मनतरंग/सूर्य आणि भूमीचे अक्षय नाते

विकिस्रोत कडून

  भूमीतून निर्माण होणाऱ्या अन्नाशी; वनस्पती, कंदमुळे, शाकभाजी, धान्य, फळे, फुले यांच्याशी आकाशातून बरसणाऱ्या पाऊसधारांचे नाते जेवढे जवळचे तेवढेच घनिष्ठ नाते सूर्याचे असते. सावनी ऊनाचा रेशमी स्पर्श कवींना प्रेमिकांना आवडत असला तरी भूमी मात्र ऐन ग्रीष्मातल्या सूर्याच्या दाहक स्पर्शाची वाट पाहात असते. कुसुमाग्रजांनी पृथ्वीच्या प्रेमगीताची गाथा लिहिताना म्हटलेय,

नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे...

 पण सूर्याच्या दूरतेतूनच पृथ्वीचा शृंगार सजतो. सूर्याला 'अपागर्भ' म्हटले आहे. 'आपःसूर्ये समहितकाः' असे तैतरिय अरण्यकात (१.८.१.) म्हटले आहे. सूर्य हा धन्वन्तरी असून त्याचे बिंब हा अमृतकलश आहे. या कलशातून बाहेर पडणाऱ्या जलात औषधी गुण असतात अशी श्रद्धा आहे. पृथ्वीवर पावसाच्या रूपाने येणारे जल...पाणी; सूर्यमंडलातून येते अशी फार प्राचीन कल्पना आहे. म्हणूनच सूर्याला 'सरस्वान' म्हटले आहे. ज्याच्यात 'रस'...ऊर्जाजल आहे असा 'स-रसवान सूर्याला बीजस्वरूप मानले आहे. 'अपागर्भ' या संकल्पनेचा अर्थ सायनाचार्य 'वृष्ट्युदकानां गर्भषदुत्पादकम्' असा लावतात. सूर्य स्वनिष्ठ उदकातून सृष्टीला फळवितो, तिला सुफलित करतो अशी प्राचीन समजूत आहे.

 जमिनीवरचे पाणी सूर्याच्या किरणांच्या माध्यमातून वाफ घेऊन वर जाते. ते पाणी सूर्यगोलकात गेल्यावर त्यात अमृताची शक्ती येते. आषाढ, श्रावण, भाद्रपदात ते अमृतमिश्रित पाणी भूमीवर बरसते आणि त्यातून हरितलक्ष्मीचे सौंदर्य बहरते आणि म्हणूनच केवळ भारतीय संस्कृतीच नव्हे शक, कुशण, इराण, रोम येथील संस्कृती सूर्यपूजक होत्या. पेरू देशात आजही अनेक सूर्यमंदिरे सापडतात. सिरिया, इजिप्त, जपान या देशात सूर्यपूजा महत्त्वाची होती.
 अरुणाचल राज्याच्या उत्तरेकडच्या कोपऱ्यात तगीन नावाची जनजाती राहते. ते सूर्याला आई मानतात. या आईला 'दोनी' म्हणतात. रेड इंडियन लोक सूर्यपूजक होते. ते पहिली शिकार सूर्यास अर्पण करीत. महाभारतात सूर्यपूजा आहे. युधिष्ठिर सूर्यपूजक होता. कनोजचा राजा हर्षवर्धन हा बौद्ध असला तरीही महेश्वर, गौरी आणि सूर्य यांची उपासना करी. या तीनही देवता अन्नसमृद्धीशी जोडलेल्या आहेत.
 संक्रान्त, रथसप्तमी, होळी, चैत्र पाडवा, अक्षयतृतीया ही व्रते सूर्यपूजेशी निगडित आहेत. चैत्रतृतीयेला माहेरपणाला आलेली गौराई अक्षयतृतीयेपर्यंत निवांतपणे माहेरी राहते. या काळात कैऱ्या, काकड्या, टरबूज, खरबूज यांची रेलचेल असते. उन्हे प्रखर होत जातात. यादिवशी गौरीची पाठवणी करताना गरजू व्यक्तीला माठ, टरबूज देतात. थंडगार पन्हं पिण्यास देतात. गौराई घरालाच नव्हे तर शेतभाताला अक्षय समृद्धीचा आशीर्वाद देऊन रानात परतते. होळीच्या राखेत दोडकी, पडवळ, गिलकी, तोंडली, भोपळा आदी वेलीभाज्यांच्या बिया मिसळून मडक्यात घालून ठेवतात. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर घरालगत आळी तयार करून त्यात त्या रोवतात. या मुहूर्तावर रोवलेल्या वेलींना उदंड फळे येतात, अशी शेतकरी-स्त्रियांची श्रद्धा आहे. गोवऱ्यांची राख, बियाणे निर्जंतुक करते हे शास्त्रीय सत्य आहे. अक्षयतृतीयेला महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकरी पेरणीचा मुहूर्त करतो. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त. खानदेशात या मुहूर्तावर मुली गौर मांडून कानबाई या खानदेशातील अत्यंत पूजनीय अशा देवीची गाणी टिपऱ्या खेळत गातात. या मुहूर्तावर लग्न लावण्याची प्रथा भारतभर प्रचलित आहे. कर्नाटकात या दिवशी कृषिसंबंधीचे भविष्य जाणून घेण्याची प्रथा आहे.
 तर अशी ही अक्षय समृद्धीच्या शुभेच्छा देणारी वैशाखी तृतीया, स्त्रियांना विशेष पूजनीय वाटते. कारण वैशाखाचे चटके सोसल्याशिवाय हिरवाईची तृप्ती जीवनात बहरत नाही हे स्त्रीच जाणते. कारण तिचे जिणेच जणू असे,

वैशाखाच्या वणव्याला
घेत्ये पदरी बांधून
इवल्याशा पानांवर
देत्ये श्रावण गोंदून...
दोन रंग दोन पोत
सुई-दोऱ्याने ओविले
गंगाजमनी ह्यो शेला
नावं नई ठिऊ यालो...!!"

■ ■ ■