Jump to content

पान:Samagra Phule.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तृतीय रत्न

१३

परंतु जोगाईचे हे अविचारी बोल ऐकताच जोगाईच्या नवऱ्याची तर कंबर खचून मनांतल्या मनांत असे म्हणाला कीं, आपल्याला कर्ज तरी कोण ख्रिस्तीवाल्यांशिवाय देतो ? आणि हे कर्ज फिटेल तरी कधी ? कारण आपल्याला रुपये मिळणार सर्व चार. हे मूल नव्हे पण माझ्या मरणाला मूळ म्हटल्यास बरें होईल!)
बाई : कां हों दिलगीर कां झाला, तुमच्या मनात जोशीबूवाचे मेहनतीबद्दल त्यांना काही देऊ नये, याविषयी विचार करीत होता काय?
नवरा : मनांत येऊन फळ काय ? त्याच्या मेहनतीचे दिल्याशिवाय हे सर्व होईल तरी कसे ? परंतु आपण आतां कर्ज कोणाकडून काढावें ? याचा विचार मी करीत होतो.
बाई : तुम्ही कां काळजी करितां ? जा, बाबजी खिस्तीवाला काळ्या वावरांत राहतो, त्यापासून दहा रुपये सवाईनें काढून, साडेबाराचा खिस्तरोखा लिहून द्या म्हणजे आपण वज वज फेडून टाकू. तर का राहतो ?
विदूषक : पंरतु ह्या अशा बायास अगदी कसे कळत नाहीं, कीं ख्रिस्तीवाले यांच्या घरदारांचा उन्हाळा कांही एक दिवसांनी करीत असतात. कोणता हा देवभोळेपणा ! ! (पुढे लागलेच चारपांच दिवसांत जोगाईला जामीन व आपण कूळ होऊन कर्ज रोखा लिहून देऊन, रुपये काढून, घरी घेऊन आले; आणि जोशास बोलावणे आपणच स्वतः त्याचा घराचा शोध करीत जाऊन, घरी घेऊन आला. नंतर बुवाजीस उभयतांनी रुपये खळखळ वाजवून, त्यास दाखवून, असे म्हणाले आता जलदी करा महाराज !)
जोशी : जलदी तर केलीच पाहिजे; पण मनापासून जप करणारा ब्राह्मण माझ्या खात्रीचा कोठें मिळेल तर मिळो.
बाई : महाराज तुम्हींच का जपाचे काम करा ना?
जोशी : कोणकोणते तरी मीच करूं, हा एक मला मोठा त्रासच आहे!
विदूषक : जप करणे हे का मोठे मेहनतीचे अथवा विचार तरी करण्याचे काम का आहे?
बाई : महाराज तुम्हाला जसें आवडेल तसें करा; आमची कांही हरकत नाही, तुमच्या हातून देवास पावले म्हणजे झालें.
जोशी : म्हणूनच मी त्याचा विचार करीत आहे; थांब थोडीशी, बोलू नको. मला थोडासा विचार करून पाहू दे, (असे म्हणून, मनात दाम्यालाच हे काम सोपवावे कारण तो बेटा मोठा कुत्र्यासारखा वचवच बोलून या मूर्खाची मजला समजूतहीं करूं लागेल; असा बेत करून, म्हणाला) ऐका माझा धाकटा भाऊ हे काम फार मनापासून करील, असे मला विचारांती दिसून आले.