Jump to content

पान:Samagra Phule.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२

महात्मा फुले : समग्र वाङ्मय

अंशी खेद वाटून कांहीसें बरें वाटेल की आजपर्यंत कवितेंत त्यास शोकरसाची पूर्णपणे तसबीर श्रोत्यांचे मनामध्ये ठसविण्याकरितां महाप्रयत्नांने काल्पनिक उदाहरणें रचावीं लागत. तर त्यांचे ते सर्व श्रम असें ढळढळीत साकार उदाहरण सांपडल्यामुळे नाहीसे केले. असें जर आहे तर हल्लींचे शूद्रादि अतिशूद्र यांची अतः करणें आपण ज्यांचे वंशात उत्पन्न झालों व ज्यांचे व आपले रक्तमांस एकच आहे, हा जेव्हां विचार त्यांचे मनामध्यें येतो, तेव्हा त्यांची दुःखे एकूण परम दुःखीत होत असतील यांत मोठे आश्चर्य आहे असें कांही नाहीं. एके वेळी भट राज्यांत त्यांच्यावर जे कांही प्रसंग गुदरले होते त्यांची आठवण झाली असतां आमची मने भयभीत होऊन आमचे अंगावर रोमांच उभे राहतात व मनांमध्ये लागलीच असे विचार येतात की, ज्या प्रसंगाची आठवण आम्हास जर इतकी दुःखदायक होती, तर ज्यांनी ते प्रसंग सोशिले असतील त्यांची मनाची काय स्थिति झाली असेल, हे त्यांचे त्यांना ठाऊक. याजविषयी चांगलें स्पष्ट उदाहरण आमचे भटबंधूच्याच ग्रंथामध्ये सांपडतें. तें असें कीं, या देशातील मूळचे रहिवासी क्षत्रिय लोक यांजबरोबर भट लोकांचा मुख्याधिकारी परशुराम या नामें गृहस्थानें किती क्रूरता दाखविली, हैं या ग्रंथात जाणविलेंच आहे. तथापि त्याचे क्रुरतेविषयी इतकें समजलें आहे की, त्याने पुष्कळ क्षत्रिय लोकांचे प्राण घेऊन त्यांचे अनाथ झालेल्या स्त्रियांपासून त्यांची लहान लहान चार चार, पांच पांच महिन्यांची गरीब बिचारी निर्दोषी बालकें हिसकावून घेऊन अंतःकरणांत कांही द्रव न पावतां, त्यांचे प्राण की हो मोठे दुष्ट रीतीनें हरण केले. तो दुष्ट इतकेंच करून राहिला असें नाहीं तर त्याने कित्येक, आपले पतींच्या मृत्युमुळें दीन झालेल्या स्त्रिया, आपले पोटांत संभवलेल्या गर्भाच्या संरक्षणार्थ रानोमाळ मोठ्या क्लेशाने पळत असतां त्यांचा पारध्याप्रमाणे पाठलाग करून त्यांस पकडून आणून त्यांचे प्रसूतकाळी त्यांस पुत्र झाला असें ऐकिलें मात्र पुरे कीं, लागलीच येऊन त्यांचे प्राण घ्यावे. येणेंप्रमाणे हकीगत भट लोकांचे ग्रंथात आढळते व ज्या अर्थी भट लोक त्यांचेविरूद्ध पक्षाचे होते, त्या अर्थी त्यांजपासून त्या वेळची सर्व वास्तविक हकीगत समजेल, असें आम्हास स्वप्नांतदेखील आणावयाला नको. भट लोकांनी तिचा पुष्कळ भाग गाळला असावा, याच्यांत कांही संशय नाही. कारण कोणी आपले तोंडाने आपण केलेलें वाईट कर्म सांगत नाहीं. आतां वर सांगितलेली हकीगत त्यांनी आपले ग्रंथात लिहून ठेविली हैं एक मोठे आश्चर्य आहे. आमचे विचारास असें येतें कीं, परशुरामानें एकवीस वेळा क्षत्रिय लोकांचा मोड करून त्यांची वाताहत केली व त्यांचे हतभागी स्त्रियांचे लहान लहान मुलांस मारिलें, याच्यांत मोठा पुरुषार्थ केला व तो इतर जनांस माहीत व्हावयाकरितां भट लोकांनी आपले ग्रंथात लिहून ठेविला. अथवा जगांत प्रसिद्ध म्हण आहे की, "तळहाताने सूर्य झांकिला जात नाहीं. त्याप्रमाणे ही हकीकत जरी त्यांस मोठी लज्जास्पद होती, तथापि तिचा मोठा गवगवा झाल्यामुळे त्यांच्याच्यानें जितकी झांकवेल तितकी त्यांनी झांकून, जेथें उपायच नाहीं तेथें लिहून ठेवणें त्यांस जरूर पडलें बरें, भट लोकांनी जितकी हकीकत लिहिली "