पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोन प्रवाह
५३
 


व्याधींची चिकित्सा :

 या मीमांसेसाठी आपल्या मागल्या इतिहासाकडे पाहू लागताच त्यावरुन असे ध्यानात येते की इ. स. १००० आधीच्या शे-दोनशे वर्षांत हिंदुसमाज एकाच नव्हे तर अनेक रोगांनी ग्रस्त झालेला होता व त्याचे सामर्थ्य हे रोग दीर्घ काल पोखरून टाकीत होते. या रोगांची चिकित्सा करताना आणखी एक गोष्ट लक्षात येते ती ही की, या सर्व अनर्थाला आपले आपणच जबाबदार आहो. 'मनुष्य हा आपला आपण बंधू किंवा रिपु असतो', हे गीतावचन हिंदुसमाजाच्या बाबतीत तितकेच खरे आहे. इतिहासावरून निश्चित होणारे हे अपश्रेय माथी घेण्यास आपण तयार झालो तरच भविष्यकाळाविषयी आशा धरता येईल. हे सर्व दैवयोगाने झाले, कलियुगामुळे झाले, नियतीच याला जबाबदार आहे अशी ज्यांची धारणा आहे, त्यांनी या चिकित्सेच्या फंदात न पडावे हे बरे. कारण मानवाच्या हाती जे नाही त्याची चिकित्सा करून करावयाचे काय ? नियतीमुळे अधःपात झाला असला तर नियतीमुळेच, झाला तर, उत्कर्ष होईल, किंवा तिच्या मनात नसले तर होणार नाही. तेथे मानवाच्या प्रयत्नांचा संबंध येतो कोठे ? पण अशा रीतीने नियतीवर आपल्या अवनतीचे खापर फोडणे हे न्याय्यही नाही. मागील काळच्या वैभवाचे श्रेय जर आपण आपल्याकडे घेतो, आपली धर्मतत्त्वे, आपले असामान्य समाजशास्त्र, आपली स्पृहणीय नीतिमत्ता, आपले चारित्र्य, सर्व विषयांत अप्रतिहत प्रवेश करणारी आपली बुद्धिमत्ता यामुळेच आपल्याला त्या प्राचीन काळी अतुल वैभव प्राप्त झाले, असे आपण म्हणतो तर पुढे जी अवनती झाली त्या वेळी आपल्या या सर्व गुणांचा लोप झाला असला पाहिजे, आपण त्या थोर तत्त्वांपासून च्युत झालो असलो पाहिजे, आपले थोर चारित्र्य नष्ट झाले असले पाहिजे, हे मान्य करून ते अपश्रेयही आपल्या माथी घेण्याची समंजसता आपण दाखविली पाहिजे. ही वक्तव्यता, हे उत्तरदायित्व आपल्या शिरी घेणे यातच न्याय आहे व यातच उज्ज्वल भविष्याचे बीज आहे. तेव्हा अशा अनाग्रही सत्यशोधनाच्या बुद्धीने आपण आपल्या समाजाला जडलेल्या व्याधींची चिकित्सा करण्यास प्रारंभ करू.

विकृत धर्मतत्त्वे :

 वर म्हटले आहे की मागच्या उत्कर्षाच्या काळी जे जीवनाचे तत्त्वज्ञान