Jump to content

पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.


आपले नांव मागें रहावें ह्मणून कर्मे करितात. चिनी लोकांत मनुष्य मेल्यानंतर त्यास त्याच्या योग्यतेप्रमाणे पदवी मिळते. विचारांती चिनांतली ही चाल आपल्या चालीपेक्षां बरी आहे असे मला वाटते. कोणी एखादें मोठे कृत्य केलें तर त्याच्या बापाला अथवा आजाला सरदाराची पदवी देण्याची चाल चीन देशांत आहे. तेव्हां तिकडे कित्येक लोक आपल्या बापाचें नांव मोठे व्हावें ह्मणून कर्म करितात. आपण मेल्यानंतर आपलें खूप मोठे थडगे बांधले जावें अशा हेतूने मुसलमानांतील काही विशिष्ट पंथाचे लोक कमें करीत असतात. मूल जन्माला आल्याबरोबर त्याचे थडगे बांधणारे काही पंथ मला ठाऊक आहेत. हे थडगें जितके मोठे आणि सुंदर असेल त्या मानाने आईबापांची पदवी अधिक समजली जाते. सुंदर आणि मोठे थडगे बांधणे हाच हेतु बाळगणारे लोक अशा पंथांत पुष्कळ असतात. दुसरे कित्येक शरीराला खूप त्रास देण्यांतच आनंद मानितात. आणखी कित्येक लोकांची घरे बुडवून देवळे बांधतात व भिक्षुकादिकांस खूप धर्म करितात. जणूं काय स्वर्गद्वारावर दाखविण्यासाठी भटांपासून ते पासच घेत असतात ! इत्यादि अनेक प्रकारच्या हेतूंनी प्रेरित होऊन मनुष्य कर्मे करीत असतो.

 केवळ कर्तव्य ह्मणून कर्म करणारे थोडे. असे लोक कीर्ति अथवा वित्त अथवा दुसरा कांही स्वार्थ मनांत न आणितां केवळ कोणाचे तरी बरें व्हावें याचसाठी कमें करितात. कोणाचें तरी बरे झालेले पाहिले ह्मणजे त्यांस आनंद होतो. कीर्तीच्या हेतूने केलेल्या कर्माचा परिपाक नेहमी बहुधा सावकाश होत असतो. कीर्तीसाठी साऱ्या जन्मभर खटपट केली आणि ती अगदी वृद्धापकाळीमरावयाच्या वेळी मिळाली असें पुष्कळ वेळां घडतें. जर मनुष्य कोणताहि हेतु मनांत न धरितां कर्मे करील तर त्या कर्माचा त्यास कांहींच फायदा मिळणार नाही काय? मिळेल, खचित मिळेल. सर्वांत अत्युच्च दर्जाचा असा फायदा त्यास मिळेल. निर्हेतुक कर्माइतकें फायदेशीर दुसरे कोणतेंहि कर्म नाहीं; परंतु तें फलद्रूप होईपर्यंत वाट पहात बसण्या इतका धीर सामान्य मनुष्याच्या ठिकाणी असत नाही. अशा कर्माचा शरीरप्रकृतीवरहि फारच उत्तम परिणाम होत असतो. प्रेम, सत्य, आणि निःस्वार्थबुद्धि हे शब्द केवळ अलंकारिक भाषेने मी योजिले नसून आपणांपैकी प्रत्येकाने तेच आपलें साध्य आहे असें जाणावें. आपल्या चैतन्यशक्तीस पूर्णपणे जागत करण्याची शक्ति या तीन गुणांतच आहे. कोणताहि हेतु-मग तो कीर्तीचा, पैशाचा, स्वर्गसुखाचा