पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
५७
 

 उत्तरकालीन हिंदुसमाजाला समाज म्हणणे सर्वथा अशक्य आहे. कारण हा समूह समाज होताच कामा नये, असे त्याचे धर्मशास्त्र आहे !

समतेची उपासना :

 सुदैवाने प्राचीन काळापासून असे धर्मशास्त्र नव्हते. समाज एकरूप करावा, सम करावा आणि त्यायोगे संघटित करावा असे प्राचीन हिंदुधुरीणांचे धोरण होते. मुखाने, लेखाने ते अहोरात्र साम्य, समता, बंधुता या तत्त्वांचा उद्घोष करीत होते. 'समानी व आकृतिः समाना हृदयानि वः।' हा वेदमंत्र पहा. 'तुमचा अभिप्राय एकसारखा, तुमची अंतःकरणे एकसारखी व तुमचे मन एकसारखे असो; जेणेकरून तुमचे सुसाह्य म्हणजे संघशक्तीची बळकटी होईल.' (ऋग्वेद १०, १९१.)

संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्
देवा भागं यथा पूर्व संजानाना उपासते । (कित्ता)

 'एके ठिकाणी जमा, संवाद करा, तुमची मने एक करा, व ज्याप्रमाणे पूर्वीचे विद्वान आपल्या नियत कर्तव्यासाठी एकत्र जमत त्याप्रमाणे तुम्हीही जमत जा.' या मंत्रामध्ये कोणत्याही विशिष्ट जातीचा विशेष रीतीने उल्लेख न करता सर्वांना सामान्य रीतीने आज्ञा केलेली आहे.

समानो मंत्रः समितिः समानी, समानं मनः सहचित्तप्रेषाम् ।

(कित्ता)

 'सर्वांचे मंत्र समान, सर्वांची सभा समान, सर्वांचे मन समान आणि सर्वांचे चित्तही समान असो.' सर्वांचा मंत्र एक व सर्वांची सभाही एक हे ध्यानात ठेवण्याजोगे आहे.
 वरील आज्ञा कोणत्याही विशिष्ट जातीला उद्देशून केलेल्या नाहीत. सर्व समाजाला आहेत. पण तशी शंका कोणाला येईल तर त्यांचे समाधान पुढील वचनांवरून होईल.

विश्वस्य केतुर्भुवनस्य गर्भ आरोदसी अपृणाज्जायमानः ।
वीडुं चित् अद्रिमभिनत् परायन् जना यदग्निं अयजन्त पंच |

ऋ. १०।४५।६॥ यजु. अ. १२॥