प्रशासननामा/प्रिय सर

विकिस्रोत कडून



प्रिय सर



 प्रिय सर,

 पु. ल. देशपांडे यांनी कवी कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'ने भारावून गेलेल्या अवस्थेत म्हटलं होतं की, 'मी विशाखा नक्षत्रावर जन्मलो आहे.' तसंच मला म्हणावंसं वाटतं की मी 'राजा' नक्षत्रावर जन्माला आलो. तुमच्या हाताखाली प्रोबेशन अधिकारी म्हणून आलो आणि खऱ्या अर्थाने द्विज झालो. ट्वाईस बॉर्न. गुरू शिक्षण देतो, तेव्हापासून विद्यार्थ्याचा नवा जन्म सुरू होतो. माझ्यातला जो प्रशासक आहे, त्याचा जन्म तुमच्या सहवासात आल्यापासून झाला आहे यात शंकाच नाही.

 बँक सोडून महसूल खात्यात अधिकारी म्हणून थेट आपल्या जिल्ह्यात प्रोबेशनसाठी आलो. कलेक्टर कचेरीतला पहिला दिवस आजही स्मरणात आहे. तो दुसरा शनिवार होता. शासकीय सुटीचा दिवस. बँकेत काम करणारा मी, सुटीची कल्पना मला नव्हती. एका लॉजवर सामान टाकून, फ्रेश होऊन दहा वाजता ऑफीसला गेलो तर तिथं सारा शुकशुकाट. एक शिपाई, कलेक्टरांचा स्टेनो. चिटणीस नामक एका अधिकाऱ्यानं माझं स्वागत केलं. 'सर, सकाळी बस स्टॅडवर कलेक्टर साहेबांच्या सूचनेप्रमाणे जीप पाठवली होती. पण आपणास आम्हाला ट्रेसआऊट करता आलं नाही. तुम्ही कुठं उतरलात? विश्रामगृहात आपल्या नावानं सूट रिझर्व करून ठेवला आहे आम्ही.' मी आ वासून त्याच्याकडे पहात राहिलो. सर, मी हे विसरून गेलो होतो की, आज रुजू होत असल्याबद्दलची मी तुमच्या नावानं तार केली होती. तुम्ही किती आत्मीयतेने माझी व्यवस्था केली होती! सुट्टी असूनही तुम्ही कार्यालयात काम असल्यामुळे आला होता. माझी तुमची भेट झाली आणि का कोण जाणे, मला एकदम निश्चिंत वाटलं. तुमच्या व्यक्तिमत्त्वात असं काही रसायन आहे की, समोरचा माणूस आश्वस्त होतो. समोरच्याला ‘ॲट इझ' करीत संपर्क साधण्याची तुमची अनोखी शैली नंतर अधिक तपशिलाने जाणवत गेली. पण पहिल्या भेटीत एवढा मला दिलासा जरूर मिळाला की, बँकेची आरामशीर नोकरी सोडून प्रशासनाच्या धकाधकीत येण्याचा आपला निर्णय चुकला नाही. अँड आय डीपली फेल्ट देंट, आय ॲम इन सेफ हँडस् हू कॅन मोल्ड मी इन राईट डायरेक्शन!

 त्यानंतर पुढील आठवड्यात तुम्ही बोलावलेली व माझी पहिलीच असलेली महसूल अधिकाऱ्यांची बैठक मला आठवते. जवळपास शंभर विषय कार्यक्रमपत्रिकेवर होते. दोन दिवस ती मीटिंग सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत चालली होती. ती मीटिंग माझ्यासाठी सर, एक ग्रेट अशी ‘लर्निंग प्रोसेस' होती. हीच काय, पण तुमच्या कलेक्टरशिपच्या काळातली प्रत्येक बैठक मला काही ना काही शिकवून गेली. सर, मी तोंडदेखली तारीफ करणार नाही, पण खरंच, बैठक कशी घ्यावी याचा वस्तुपाठ म्हणून तुमच्या बैठकीकडे मी अंगुलीनिर्देश करीन. तुम्ही खरंच हाडाचे शिक्षक आहात. तुमची बैठक ही केवळ कामाचा आढावा घेणारी व काम कमी झालं, शासकीय उद्दिष्टांची पूर्ती झाली नाही म्हणून अधिकाऱ्यांना केवळ झापाझापी करणारी नसते, तर प्रत्येक विषयाचं महत्त्व समजावून सांगणं, तिचं स्वरूप लक्षात येऊन कामाचं नियोजन करणं आणि अंमलबजावणी कशी, किती टप्प्यात व किती वेळात करावी, सारं तुम्ही प्रभावीपणे सांगता. त्यामुळे कुणाही अधिकाऱ्याच्या मनात काही शंका उरत नाही आणि त्यामुळे सर्वांचं काम उंचावलं जातं!

 सर, त्या बैठकीचा एक विषय होता. 'सातबाराचे पुनर्लेखन.' जमिनीच्या मालकीचा आणि पीकपाण्याची नोंदी असणारा हा महत्त्वाचा अभिलेख शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा. एक सातबारा नोंदवहीं साधारणपणे दहा वर्ष चालते. त्यानंतर जागा संपल्यामुळे नव्याने सातबारा लिहून अंमलात आणावा लागतो. त्यावेळी तलाठी प्रचंड घोटाळे करतात, काही नोंदी उडवतात. त्यामुळे अपील प्रकरणे उद्भवतात. हे सारे संभाव्य धोके तुम्ही बैठकीत पोटतिडकीने मांडले होते.

