पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२१९
 


मानवी प्रतिष्ठा :
 गेल्या शतकातील दुसरे मोठे धर्मसुधारक म्हणजे न्या. मू. रानडे हे होत. 'मानवी प्रतिष्ठेचे पुनरुज्जीवन' हे त्यांच्या धार्मिक व सामाजिक तत्त्वज्ञानाचे आदिसूत्र होते. 'आपल्या अधःपाताचे मूळ कारण म्हणजे आपल्यावरची बंधने ही विवेकबंधने नसून, ती बाह्य बंधने आहेत, हे होय; यामुळे आपली मने बाल्यावस्थेतच राहिली. स्वयंशासन, आत्मसंयम यांमुळे येणारी मानवी प्रतिष्ठा आपल्याला कधीच आली नाही.' असे उद्गार त्यांनी कलकत्त्याच्या दहाव्या सामाजिक परिषदेत भाषण करताना काढले आहेत. (मिसलेनियस राइटिंग्ज्–पृ. १९२-९३) ब्रिटिशांच्या पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात येथे समाजरचनेची जी तत्त्वे मान्य व रूढ झाली होती, त्यातील जवळजवळ प्रत्येक तत्त्व मानवी प्रतिष्ठेला घातक असे होते. कलियुग, नियतिवाद, संसाराची उपेक्षा, तर्काची अवहेलना, जन्मनिष्ठ उच्चनीचता, शब्दप्रामाण्य यांतील प्रत्येक तत्त्वाने व्यक्तीच्या स्वत्वाची पायमल्ली केलेली आहे. असल्या अधम व हीन धर्माचे जे अनुयायी त्यांच्यांत लोकसत्ता तर राहोच, पण मानवी कर्तृत्वाचा निदर्शक असा कोणताच गुण निर्माण होणे शक्य नव्हते. पाश्चात्त्य विद्येने ज्यांना नवी दृष्टी प्राप्त झाली त्या सर्व धर्मवेत्त्यांना हीच भयावह गोष्ट प्रथम जाणवली. गेल्या शतकातील सर्व प्रमुख समाजनेते प्रथम धर्मसुधारक होते याचे हेच कारण आहे. त्यांपैकी प्रत्येकाने पहिला घण त्या कर्मकांडप्रधान, विवेकहीन, जड धर्मावरच घातला आहे. त्यांच्या धर्मसुधारणेचे एकच लक्षण होते. मानवाला देहप्रधान गणून आधीच्या जडधी, मूढ अशा धर्मपंडितांनी सांगितलेला हीन व अपवित्र असा आचारधर्म नष्ट करून त्याच्या जागी त्याच्या मनाची, बुद्धीची, आत्म्याची प्रतिष्ठा वाढविणारा तात्त्विकधर्म प्रस्थापित करणे हे ते लक्षण होय. "धर्म म्हणजे मनाचे संस्कार, देहाचे नव्हेत. धर्म म्हणजे मनोजय, धर्म म्हणजे आत्मसंयमन, धर्म म्हणजे भूतदया, श्रद्धा, भक्ती, प्रेम, दया, क्षमा, शांती, रंजल्यागांजल्यांना आपुले म्हणणे, सर्वांभूती समभाव" हा महनीय विचार त्यांना सांगावयाचा होता आणि वेद, उपनिषदे, गीता या धर्मग्रंथांच्या आधारे त्यांनी तो सांगितला.
 स्वामी दयानंदसरस्वती यांनी पंजाबात जे धर्मसुधारणेचे कार्य केले त्याचे स्वरूप काहीसे असेच होते. वेदाध्ययनाचा अधिकार मनुष्यमात्राला आहे,