पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
‘राज्य करेगा खालसा’
१९७
 

 मागे एके ठिकाणी सांगितलेच आहे की मूळ समाजापासून निराळे होऊन जे भिन्न अस्मिता स्थापू पहातात त्यांनी आपल्या नव्या संप्रदायाच्या अंतरात वज्रासारखे अभंग ऐक्य टिकविले पाहिजे. शीखांना हे कधीच जमले नाही. अगदी प्रारंभीच्या लेखात संघटनेचे एक प्रधान लक्षण सांगितले आहे. जे लोक आपसात लढत नाहीत; किंवा निदान आपल्याच लोकांविरुद्ध शत्रूला मिळून स्वकीयांशी लढत नाहीत त्यांना संघटित म्हणता येईल. शीखसमाज यांपैकी कोणत्याच अर्थाने केव्हाही संघटित झाला नाही. निराळा पंथ काढून शीखांनी हिंदूंपासून दुरावा मात्र निर्माण केला. त्यामुळे अखिल हिंदुसमाजात त्यांना कान्ती करता आली नाही, उठाव करता आला नाही. आणि भिन्न अस्मितेचा जो लाभ मिळावयाचा तोही दुहीमुळे त्यांना मिळाला नाही. यामुळे गुरू गोविंदसिंग किंवा बंदा यांसारख्या थोर पुरुषांना यश आले नाही. हिंदुसमाजाबद्दल शीखांची दृष्टी शेवटपर्यंत आपलेपणाची होती. पानपतनंतर अबदालीने गुलाम करून चालविलेल्या २०,००० स्त्रियांना मुक्त करून त्यांनी महाराष्ट्रात परत पाठविले. हे सर्व खरे, पण शीख हिंदुसमाजाशी एकरूप झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे बळ तोकडे पडले.

शिरकाण :
 बंदाबहाद्दर याचा वध १७१६ साली झाला. यानंतरच्या ५० वर्षाचा शीखांचा इतिहास अनेक दृष्टींनी अभ्यसनीय आहे. कोणी इतिहासकार त्याची मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाशी तुलना करतात, कोणी त्यापेक्षाही त्याचे महत्त्व जास्त मानतात. बंदानंतर शीखसमाजाला समर्थ असा नेता लाभला नाही. आणि बंदाच्या नेतृत्वाखाली शीखांनी मुस्लीमांवर इतका भयानक सूड उगविला होता की, सर्व मुस्लीमसामर्थ्य एकवटून शीखांचा नायनाट करण्याचा मुस्लीम सत्ताधाऱ्यांनी निर्धार केला. बादशहा फरुखसियर याने तर असे फर्मानच काढले की, मोगल अधिकाऱ्यांना जेथे जेथे शीख सापडेल तेथे त्यांनी त्याला सुसलमान तरी करावे किंवा त्याची कत्तल करावी. पंजाबच्या मुस्लीम सुभेदारांनी तर जो कोणी शीखाचे मुंडके आणून देईल त्याला ५० रु. बक्षीस मिळेल असे जाहीर केले. यामुळे शीखांचे पद्धतशीर शिरकाण सुरू झाले आणि ते जवळ जवळ ४०-५० वर्षे चालू राहिले.