 ‘सातबाराचे पुनर्लेखन करताना एकही चूक होणार नाही याची काळजी तहसीलदारांनी घेतली पाहिजे. गावात खऱ्या अर्थानं ग्रामसभासदृश सभा बोलावून गावकऱ्यांसमक्ष जाहीर वाचन करा आणि लोकांना जुना व नवा सातबारा द्या. सर्व तलाठ्यांना लेखी सूचना द्या, पुनर्लेखनानंतर याबाबत ज्या गावाचं चुकीच्या नोंदी बाबतचे अपील दाखल होईल, त्या तलाठ्याला तत्काळ निलंबीत करण्यात येईल.'

 सर, आपण या विषयावर अर्धा तास चर्चा केली. तुम्ही यातले से संभाव्य धोके व शेतकऱ्यांचे होणारे हाल याबाबत जे बोललात त्याचा ठसा मनावर कायम आहे.  तुमच्या बैठका दोन-दोन दिवस चालत, पण त्या कधीच बोअर होत नसत. नंतर चार महिन्यांसाठी तहसीलदार म्हणून, प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून एका दुष्काळी भागात रुजू झालो. दोन दिवसातच जाणवलं की मला तहसील कार्यालयातील प्रत्येक विषय ठाऊक आहे. नेमकं काय करायचं हे ठाऊक आहे. कर्मचारी व अनेक नागरिकांनी निरोपाच्या भाषणात माझा गौरव केला. 'रावसाहेबांनी आल्या-आल्या सखोल जाणकारीनं एकेका प्रश्नाला ज्या तडफेनं हात घातला व तो सोडवला, त्याचं कौतुक करावसं वाटतं!' सर, हे खरं तर तुमचं श्रेय होतं.

 प्रोबेशन कालावधी म्हणजे पेड़ हॉलिडे असं मानलं जातं. पण माझ्यासाठी तो ‘राजा नामक प्रशासन विद्यापीठात शिकण्याचा कालखंड होता.' माझे प्रशासकीय कामाचे धडे या काळात चालू होते! तुम्ही त्या काळात मला एवढे भरभरून देत होतात की, माझी फाटकी झोळी ते ग्रहण करायला कधी कधी अपुरी पडायची. तुमच्या परीसस्पर्शानं माझं सोनं झालं. बँकेत ओव्हरटाईमही न करणारा आणि निरुद्देश कवचातलं सुरक्षित जिणं जगणारा चंद्रकांतला पाहता पाहता तुम्ही बदलून टाकलं होतं. तुमच्यातल्या ज्ञानप्रखरतेनं माझी ज्ञान घेण्याची लालसाही उफाळून आली होती. विंदा करंदीकरांच्या कवितेची एक ओळ आठवते. 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.' सर, तुम्ही केवळ मला एकट्यालाच भरभरून देत नव्हतात, तर तुमच्याजवळ असलेलं साऱ्यांपुढे मुक्तपणे उधळत होतात. त्यांच्यातलाच मी एक. मी तो जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला. अगदी मनापासून, हे नक्की.

 सर, आज पंधरा वर्षांनी हे पत्र लिहायला घेतलं. दीड वर्षाच्या तुमच्या सहवासातला तो कालखंड पुन्हा एकदा जिवंत झाला. काय लिहू नि काय नको असं मला होत आहे.

 तुमच्या सहवासातला प्रशिक्षण कालावधी गुरुकुल आश्रमासारखा ठरला. आज महसूल अधिकाऱ्यांबद्दल व एकूणच सरकारी अधिकाऱ्यांबद्दल जो तुच्छ उपहासाची भाव समाजमनावर आहे, मीही कदाचित त्यातलाच एक झालो असतो. पण मला तुम्ही योग्य वेळी, योग्य वळणावर भेटलात. प्रशासनातही सामाजिक बांधिलकी जपता येते, याचा गुरुमंत्र दिलात. खाजगी क्षेत्राप्रमाणे सरकारी क्षेत्रातही अचूक नियोजनाचा ध्यासच घेता येतो असं नाही, तर तो जपता येतो, हे तुमच्या कामातून शिकलो. त्याचे धडे मी आजही गिरवत आहे.

 महात्मा गांधींबद्दल बर्नाड शॉ जे म्हणाला ते तुम्हालाही लागू पडतं. 'यू आर टू ग्रेट टु बिलीव्ह...'  एक आठवण राज्यपालांच्या दौऱ्याची आहे. राज्याच्या घटनात्मक प्रमुखापुढे सनदी अधिकाऱ्याने कसे पेश यावे याचे ते लोभस दर्शन होते! प्रत्येक कार्यक्रम नेटका, वक्तशीर आणि नियोजनबद्ध. रात्री भोजनोत्तर राज्यपालांना निरोप दिल्यानंतर तुम्ही अकरा वाजता ऑफिसला गेलात. मला 'बरोबर या' म्हणालात. खरं तर तीन दिवस सतत राज्यपालांसोबत आपण होता व या तीन दिवसात कार्यालयात जाता आले नाही म्हणून राज्यपालांचे प्रयाण होताच तुम्ही रात्रभर कार्यालयात बसून साचलेल्या फायलींचा ढिगारा उपसला. मी अनिमिष नेत्राने पाहात होतो. त्या थकल्या देहाची, चुरचुरणाच्या नेत्रांची रात्र आजही लक्षात आहे.

