पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
६७
 

दिसते. (पं. सातवळेकर, पृ. ४४, ४६). हे उतारे देऊन पंडित सातवळेकर म्हणतात, 'ही समानता पाहण्यासारखी व विचार करण्यासारखी आहे.'

शूद्रांची प्रतिष्ठा
 इ. स. पूर्व ४००० ते इ. स. पूर्व १००० हा वेदकाळ असे मानले जाते. या काळाच्या अखेरीस वर्ण बहुतेक जन्मनिष्ठ झाले असे पंडितांचे मत आहे. तरी त्यानंतरही विवाहविषयक व व्यवसायविषयक बंधने फारशी कडक नव्हती. शुद्र जातीलाही उत्कर्षाला या काळात कसा वाव मिळत असे हे पाहिले असता त्या काळच्या समानसंधित्वाच्या धोरणाची कल्पना येईल. राजाचे मंत्री किती असावे व ते कोणत्या वर्णांचे असावे याविषयी भीष्मांनी पुढीलप्रमाणे अभिप्राय दिला आहे. 'राजाचे चार ब्राह्मण मंत्री, आठ क्षत्रिय मंत्री, एकवीस वैश्य मंत्री, तीन शुद्र मंत्री व एक सूत मंत्री- (सूत हा प्रतिलोम विवाहजन्य होता) असे मंत्री नेमावे.' (शांति.- ८५-८) ब्राह्मणांपेक्षा शुद्र मंत्र्यांची संख्या एकानेच कमी आहे हे ध्यानात ठेविले पाहिजे. 'तीन वर्णांची सेवा हाच शुद्राचा धर्म होय.' असे त्या वेळी शास्त्र होते. महाभारतातही तसे शास्त्र अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. मागल्या त्या काळात परस्परविरुद्ध असे दोन विचारप्रवाह चालू होते असे वर अनेकदा सांगितले आहे याचा अर्थ यावरून स्पष्ट होईल. मागल्या काळातील रामायण, महाभारत, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती यांसारख्या ग्रंथांत वरचेवर भर पडत गेली आहे, हे प्रसिद्धच आहे. ज्याला जे वाटेल ते त्याने लिहावे व वरच्यासारख्या ग्रंथांत त्याचा प्रक्षेप करावा असा प्रकार कित्येक शतके चालू होता. ऋग्वेदात मागून भर पडली नाही अशी समजूत आहे. पण त्यातील दहावे मंडल मागून रचलेले आहे, असे अर्वाचीन पंडितांचे मत आहे. अशा प्रकारामुळे या ग्रंथांचे ग्रंथ हे रूप जाऊन त्यांना कोश हे रूप प्राप्त झालेले आहे. त्यामुळे त्यांत अत्यंत परस्परविरुद्ध अशी मते ठायी ठायी आढळतात. आणि भर घालणाऱ्यांनी संदर्भाचासुद्धा विचार कित्येक वेळा केला नसल्याने एकाच व्यक्तीच्या तोंडी व लागोपाठ दोन वाक्यांतही अशी मते आढळतात. यामुळे कोणते मत कोणाचे हे निश्चयाने सांगता येत नाही. पण तरीही भिन्न भिन्न विचारसरणी कोणत्या होत्या, भिन्न तत्त्वज्ञाने कशी उदय पावत होती हे मात्र निश्चित कळते. असो.