी होऊन अन्नाचा खर्च जेव्हां जास्त होऊ लागतो, त्यावेळेस झाडास ओढती लागली असे म्हणतात. ह्या ओढतीचा वनस्पतीच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. प्रत्येक केंस आपल्या विशिष्ट जागेत शोषणाचे काम करीत असतो, व ह्या रीतीने जेव्हां सर्व केंस आपल्या कामांत गुंतले असतात, त्यावेळेस जमिनीची किती जागा त्याचे आकर्षण-अंमलाखाली येते, ह्याची कल्पना सहज करितां येणार आहे.

 जमिनीच्या खरखरीत कणांशीं केंसाचा संबंध असल्यामुळे ते लवकर झिजून शेषणाचे कामांस निरूपयोगी होतात; पण सजीवतत्त्व त्यांचे ऐवजी नवीन केंस उत्पन्न करण्याची सोय करून शोषण कामास अडथळा होऊ देत नाहीं.
९८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
वर्षाचे सर्व ऋतूंत अथवा एका दिवसाचे सर्ववेळी मुळ्या आपले शोषणकाम सारख्या वेगाने चालवितात, असे नाहीं; कांहीं ऋतूत अथवा दिवसाचे कांहीं विशिष्टवेळी ते काम जोराने चालते; तसेच उलटपक्षी कांहीं वेळी ते मंद अथवा अगदी शिथिल होते. ह्याच फरकामुळे एका विशिष्ट ऋतूंत झाडांची वाढ मुळी होत नाही. कारण त्यावेळी मुळ्या आपले शोषणकाम फारच मंदरीतीने चालवितात. आतां असें कां होते, ह्याचे समर्पक उत्तर देणे फार कठीण आहे, व अजून त्यासंबंधी फारसे शोध झाले नाहींत. दिवसा व रात्री प्रकाश भिन्न भिन्न असल्यामुळे अथवा वर्षाचे ऋतूंत सारखा सूर्यप्रकाश नसल्यामुळे, त्याचा परिणाम मुळ्याच्या शोषक क्रियेवर होत असेल असे वाटते. कोवळेपणी शोषकपणामध्ये प्रकाशभिन्नत्वामुळे दिसणारा फरक फारसा आढळत नाही; पण जसा जसा जुनेपणा झाडांस येत जातो, त्याबरोबर हा फरकही दिसू लागतो.
---------------