 तुमची कार्यतत्परता सतत जाणवायची. सायंकाळी घरी परतताना 'आज मला वाटतं की, पगाराएवढं काम नक्कीच केलंय.' असे तुमचे उद्गार कैक वेळा ऐकले आहेत, ते हृदयावर अमिट असे कोरलेले आहेत. तुम्हाला मध्यंतरी नागिणीचा दुर्धर आजार झाला. कमरेवर दोन्ही बाजूने लालसर पट्टे उठले. अंगात शर्ट घालणेही शक्य नव्हते. घरी लुंगी लावून वावरत होतात. हसतमुखानं, वेदना सोशीत घरातून कामकाज पाहात होतात. फोनवर प्रत्यक्ष भेटीसारखं बोलून लोकांची काम करीत होतात. तशी कार्यसिद्धी दुर्मीळच. तसा आजही माझा प्रयत्न असतो. एक गमतीची बाब सांगतो. नंतर मलाही भूमला असताना नागीण झाली. कुठेतरी मी तुमच्याशी जुडलो गेलो होतो. मीही तुमचं अनुकरण करीत घरातून कामकाज बघितलं.

 तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाचे रूपच पालटून टाकलं होतं. ते लोकाभिमुख व पारदर्शी केलं. त्यासाठी जनतेच्या नित्य कामाबाबत तहसील कार्यालय माहितीफलक लावून जनतेची कामे जलदगतीने करण्याचा प्रयत्न केला. आज नगरचा कार्यालयीन कामकाजाची लखिना पॅटर्न म्हणून ओळखला जातो, तो प्रथम तुम्ही सुरू केला. त्यांनीही तुमचं ऋण व प्रेरणा मान्य केली आहे. पण मला खंत वाटते की, पद्मश्रीसारखा सन्मान लखिनांना मिळाला. खरं तर त्यावर तुमचा प्रथम अधिकार होता. तुमची प्रसिद्धीपराङ्मुखता आणि अकिंचन साधुवृत्ती स्वप्रसिद्धीचा डिंडिम करण्याआड आली. आणि त्याचे श्रेय इतरांना मिळालं त्याची, तुमचा शिष्य म्हणून आजही मला मनस्वी खंत वाटते.

 भेटणारा प्रत्येक माणूस म्हणजे तुम्हाला एक प्रश्न, एक दुःख वाट आणि तो प्रश्न सुटला पाहिजे, ते दुःख मिटलं पाहिजे, अशी आपली भाव असे.

 प्रश्नाचं, त्या दु:खाचं मूळ जाणून त्याचा या व्यक्तीप्रमाणे इतरांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हास्तरावर त्याचा निपटारा करायची मोहीम तुम्ही हाती घ्यायचा. कितीतरी कळीच्या मुद्द्यांना तुम्ही हात घातलात. साधी दरवर्षीची सातबारावर पीकपाहाणी नोंदीची बाब. तलाठी चावडीवर बसून, चार लोकांना विचारून प्रत्येक कास्तकरानं काय पिकं घेतली याची नोंद करतात, त्यांना तुम्ही हनुमान पाहणी म्हणायचात. त्यावर्षी तुम्ही जाहीर केलंत की, अधिकाऱ्यांनी स्वतः एकेका गावाची जातीनं क्षेत्र नं क्षेत्र हिंडून पाहणी करून पीक नोंदी कराव्यात. तुम्ही स्वत:ला त्यातून वगळलं नाही हे विशेष. एका वृद्ध तहसीलदारासह मी सोळाशे सर्व्हे नंबर असलेल्या गावाची पीक पाहणी केली, तेव्हा तेच काय, मीही थकून गेलो होतो. पण तो अनुभव ‘आय ओपनर' होता.

 तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी यांनी दौऱ्याच्या वेळी दरमहा खेडेगावात काही मुक्काम करावेत असा नियम आहे. पण रेस्ट हाऊस व जीप-गाड्यांच्या जमान्यात कोणी खेडेगावी मुक्काम करीत नाही. पण तुम्ही हा उपक्रम सुरू केला. त्यामुळे प्रशासन लोकांच्याजवळ सफलतेनं गेलं. काही आडवळणी गावांना, मी सायकलवर गेलो, त्यामागे आपली प्रेरणा होती. एका गावी रात्रभर मी चक्क दारूड्यांच्या संगतीत चावडीत झोपलो होतो, छे! जागा होतो; तर दुसऱ्या एका गावी मारुतीच्या मंदिरासमोरील कट्टयावर पोलीस पाटलानं दिलेल्या नवारीच्या बाजेवर झोपलो होतो. आजही ते सारं फार दूरचं वाटतं, इतका काळ बदलला आहे. खरं सांगू, आज मीही असे मुक्काम करीत नाही.

 सर, आपला सर्वात मोठा गुण जर कोणता असेल तर गुणग्राहकतेचा! हाताखालच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं आपण मनापासून कौतुक करायचा. होय! या गुणांची वरिष्ठांमध्ये किती कमतरता आहे हे मी बघितलं आहे. याबाबत सर्वात मोठे दोषी अर्थात आय.ए.एस. वाले आहेत. तुम्ही त्याला सन्माननीय अपवाद आहात, म्हणून सिद्ध होणारं हे आजच्या काळातलं सत्य आहे. ते जर प्रशासकीय टीमचे कॅप्टन असतील तर यशाचं जरूर श्रेय घ्यावं, पण त्याचवेळी अपयशाचीही जबाबदारी घेण्याचं धैर्य दाखवावं ही अपेक्षा या आय.ए.एस. नामक केडरनं कधीच पुरी केली नाही. कायम श्रेय, यश व प्रसिद्धी याचा झोत केवळ आपल्यावरच पडावा याबाबत ते दक्ष असतात. पण सर, आपण मात्र 'तो राजंहस एक' या जातकुळीचे. त्यांच्यापासून अलग! म्हणूनच आपण एक यशस्वी आदर्श प्रशासक ठरलात, पण प्रसिद्ध नाही. अर्थात त्याची तुम्हांला कधी खंत नव्हती. कारण तुम्ही खरे निष्काम कर्मयोगी.

