पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २६ )

मोगलांच्या सत्तेचा -हास झाल्यामुळे सर्वत्र अव्यवस्था होणें साहजिकच होतें. राज्य चालविणारे सर्व आपापसांत भांडूं लागले तर चांगली राज्यव्यवस्था चालणें अशक्यच आहे; म्हणून दरोडखोरांच्या-पेंढा-यांच्या-टोळ्या उद्भवल्या; व त्यांचे जे पुढारी होते त्यांनीं आपणांस प्रत्यक्ष स्वतंत्र राजे करून घेतलें; आणि मोगल बादशाह व त्यांचे नबाब ह्या दोघांच्याहि सत्तेस ते तृणवत् मानू लागले. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला कीं, हिंदुस्थानांत झपाट्यानें झोटिंग पादशाही सुरू झाली; व्यापार मंदावला; व धंदा काय तो शिपायगिरीचा राहिला. हे शिपाई लोक पगार घेऊन, ही नाहींतर ती, कोणती तरी बाजू धरून लढाई करीत असत.
युरोपियन लोकांच्या वसाहतींचा प्रारंभ
 अशा ह्या अव्यवस्थित स्थितीचा ज्यांच्यावर वाईट परिणाम व्हावयाचा असे कित्येक लोक त्या वेळीं हिंदुस्थानांत होते. हे युरोपियन व्यापारी होत. मोगलांच्या पहिल्या स्वारीच्या सुमारास केप आफ गुड होपास वळसा घालून त्यांनीं हिंदुस्थानास येण्याचा रस्ता शोधून काढिला होता; व व्यापारासाठीं हिंदुस्थानांतील समुद्र किनारच्या गांवांतून ह्यांनीं वखारी घातल्या होत्या. पोर्तुगीज, दच, इंग्लिश व फ्रेंच अशा क्रमानचें हे लोक हिंदुस्थानांत आले. जे इंग्लिश लोक प्रथम आले, ते ईस्त इंदिया कंपनीपैकीं इसम होते. हल्ली जशा रेल्वे कंपन्या आहेत, तशाच प्रकारची