पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २५ )

निघतो. अशा प्रकारचा पुरुष गादीवर आला म्हणजे मुख्य सत्तेचा अर्थात् -हास होऊं लागतो. अशीच स्थिति मोगल घराण्याची झाली, व हेंच त्याच्या -हासाचें पहिलें कारण झालें.
 २ रें कारण, मोगलांच्या राज्याचा विस्तार इतका मोठा झाला कीं, एका मनुष्यास त्याजवर अंमल करितां येईना; म्हणून ठिकठिकाणीं सुभेदार नेमून त्या त्या ठिकाणचा अधिकार त्यांच्या हवालीं करणें प्राप्त झालें. मोगलांच्या वेळीं सुभेदारांस नबाब किंवा राजा म्हणत. आतां वर ज्या प्रकारच्या विलासी बादशहाचें वर्णन केलें आहे, तशा प्रकारचे बादशाह मोगलांच्या गादीवर आले; तेव्हां हे सुभेदार त्यांचा अधिकार तुच्छ मानू लागले. बादशहांस न विचारितां त्यांनीं आपले अधिकार आपल्या मुलांस दिले, मनास मानेल त्याप्रमाणें वागू लागले, व स्वतंत्र राजे बनण्यासाठी त्यांनीं हरएक प्रकारचा प्रयत्न केला. शेवटीं परिणाम असा झाला कीं, मोगल बादशाह दुर्बळ होऊन हे सुभेदार किंवा नबाबच प्रबळ झाले.
 असे प्रकार घडले तेव्हां जुन्या हिंदु सरदारांपैकी कांहीं सरदार आपली डोकीं वर काढू लागले; आणि नबाबांचा पक्ष किंवा बादशहांचा पक्ष ह्यांपैकीं ज्या प्रसंगीं जो आपणांस फायदेशीर दिसेल तो धरून ते हळूहळू बहुतेक स्वतंत्र होत चालले, अशा प्रकारें