 प्रशिक्षण कालावधीत दोन महिने मंडल अधिकारी म्हणून फेरफार नोंदी व फेरफार अपिलांचा निपटारा मोहीम हाती घेऊन मी गावोगाव मुक्काम करून महसुली कामे हातावेगळी केली, त्याचं आपण किती कौतुक केलेत! सर्व मंडल अधिकाऱ्यांची तुम्ही बैठक बोलावलीत. दिवसभर स्वतः उपस्थित राहिलात. मंडल अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप व अंमलबजावणीवर मी दिवसभर बोललो. ते तुम्ही स्टेनोग्राफरला सांगून शब्दशः लिहून घेतले. त्या आधारे मंडल अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शिका' माझ्याकडून लिहून घेतली आणि स्वतःच्या विवेचक प्रस्तावनेसह प्रकाशित करून सर्वांना पाठवली. घरी आपल्या पत्नीला आवर्जून सांगितले, 'तू म्हणत असतेस ना, मी दिवसभर अखंड न थकता बैठकांमधून बोलत असतो. आज माझ्या चंद्रकांतनं माझ्यावर ताण केली आहे. किती छान लेक्चर दिलं!' असं कौतुक माझ्या वाट्यास पुन्हा आलं नाही.

 सर, आपला ध्येयवाद मला मोह घालतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांत मोजके अपवाद वगळले तर तो इतिहासजमा झाला आहे, असं मला खेदानं म्हणावल वाटतं! ध्येयवाद कृतीत आणण्यासाठी लागणारी व्यावहारिकताही तुमच्याजव होती. नेमकं नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत तुम्ही 'या सम हो' होतात. प्रशासनात काम करताना केवळ 'मी प्रयत्न करीन, फळाची आशा धरणार नाही' हा गीताप्रणीत अनासक्त कर्मयोग चालत नाही. कारण विकास कामात लक्ष्यं ठरवावी लागतात आणि प्रयत्नपूर्वक गाठावी पण लागतात: आपण या अर्थाने आसक्त कर्मयोगी होतात. विकास कामाचे लक्ष्यरूपी फळे मिळण्याची आशा धरणारे, पण ही फळं आम नागरिकासाठी होती. म्हण दुसऱ्या अर्थानं अनासक्तही. ही छानशी गुंतागुंत म्हणजे तुमचं वेगळं, लोभस दुर्मीळसं व्यक्तिमत्त्व. सर, हे लिहिताना मी यत्किंचितही अतिशयोक्ती करा नाही. बिलीव्ह मी!

 अण्णा हजारे यांना आपल्याबद्दल माहीत आहे की नाही, याची मला कल्पना नाही. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या लढाईत त्यांच्यासारखाच आपल्या क्षेत्रात शांतपणे, कोणतीही पोझ न घेता लढणारा एक खंदा लढवय्या म्हणजे तुम्ही आहात सर! तुम्ही किती नि:स्वार्थी आहात हे मी अनुभवलं आहे. कलेक्टर दौ-यात रेस्ट हाऊस टाळून कुठे चहा-फराळ आपण करीत होता. जेव्हा बिल द्यायला पुढे सरसावलो तेव्हा तुम्ही मला, 'मी सिनियर आहे. बिल देणार' असे म्हणून ते आपण सहजतेनं दिलंत, हे कुणाला सांगितले तर वाटेल? दौऱ्यामध्ये आपल्या बंदोबस्तात कुणाला एक पैची तोशीश लागू याची दक्षता घेणारा अधिकारी तुमच्या रूपात दिसला. आपल्या कार्यक्षेत्रात कुठे व कसा भ्रष्टाचार होतो हे जाणून ती सारी छिद्रे लिंपण्याची आप प्रशासनशैली अजोड होती.  तुमच्या बदलीनंतर शहरात जाहीर नागरी निरोप समारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने निरोप देताना निवासी उपजिल्हाधिकारी गहिवरले होते, तेव्हा तुम्ही अवघ्या दोन मिनिटात शांतपणे सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानून निरोप घेतला. भावभिजल्या प्रदीर्घ भाषणाची आमची अपेक्षा. पण तुम्ही कमळाप्रमाणे पाण्यापासून अलिप्त रहाणाऱ्या जातीचे. आम्हीच तुमच्यामध्ये नको तेवढे गुंतलो होतो.

 आजही तुमच्यासोबत तेव्हा काम करणारे तेवढेच गुंतलेले आहोत. माझी खात्री आहे. पण तरीही तुमच्या तटस्थतेचे अनुकरण करीत आहोत. पण आज परिस्थितीच एवढी विपरीत आहे की, तुमच्या ध्येयमार्गाप्रमाणे चालताना दमछाक होते. प्रसंगी तत्त्वाला मुरड घालावी लागते. डोळ्यासमोर कातडे ओढत, काही गोष्टी समजल्याच नाहीत असे दर्शवावे लागते. आपण पण हताश, उदास, निराश तर झालो नाहीत ना अशी कधी शंका येते. छे! असा विचार मनात आलाच कसा? म्हणून मी स्वत:वरच रागावतो. माझ्या हातून हे पत्र कधीच पोस्ट होणार नाही. कारण तुमच्यावर लिहिण्याच्या बहाण्याने माझी मलाच शोधण्याचा हा अल्पस्वल्प प्रयत्न आहे. तुमच्या परिपूर्णतेच्या ध्यासात तो बसणार नाही, याची मला कल्पना आहे. म्हणून ते मी माझ्याजवळच ठेवणार आहे. आणि दरवर्षी शिक्षक दिनी ते वाचून तुम्हाला माझे प्रशासनातले आदर्श गुरू म्हणून वंदन करीत भावांजली वाहणार आहे.



