प्रकाशकीय पश्चिम घाट परिसर वैविध्यपूर्ण, दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ अशा वनस्पती आणि जीवजाती यांचे माहेरघर असल्यामुळे जैवविविधतेचा जागतिक 'हॉटस्पॉट' म्हणून ओळखला जातो. या परिसराचे भौगोलिक क्षेत्रफळ तब्बल १ लाख ६० हजार ५०० कि. मी. वर्ग इतके असून हे क्षेत्र ६ राज्ये, ५१ जिल्हे आणि १६३ तालुक्यांमध्ये पसरलेले आहे. जीवजंतू, कृमिकीटक, सरीसृप, जलचर, वन्य पशु-पक्षी, पाळीव पशुधन, वृक्ष- वेली,, पुष्प पठारे, औषधी वनस्पती, पिकांचे वाण अशी इथल्या समृद्ध जैवविविधतेची कितीतरी मोठी वर्गवारी होऊ शकेल, यापैकी कित्येक प्रकारच्या जीवजाती तर जगाच्या पाठीवर फक्त इथेच आढळतात. पश्चिम घाटामध्ये ४४ अभयारण्ये आणि १२ राष्ट्रीय उद्याने आहेत. लोकांनी श्रद्धेने जोपासलेल्या आणि जैवविविधतेने नटलेल्या अनेक देवराया व देवडोह आहेत. ही सर्व जैवसंपदा केवळ या अरण्यांपुरतीच मर्यादित नाही, तर संपूर्ण पर्वतश्रेणीत ती विखुरलेली आहे. नैसर्गिक झऱ्यांची आणि धबधब्यांची संख्याही लक्षणीय आहे. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि इतर हजारो नद्या पश्चिम घाटामध्येच उगम पावतात. पश्चिम घाट व परिसरामध्ये आदिवासी, शेतकरी, मच्छिमार असे अनेक स्थानिक समुदाय पिढ्यानपिढ्या वास्तव्यास आहेत आणि त्यांची उपजीविका इथल्या निसर्गसंपदेवरच अवलंबून आहे. स्वर्गसुखाची अनुभूती देणारे या परिसरातले अद्भुत नैसर्गिक सौंदर्य देशविदेशातील अभ्यासकांना आणि पर्यटकांना कायम आकर्षित करत असते. अशा या वैशिष्ट्यपूर्ण पश्चिम घाट प्रदेशातील निसर्गाची, सामान्यांच्या उपजीविकेची होत असलेली नासाडी कशी टाळावी आणि विवेकपूर्ण, लोकाभिमुख व निसर्गपोषक विकास कसा साधावा, या विषयावर सूचना मांडण्यासाठी भारत सरकारच्या 'पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मार्च २०१० मध्ये ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ मा. डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 'पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गट' गठीत केला होता. या गटाने परिसराचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. समाजाच्या सर्व घटकांशी खुली चर्चा घडवली आणि काय सह्याद्रीची आर्त हाक! १