पान:Samagra Phule.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-- गुलामगिरी १७१ सर्व जगातील ख्रिस्ती व महमदी लोकांचीही खात्री करून त्यांचे समजुतीप्रमाणे सर्व म्लेंछ लोकांचे बंड आपल्या मंत्रविद्येच्या सामर्थ्यांने मोडण्यास कधी मागे पुढे पाहिले नसते. धों fo-- माझ्या मते आपण स्वतः पुनः एकदां परशुरामास बोलावून पहा. तो खरोखरी जिवंत असल्यास तुमच्या बोलवण्याने खचित येईल. कारण हल्लींचे ब्राम्हण जरी आपल्यास कितीही 'विविधज्ञानी' झालो आहोत असे म्हणवोत, तथापी ते परशुरामाच्या मते भ्रष्टच म्हटले पाहिजेत. याजविषयी प्रमाण,- आतांशा कित्येकांनी शास्त्रविधिपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार करून शास्त्रनिषिद्ध माळ्यांची गाजरें खाण्याचा झपाटा चोरून चालविला आहे. जो बरें, तसे का होईना. चिरंजीव परशुरामा उर्फ आदिनारायणाचा अवतार यास मुक्काम सर्वत्र ठायी, अरे दादा परशुरामा, तूं ब्राह्मणांच्या ग्रंथावरून चिरंजीव आहेस. तूं कडू का होईना, परंतु विधीपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस. तुला पहिल्यासारिखे कोळ्यांच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत. कारण हल्ली येथे तूं जे मढ्यापासून उत्पन्न केलेले ब्राह्मण त्यांपैकी कित्येक ब्राह्मण 'विविधज्ञानी' बनून बसले आहेत, त्यांना काही अधिक ज्ञानसुद्धा देण्याची तुला जरूरी पडणार नाही. फक्त तूं येथे ये आणि त्यांनी शूद्रांची गाजरें खाल्ल्याबद्दल त्यांस चांद्रायण प्रायश्चित देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्र जादूच्या सामर्थ्याने पाहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश, फ्रेंच वगैरे लोकांस करून दाखीव म्हणजे झाले. तू असा तोंड चुकवून पळत फिरू नको. तूं या नोटीशीच्या तारखेपासून सहा महिन्यांचे आत येऊन हजर झाल्यास, मी तर काय; पण एकंदर सर्व जगांतील लोक तुला तूं सर्वसाक्ष आदिनारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील व तूं तसे न केल्यास येथील महारमांग आमच्या म्हसोबाच्या पाठीत लपून बसलेल्या तुझ्या विविधज्ञानी म्हणविणाऱ्या ब्राह्मण बच्चांस ओढूण आणून त्यांची फटफजीती करण्यास कधी कमी करणार नाहीत. आणि तेणेकरून त्यांच्या तुणतुण्याची तार तुटून त्यांच्या झोळीत दगड पडल्याने त्यांस विश्वमित्रासारिखें उपाशी मरूं लागल्यामुळे कुत्र्याचे फरें खाण्याचा प्रसंग आणू नको. तारीख १ली, माहे ऑगस्ट सन १८७२ इसवी, पुणे. जुना गंज, घर नं. ५२७. आपला खरेपणा पाहणारा जोतीराव गोविंदराव फुले. अथवा पानशेगा.