गर्दीचं मानसशास्त्र आणि प्रशासन




 पश्चिम महाराष्ट्रात शिंगणापूरची यात्रा ही एक महत्त्वाची व भाविकांची प्रचंड गर्दी होणारी यात्रा. चंद्रकांतची तेथे प्रशिक्षण कालावधीमध्ये चार महिन्यासाठी, अनुभवासाठी, तहसीलदार म्हणून नियुक्ती झालेली.

 महसूल खात्याच्या शिरस्त्याप्रमाणे चंद्रकांतनं पोलीस, परिवहन व आरोग्य आदी विभागांची बैठक घेऊन यात्रेची तयारी केली. ग्रामपंचायतीशी चर्चा करून मंदिर परिसर व गावात यात्रेकरूंच्या दर्शनाची व्यवस्था केली.

 चंद्रकांतला त्याचे सर्व अधिकारी पुन्हा पुन्हा आश्वस्त करत होते की, ‘सर, शेकडो वर्षांची यात्रेची परंपरा आहे, कावड घेऊन येणाऱ्या यात्रेकरूंचा क्रम, शिरस्ता ठरलेला आहे, त्याची एक परंपरा व संकेत निर्माण झाले आहेत. त्यानुसार यात्रेकरू शांतपणे व शिस्तीत दर्शन घेतात व कावडीचं पाणी महादेवावर घालून यात्रेची भक्तिपूर्ण वातावरणात सांगता होते. आपण काळजी करू नका. सारे व्यवस्थित होईल.'

 उपअधीक्षक दर्जाचे पोलिस अधिकारी पण चंद्रकांतला अशाच पद्धतीने आश्वस्त करत होते. 'पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे. यात्रा पूर्णपणे शांततेत पार पडेल.'

 यात्रेची सुरुवात भक्तिपूर्ण वातावरणात झाली. चंद्रकांत तेथील तलाठ्यास घेऊन गावात फिरून यात्रेची व्यवस्था पाहात होता. बसेसची पार्किंगची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय नीट झाली आहे का याचा त्यानं जातीनं पाहणी करून घेतली. मग तो वर मंदिराच्या परिसरात आला. यात्रेकरू शांततेमध्ये दर्शन घेत होते. मुंगी घाटातून अनेक कावडी येत होत्या. परंपरा व संकेताप्रमाणे त्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जात होता.

 तासाभराच्या पाहणी दौ-यानंतर चंद्रकांत आश्वस्त झाला. यात्रा नीटपण पार पडेल अशी आता त्याला खात्री वाटत होती. नवी नियुक्ती, कोणताही पूर्वानुभव नाही, त्यामुळे तो गेले काही दिवस अधिक सावध होता. पण पूर्ण तयारी झाल्यामुळे मनोमन खात्री पण होती. त्याचं आता फळ मिळताना दिसत होता. तलाठी त्याला म्हणाला, 'सर, मुंगी घाटातून अत्यंत अरुंद मार्गावरून कावड घेऊन यात्रेकरून येताना जे दृश्य दिसतं, ते फार पाहण्यासारखं आहे. ते पाहायला जायचं का?'

 एखाद्या छोट्या पण प्रचंड कुतूहल असलेल्या बालकाप्रमाणे यात्रेमधील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक दृश्य चंद्रकांत पाहात होता व यात्रेमधला जिवंतपणा व रोमांचकता टिपत होता. त्यामुळे मुंगी घाटातून येणारे कावडधारी यात्रेकरून पाहायला तोही उत्सुक होता.

 तो व तलाठी घाटमाथ्यावरील दरीच्या टोकाजवळ गेले व खोल दरीकडे पाहताना चंद्रकांत अचंबित झाला. दूरवर पसरलेली खोल दरी व पायवाटेवरून कावड घेऊन येणारे यात्रेकरू मुंगीसारखे दिसत होते. किती असीम श्रद्धा, जी यात्रेकरूंना खडतर पायी प्रवासाला प्रवृत्त करते व नामघोषात शारीरिक कष्टाचा विसर पडू शकतो. चंद्रकांत तसा नास्तिक, पण एक महसूल अधिकारी म्हणून यात्रा व्यवस्थापन करणे ही त्याची जबाबदारी होती. ती निभावताना व यात्रेचा अनुभव घेताना त्याला वाटलं की, श्रद्धा-अंधश्रद्धांच्या सीमारेषा किती पुसट आहेत! श्रद्धेचं एक आंतरिक बळ असतं, पण त्याचा समाजधारणेसाठी किती उपयोग होतो हा खरा प्रश्न आहे.

 त्याचवेळी एक पोलीस कर्मचारी पळत आला, घाबऱ्या स्वरात तलाठ्याचा कानाला लागत काही बोलू लागला. काही विपरीत तर घडलं नाही ना अशी शंका चंद्रकांतच्या मनाला स्पर्शून गेली. तो गंभीर चेहऱ्यानं त्या दोघांची देहबोली पाहात होता.

