रुणझुणत्या पाखरा/आई म्हणोनी कोणी

विकिस्रोत कडून
 आईचा 'अवकाश... स्पॅन इतका विशाल असतो की शब्दांचे घुमारे नेहमीच नव्या उन्मेषाने मोहरत जातात. तरी परिपूर्ती होत नाही. अधुरेपणा सलत रहातो. त्या दोघींना जाणवले की आई विषयी विविध क्षेत्रातील नामवंतांना बोलते करायचे. त्यातून 'आई' या पुस्तिकेची निर्मिती. जणू या आजच्या आयांनी त्यांच्याच नव्हे तर प्रत्येकाच्या आईला वाहिलेली ती स्मरणांजली.
 इवल्या डोळ्यांना अवघा निसर्ग, गंध...रंग... स्पर्श यांतून उलगडून दाखवणारी आई. संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देणारी, निर्भय रहा असे स्पर्शातून सांगत धाडस देणारी आई वात्सल्याचा निरंतर झरा, संकटांना झेलतांना 'आधारवड' होऊन पाठीशी राहणारी, बुद्धी एवढेच गुणार्जनाला महत्व देणारी, दारिद्रय... विषम परिस्थिती या सर्वांशी हसत जुळवून घेणारी महामना आईच!
 तिचा स्पर्श विलक्षण गारवा आणि ताजवा देणार. म्हणूनच कांदिवलीच्या अनघा धाडी म्हणतात,
...पहिल्या पावसात भिजतांना, माय तुझी आठवण येते किंवा.
जेव्हा आला पाऊस पहिला
भिजतांना जाणवली तुझ्या हातांची ऊब.
 ती साक्षर नसली तर निरक्षर कसे म्हणावे तिला? कारण त्याही पलिकडचे शहाणपण... सुजाणत्व तिच्यात असतेच. चैत्रगौरीचं भिंतीवरचं 'लिवणं', अंगणात शेणसडा घालून त्यावर रांगोळी रेखणं, गवरण्यांचा देखणा मांड मांडण हे जमणार तिलाच. भलेही तिने कलेचा... सौंदर्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला नसेल. वयाच्या सुरकुत्यांना निसर्गाची देणगी म्हणून स्विकारत, मनातली उत्सुकता सुकू न देता कंम्प्युटरवर काम करणाऱ्या मुलाशेजारी बसून जिज्ञासेने प्रश्न विचारणारीही आईच. आई म्हणजे साक्षात् उर्जेचा चिरंतन झरा.
दासू वैद्य यांचे शब्द. त्यांचे असले तरी प्रत्येकाच्या तनामनातले.
प्रत्येक आईचा मुलगा
कवी असूच शकत नाही
पण प्रत्येक मुलाची आई
त्यांच्यासाठी एक कविता असते
न विसरणारी...
 प्रत्येक स्त्री जेव्हा 'आई' होते किंवा निर्मितीच्या प्रलयंकारी वेदना जवळून अनुभवते तेव्हा 'आई' झाल्यावर तिलाही आईवर कविता लिहाविशी वाटतेच. भलेही ती कवी नसेल. अशीच एक कविता अनामिकेची
...अंधाराला हिरमसून पाने मिटून घ्यावीशी वाटतात
तेव्हा ...?
क्षणात
काही क्षण असे येतात
पूर्वी इतकेच सजून धजून
विझू विझू पहाणाऱ्या
आठवणींना
नवी पावले
जोडून.
आई तुझ्या आठवणींना
लगटून...
 'आई' ही पुस्तिका चाळतांना मलाही माझी आई आठवली. कणखर मनाची, आतल्या आत अश्रूंना बांध घालणारी. १९५५ चा प्रसंग. माझे पपा... शंकररावांनी गोवामुक्ती संग्रामात जाण्याचे ठरवले होते. त्यांना निरोप देण्यासाठी धुळ्याच्या स्टेशनवर गर्दी लोटली होती. माझ्या डोळ्यांचा बांध फुटला होता. मी असेन १४/१५ ची. "शैला, तुझे एकटीचेच पपा सत्याग्रहात चालले नाहीत. अनेकांचे आईवडिल सामिल झाले आहेत. अभिमानाने हसत निरोप दे". आईने कडक शब्दात मऊपणे डोक्यावरून हात फिरवत बजावले.
 आईला लिव्हरचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तिचे श्रद्धास्थान असलेली तिची ज्येष्ठ भगिनीसमान असलेली मैत्रिण, ती व इतर काही मैत्रिणींनी महिलांचे आरोग्य व शिक्षणासाठी एक संस्था काढली होती. त्या संस्थेनेही पंचविशी पार केली होती. तेथे काम करणारा सहाय्यक, हिशेब तपासनीस व मैत्रिण यांनी संगनमताने एका महत्वाच्या निर्णयात्मक बैठकीस आई हजर नसतांना तिची 'सही' कुणाकडून तरी करवून घेतली. शासकीय ऑडीट तपासणीत ते उघडकीस आले. मृत्यूशय्येवर दिवस मोजणाऱ्या कनिष्ठेला 'तू लेखी खोटी साक्ष दे' असे सांगायला ज्येष्ठा आली. पण कनिष्ठा ठाम होती. अवघ्या पाच दिवसानंतर आईने चिरविश्रांती घेतली.
 शेवटच्या क्षणी तिच्या ओठावर सून, कन्या आणि तिला संकटातून बाहेर काढून तिचे जाज्वल्य व्यक्तिमत्व फुलवले अशा मानसकन्यचे नाव होते. आई, संध्याकाळी नातवंडांची दृष्ट काढत असे. 'इडापिडा टळो, आल्यागेल्यांच्या मनात चांगले विचार येवोत आणि सगळ्यांच्या लेकराबाळांचे आयुष्य शतायुषी होवो' ही तिची प्रार्थना असे.
'ती आई होती म्हणूनी
घन व्याकूळ मीही रडलो...'
 या कवी ग्रेसच्या शब्दातली 'व्याकुळता', घन शब्दातले 'चिरंतन भारलेपण' आणि नसण्याच्या वेदनेची लय मला आजही अस्वस्थ करते.
 आई अवघ्या अवकाशाला व्यापून उरत असते. ती शब्दात न मावणारी असते. कशी असते ती?
शिकेकाईचा सुगंध
भरून राहिलाय आसमंतात
तिने केव्हाच मोकळा
सोडलाय गैरसमजांचा आंबाडा
फिरतोय तिच्या मुक्त केसांतून
समजुतदार वारा
आणि त्याला सापडलेत
आईचे हरवलेले डोळे
तिच्याच पापणीत
(दासू वैद्य)