बोलावणं आल्याशिवाय नाहीं ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> सांगूं तरि आतां किती जणांना ? येतो तो हेंच विचारतो ! - असतील ! चार नाही छप्पन्न नोटिसा निघाल्या असतील ! करायचय काय मला त्यांच्याशीं ! जायचं असेल, त्यांनी जावं खुशाल ! मी थोडाच जातोंय तसा ! - अरे राह्यलं ! नाहीं, तर नाहीं ! इथं थोडंच माझं कांहीं अडलं आहे ! हपापलेली चार खतरुड पोरं गोळा करा, आणि हव्वं तें करा म्हणावं ! - नाही सगळ्या गॅदरिंगच्या नाटकाचा बट्याबोळ झाला, तर नांव कशाला ! - अबे जारे ! मोठा शाळेचा मला अभिमान सांगतो आहे ! आम्हांला तेवढा अभिमान असावा ! आणि शाळेला ? तिनं हवं तसं आम्हांला लाथाडावं होय ? - अलवत ! नाहींच भागायचं नुसल्या नोटिशीनं ! कांही थोडीथोडकी वर्ष नाहीं कामं केलेली मीं ! अन् तींही पुनः अशीं तशीं ? - चौथींत आल्याबरोबर धडाक्याला कॅन्यूटचं काम ! सारख्या टाळ्या ! तीच तर्‍हा दुसर्‍या वर्षी ! पुढें पांचवीत येतांच .... अश्वत्थाम्याचें काम ! जो कांहीं त्यांत माझा आवाज लागला, तसा अद्याप एकाचाहीं कोणाचा लागला असेल तर शपथ ! - दोन रे का ? पांचवीत तर ओळीनें तीन वर्ष कामं केली मीं ! अन् सहावीतली दोन ठाउकच आहेत तुम्हांला ! - नाहीं, संभाजीचं काम तें दुसर्‍या वर्षी ! वा ! त्या वर्षी तर किती जणांनीं आंत येऊन सांगितलं कीं, धंदेवाल्यापेक्षाही तुझं काम छान झालं ! ' - अरे त्या वर्षी तर स्पेशल पदक मिळालं मला ! - तेंच पुनः सातवींत आल्यावर ! पहिलंच अगदी सीझरचं काम - दुसर्‍याला चांगलं दिलेलं .... पण त्याचं काढून मुद्दाम मला दिलं ! नाटक पाह्यला कोणी युरोपियन आला होता, त्यानं काम पाहून .... विशेषतः ऍक्सेंटस ऐकून .... तोंडांत बोट घातलं म्हणतात ! - पुढं दुसर्‍या वर्षी ? - हां बरोबर ! धुंडिराजाचं काम ! - तेव्हां तर काय .... हंसता हंसतां पुरेवाट झाली लोकांची ! अन् सगळ्यांत बाबा कळस झाला गेल्या वर्षी ! - शॉयकॉलचं काम ! - पाहून लोक इतके चिडले कीं, एकनं तर चकचकीत घोंडा मारला स्टेजवर ! - तेव्हां बोला आतां ! इतका जिथं माझा अनुभव .... आणि दर्जा वाढलेला, तिथं असल्या फासक्याफुसक्या नोटिशीनं जायचं ! - साफ नाहीं यायचा तसा मी ! मास्तरचा जर येवढा ऐटा आहे .... सांगितलं ना ! मास्तरांवाच जर इतका तोरा आहे, तर साफ यायचा नाहीं मी बोलावणं आल्याशिवाय.... <poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.