 काही क्षणांनी तलाठी त्याच्याजवळ येत हलक्या स्वरात म्हणाला, 'सर, आपण मंदिराच्या प्रवेशद्वारी तातडीनं गेलं पाहिजे. पोलीस व यात्रेकरूंमध्ये काहीतरी बाचाबाची झालेली दिसतेय. यात्रेकरू खवळलेले आहेत असं हा पोलीस म्हणतोय.'

 चंद्रकांत जलदगतीनं काही क्षणातच मंदिर परिसरात पोहोचला. मंदिराचं प्रवेशद्वार बंद झालं होतं. यात्रेकरूंची रांग खोळंबली होती. त्यांच्यात प्रचंड चलबिचल व अस्वस्थता दिसत होती. क्षणभर थांबून चंद्रकांतनं सर्वत्र भिरभिरती नजर टाकली व वातावरणाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. त्याचवेळी एक पोलीस अधिकारी आला व म्हणाला, 'सर, मी सब इन्स्पेक्टर खान. वातावरण तप्त आहे.'

 चंद्रकांतनं त्याच्याशी व इतर कर्मचाऱ्यांशी बोलून माहिती घेतली व लक्षात आलं की, इन्स्पेक्टर खाननी कावडधारी यात्रेकरूंना प्राधान्यानं दर्शन घेण्यासाठी मंदिरात रांग सोडून प्रवेश दिला जातो, त्याची माहिती नसल्यामुळे पोलिसीपद्धतीने हडेलहप्पी करीत कावडधारकांना अडवलं व रांग सोडून आत प्रवेश दिला नाही, त्यामुळे यात्रेकरू चिडले. त्यातील काहींनी सोबत आणलेले हातातले नारळ पोलीसांवर फेकून मारायला सुरुवात केली. परंतु त्यांच्या काही प्रमुख नेत्यांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत केलं. या गडबडीमुळे मंदिराच्या पुजाऱ्यांनी मंदिरामध्ये गडबड होऊ नये म्हणून व मंदिर सुरक्षेसाठी मुख्य प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे दोन-तीन किलोमीटर्स पर्यंत लागेली भक्तांची लांबलचक रांग पुढे सरकेनाशी झाली होती. खाली रांगेतील शेवटच्या लोकांना काय झालं हे कळत नव्हतं, त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला होता. 'मि.खान. तुम्हाला खालचे कर्मचारी सांगत होते तरी परंपरेनुसार कावडधारकांना रांग थांबवून प्रवेश देणं आवश्यक होतं, पण तुम्ही ते रोखलं. हे ठीक नाही केलं.'

 ‘पण सर, आता वातावरण तप्त झालं आहे. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण झाली आहे; आपण तालुका मॅजिस्ट्रेट आहात. आम्हाला गरज पडला तर लाठीचार्ज व गोळीबारची परवानगी द्यावी.'

 चंद्रकांत एकदम ओरडला, ‘स्टॉप मि.खान! डोंट अटर अ सिंगल वर्ड. आय विल हँडल द सिच्युएशन.'

 त्याच्या मनातं विद्युत वेगानं विचार येत होते. खाननी गोळीबारची परवानगी मागितली. ती नक्कीच काही यात्रेकरूंनी ऐकली असणार. त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया स्वाभाविकपणे भीतीची असणार. एकाकडून दुस-याकडे ही बातमी हां हां म्हणता पसरणार आणि गर्दीचं मानसशास्त्र असं असतं, की लोक अशावेळी सैरभैर होतात व पळापळी-चेंगराचेंगरी सुरू व्हायला वेळ लागत नाही. इथ पण असं होऊ शकतं. ते थांवबलं पाहिजे. त्याक्षणी काहीतरी परिणामारक कृती केली पाहिजे.

 आणि चंद्रकांतनं एक खेळी केली. तो मोठ्याने ओरडला. 'इन्स्पेक्टरसाहेब, हे यात्रेकरू आहेत, लुटारू व दरोडेखोर नाहीत. ते नेहमीच शांततेत व शिस्तीत यात्रा पार पाडतात. मला तुमच्या पोलीस बंदोबस्ताची गरज नाही. तुम्ही इथून निघून जा. मी एकटा इथे पुरे आहे. हे शंभू महादेवाचे भक्त आहेत, त्यांना मी विनंती करीन, ते शांतपणे दर्शन घेतील. तुम्ही इथून ताबडतोब निघून जा.'

 आपला अपमान झाला या भावनेने चिडून खान पाय आपटीत निघून गेला

 चंद्रकांतला अपेक्षित परिणाम दिसून आला. वातावरण हळूहळू शांत होत गेलं, “होय, आम्ही यात्रेकरूच आहोत. गुंड, लुटारू नाहीत. आम्हाला परंपरेनुसार शिस्तबद्ध दर्शन घेता येतं. त्यासाठी कशाला हवा पोलीस बंदोबस्त?"

 यात्रेकरूंच्या या बदलत्या मानसिक परिस्थितीचा फायदा घेऊन वातावरण पूर्णत: सुरळीत करावं म्हणून चंद्रकांतनं आणखी एक खेळी खेळली.

 मंदिराच्या बंद प्रवेशद्वारी हातात माईक घेऊन तो म्हणाला, “शांत व्हा. यात्रेकरूंनो, शांत व्हा. कावडधाऱ्या बाबांचा पोलिसांनी अपमान केल्याबद्दल मी, तुमचा तहसीलदार, क्षमा मागतो. माझा तुमच्या भाविकतेवर विश्वास आहे. तुम्हाला फक्त दर्शन हवं आहे. ते दहा मिनिटात सुरू होईल. मी तुमच्या भरवशावर मुद्दाम पोलिसांचा मंदिरावरील बंदोबस्त काढून घेतला आहे. तुम्ही रांगेत शांतपणे दर्शन घ्या."

