पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
७३
 


समता हेच सामर्थ्य :
 आता राजसत्ता, साम्राज्यसत्ता यांचा वरील दृष्टीने विचार करून राजकीय क्षेत्रातल्या समतेचा विचार संपवू या सत्तांचे वर्णन करताना डॉ. जयस्वाल म्हणतात की येथले राजेसुद्धा अनियंत्रित असे कधीच नव्हते. प्रारंभीच्या काळात तर सभा, समिती या लोकायत्त संस्थांचे त्यांच्यावर प्रत्यक्षच नियंत्रण असे इतकेच नव्हे तर त्याच संस्था राजाची निवड करीत. पुढील काळात राजपद आनुवंशिक झाले पण तरीही लोक अर्वाचीन काळाप्रमाणे राजशासनाविषयी उदासीन नव्हते. त्याविषयी ते फार दक्ष असत. आणि हेच, जयस्वालांच्या मते, भारताच्या शासनाचे त्या काळात मुख्य बळ होते. राजशासनरूप वृक्षाची मुळे त्याकाळी लोकजीवनात खूप खोलवर गेलेली असत. भीष्मांनी गणराज्यांतील समतेविषयी जशी ग्वाही दिलेली आहे तशी राजसत्तांकित प्रदेशांतील समतेविषयी कोणी दिलेली नाही हे खरे. पण आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, लोक जागृत व दक्ष असल्यानंतर चातुर्वर्ण्य रूढावले असले तरी त्यांतील विषमतेचे विष मारले जाणारच. शूद्र हा मंत्रिपदाला ज्या समाजांत जाऊ शकतो तेथे, शास्त्रांनी काहीही सांगितले तरी, विषमता किती राहील हे दिसतच आहे. लोकजीवनात शासनाची मुळे जाऊन तेथून मिळणाऱ्या जीवनरसावरच तो वृक्ष जगत असताना विषमतेला पायबंद पडणारच. तसा तो या काळात निश्चित पडला होता. म्हणून तो समाज आजच्यापेक्षा अधिक एकरूप, सम, समरस, समसुखदुःखी, समानहृदय होऊ शकला. व त्यामुळेच तो जयिष्णु वर्धिष्णु, समृद्ध व सामर्थ्यसंपन्न असा झाला होता.
 समता, बंधुता, सहकार्य या तत्त्वांचे समाजसंघटनेच्या दृष्टीने किती महत्त्व आहे हे यावरून ध्यानात येईल. 'राष्ट्रनिष्ठा' या तत्त्वाने प्राचीन काळचा हिंदुसमाज संघटित झाला होता असे गेल्या प्रकरणात दाखविले आहे. राष्ट्रनिष्ठेत समता, बंधुता ही तत्त्वे गृहीतच धरलेली असतात. ती तत्त्वे त्या काळच्या समाजाने कशी अवलंबिली होती व त्यांचा व सामर्थ्यांचा किती दृढसंबंध आहे हे येथवर विवरून सांगितले. आता याच काळात विषमता, भेदभाव, विद्वेष यांची विषवीजे कशी प्रतिपादिली जात होती, आणि त्यांचेच पुढे विषवृक्ष होऊन हिंदुसमाजाचा त्यांमुळे कसा विनाश झाला हे पुढील लेखात पहावयाचे आहे.

§