 मंदिराच्या पुजाऱ्यांना, एक सेकंदाला एक या किमान गतीनं यात्रेकरूंना दर्शन घेता यावे याचे नियोजन समजावून सांगून त्याने मंदिराचे दार उघडले.

 त्यानंतरचे दोन तास त्या मंदिराच्या प्रवेशद्वारी माईकवर चंद्रकांत कीर्तनप्रवचनाच्या शैलीत बोलत होता आणि त्यांच्या श्रद्धेला, परंपरेला जागवत होता. यात्रेकरू शांत व शिस्तबद्ध राहून दर्शन घेत होते.

 चंद्रकांत तिथं उभा होता. एकटा, नि:शस्त्र! वातावरणानं जर विपरीत वळण घेतलं असतं तर त्याची खैर नव्हती. त्याच्यापुढे साताऱ्यांहून निघालेले पोलीस अधीक्षक व त्यांची पोलीस पार्टी येईपर्यंत दुसरा पर्याय नव्हता. त्याचं यात्रेकरूंच्या मानसिकतेचं आकलन अचूक ठरलं होतं. त्यांच्यासमोर ढालीसारखं उभं राहणं परिणामकारक ठरलं होतं.

 पोलीस अधीक्षकांसोबत त्यांचे प्रशासनातले पहिले गुरू जिल्हाधिकारी व्ही. पी. राजा आले होते. त्यांनी बंदोबस्त लावला आणि चंद्रकांतनं सुटकेचा नि:श्वास टाकला. पुढील सारी यात्रा सुरळितपणे पार पडली.

 एका आठवड्यानंतर महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिका-यांनी चंद्रकांतला हा "ऑन-द-स्पॉट" अनुभव कथन करायला लावला. अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. समारोप करताना कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचे अनुभवसिद्ध विचार मांडले.

 "धार्मिक यात्रा-सणांच्या बंदोबस्ताची ड्युटी करताना त्याबाबतची परंपरा व धार्मिक रीतिरिवाजांची पूर्ण माहिती आवश्यक आहे. या प्रकरणात खान यांना मंदिराच्या बंदोबस्ताला ठेवणं ही प्रशासनाची चूक होती. ते मुस्लीम आहेत म्हणून हिंदू धर्मीयांच्या यात्रेच्या बंदोबस्ताला त्यांना ठेवू नये, असं मला म्हणायचं नाही. त्यांना यात्रेचे ज्ञान नव्हतं आणि त्यांनी करून घ्यायचा प्रयत्न केला नाही म्हणून. बाब अगदी साधी होती. कावडधारी महत्त्व त्यांनी जाणून घेतलं असतं तर त्यांच्याशी हुज्जत घातली नसती आणि हा प्रसंग उद्भवला नसता!

 “दुसरी बाब, मॉब सायकॉलॉजीची कल्पना अभ्यासानं वा अनुभवाने येते. कलावंत प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना ती मूलत:च असते. चंद्रकांतनं गर्दीच मानसशास्त्र ओळखलं. 'मॉब कंट्रोल करण्यासाठी गोळीबाराची परवानगी मागणं म्हणजे गर्दीत घबराट माजवणं होय.' आणि असा प्रकार पोलिसांनी तर कधीच करू नये हे जाणून, सर्वांसमक्ष चंद्रकांतनं पोलिसांना शिव्या घातल्या आणि जनेतला आश्वस्त केलं की गोळीबार मुळीच होणार नाही. प्रशासकाला तडकाफडकी निर्णय घ्यावा लागतो.

 “या घटनेतला तिसरा पैलू म्हणजे जनतेला सामोरे जाणे. प्रक्षोभक प्रतिक्रियेचा संभव असूनही जनतेमध्ये जाणे, मिसळणे आणि त्यांच्या चांगुलपणाला आवाहन करणं हे फार महत्त्वाचं आहे.

 “आम्ही तेथे पोहोचेपर्यंत दोन तास प्रवेशद्वारी थांबून चंद्रकांतनं चक्क कीर्तनवजा भाषण करीत वेळ मारून नेली. या ठिकाणी त्याचं धर्मभान आणि मॉब सायकॉलॉजीची जाण यांचा उपयोग झाला.

 "ही प्रशासनासाठी एक नमुनेदार केसस्टडी ठरू शकते. या तीन सूत्राचा विचार करावा, असा प्रसंग आला तर शांत चित्तानं पण धैर्यपूर्वक सामार जावं."

 वाचकहो, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रसंगाच्या निमित्ताने जे विवेचन केले ते कायदा व सुव्यवस्था प्रशासनाचे सार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रसंग हा अधिकाऱ्यांच्या मॉब सायकॉलॉजीच्या परीक्षेचा क्षण असतो. त्यात अपयश आलं आणि परिणामी दंगल उसळली तर ती त्यांच्या कमतरतेची निदर्शक असते.

 गर्दीचं मानसशास्त्र जाणण्यासाठी मानवी मनाची आणि सामाजिक वर्तनाचा जाण असणं हे आवश्यक आहे.

 गर्दीच्या मानसशास्त्राचे एकाच वेळी दोन परस्पर विरोधी पैलू असतात.

 गर्दीतील माणसे एकाच वेळी हिंसक बनू शकतात किंवा भयभीत- पलायन करण्याच्या मन:स्थितीत असतात. यात्रेच्या प्रसंगात हे दोन्ही पैलू दिसून आले खानने कावडधाऱ्यांशी पोलिसी खाक्यानं हुज्जत घालताच भाविक यात्रेकरून संतप्त होत, हातातले नारळ फेकून लाठीधाऱ्या पोलिसांना जखमी करायचे हिंसक प्रयत्न केला. गोळीबारासारखी पोलीस कारवाईची भाषा ऐकताच ही जनता भयभीत होऊन पलायनाच्या मन:स्थितीत आली होती. अर्थात, तो भाग चंद्रकांतनं टाळला ही बाब निराळी! पण गोवारी हत्याकांड ही समुदायाच्या भीतीनं पळापळ आणि चेंगराचेंगरीतून झालेली दुर्घटना आहे. ते पोलीस अधिकाऱ्यांचे मॉब सायकॉलॉजीच्या गलथान हाताळणीचं अपयश म्हटलं पाहिजे.

 गर्दी आणि अफवा यांचे अतूट नातं असतं. कावळा उडाला तर म्हैस उडाली अशा विपर्यस्त अतिरंजित, पद्धतीनं अफवा पसरत असतात. शिंगणापूरबाबत चंद्रकांत इनसायडरला म्हणाला, “जस्ट इमॅजिन! खाननं मला गोळीबार करावा लागेल असे फक्त म्हटलं होतं. अजून रीतसर परवानगी तालुका दंडाधिकारी म्हणून मागितली नव्हती आणि ती मी त्यानंतर गरज भासली तर दिली असती वा नाकारली असती, पण केवळ त्या उद्गारानं अफवा पसरल्या गेल्या असत्या, त्याचा क्रम असा राहिला असता. एक - पोलिसांनी गोळीबाराची परवानगी मागितली. दोन - रावसाहेबांनी ती दिली, तीन - पोलिसांनी पब्लिकला घेरलं आणि प्रथम हवेत व मग नेम धरून गोळीबार सुरू केला. चार - काही माणसं जखमी तर काही मृत, इ.इ."

 पहिली अफवा कानावर पडते, ती हातोहात दुसरीकडे पोचवताना त्यात स्वत:च्या अनुभवाची आणि कल्पनेची भर घालून दिली जाते. मूळ 'कावळा उडाला' असेल तर शेवटचा माणूस 'म्हैस उडाली' असं छातीठोकपणे सांगतो. "मी प्रत्यक्ष म्हैस उडताना पाहिली आहे." असे ठामपणे विधान करायला तो कचरत नाही. त्यामुळे अफवा सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनतेला विश्वासात घेऊन तिचं आधीच निराकरण करणं श्रेयस्कर !

 एकटा माणूस हा वैयक्तिकरित्या चांगला किंवा वाईट असू शकतो. पण समूहात तो नेहमीच अधिक चांगला असतो. समूहमनाचं हे सामुदायिक शहाणपण; तसंच, श्रद्धा, चांगुलपणा जाणून आणीबाणीच्या प्रसंगी त्यांना चुचकारण्यासाठी, शांत करण्यासाठी त्या बाबींचा कौशल्यानं उपयोग केला पाहिजे.

 चंद्रकांतनं शिंगणापूरला आलेल्या यात्रेकरूंची श्रद्धा व यात्रा निर्विघ्न पार पडावी ही भावना ओळखून 'तुम्ही भाविक यात्रेकरू आहात, कुणी गुंड, लुटारू नाही. दर्शनासाठी पोलिस बंदोबस्त नसला तरी तुम्ही रांग लावून शांतपणे दर्शन चऊ शकता' असे म्हणत त्यांच्या नाडीवर नेमके बोट ठेवून त्यांना आश्वस्त कल. आणि त्यांच्यात मिसळत संवाद करीत त्यांना शांत केलं!

 समूहमनाचा स्वाभाविक चांगुलपणा, शांततावादी वृत्ती आणि समंजसपणा ही खरे तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी वरदान ठरणारी बाब आहे. तिचं महत्व व सामर्थ्य जाणण्यात अधिकारी कमी पडतात म्हणून तणाव-दंगली हातात, हे अधोरेखित करणारी ही घटना आहे.

 कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखायची असेल तर अधिकाऱ्यांनी जनताभिमुख असणं आणि त्यांच्याबद्दल जनतेत विश्वास असणे हेही महत्त्वाचं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हिंसक, बेकाबू झालेल्या जमावापासून पोलीस इन्स्पेक्टरला एस.एम.जोशींनी मिठी मारून वाचवलं. हा प्रसंग अनेक वाचकांना माहीत असेल. इथे हे लक्षात घ्यावं लागेल, की एस.एम.जोशी हे सर्वांना आदरस्थानी वाटणारे सत्त्वशील असे लोकनेते होते. ते मध्ये पडल्यानंतर हिंसक जमाव शांत झाला. त्यापूर्वी नौखालीमध्ये पूर्ण सैन्य जे करू शकले नाही ते महात्मा गांधींनी (माउंटबॅटनच्या शब्दात ‘वन मॅन आर्मी'नं) दाखवलं आणि हिंदु-मुस्लीम दंगलींना काबूत आणून शांतता प्रस्थापित केली. दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनताभिमुख वृत्तीनं आपल्याबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे; तरच अशी तणावांच्या प्रसंगी जनता त्यांना प्रतिसाद देऊ शकते.

एकूणच, गर्दीचं मानसशास्त्र ही अभ्यासानं आणि अनुभवानं आत्मसात करण्याची गोष्ट आहे. त्याची ‘बॉटमलाईन' ही अर्थातच, माणसाचं मन पुस्तकासारखं वाचण्याची कला अंगी बाणवणं ही आहे.