पान:सौंदर्यरस.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जीवनाचे भाष्यकार तात्यासाहेब केळकर
८९
 

साहित्य जन्माला येत नाही. ग्रामीण जनतेविषयी जे लिहिले जात आहे ते शहरातले नवे लोक लिहीत आहेत. कारण त्यांना नवी दृष्टी व तुष्टी प्राप्त झालेली आहे.
 स्त्रीजीवनाविषयी असेच आहे. स्त्री विद्यासंपन्न होत आहे, सार्वजनिक जीवनात येत आहे. यामुळे सुशिक्षित समाजाला आनंद होत आहे, नवी तुष्टी त्याला लाभत आहे. तो जुन्या बंधनातून मुक्त होत आहे, स्वातंत्र्याचे तेज ती प्रगट करीत आहे, याचाही पुष्कळांना आनंद होत आहे. पण मुस्लिम समाजाला हे नको आहे. कारण त्याला नवी दृष्टी आलेली नाही. तो आज शंभर-दीडशे वर्षे इंग्रजांनी निर्माण केलेल्या नव्या सृष्टीत रहात आहे. पण नव्या विद्येचा हिंदूंनी जसा आदर केला, ती आत्मसात् केली, तशी मुस्लिम समाजाने केली नाही. त्यामुळे त्याला नवी दृष्टी आली नाही. अर्थातच स्त्री अशिक्षित असावी, पडद्यात असावी, तिला समतेची आकांक्षा वाटू नये, यातच त्याला तुष्टी आहे. धर्मपरिवर्तनही मुस्लिम समाजाला मान्य नाही. आपण धर्मविचारात आमूलाग्र क्रांती केली याचा हिंदुसमाजाला अभिमान वाटतो. तसा मुस्लिम समाजाला मुळीच वाटत नाही, उलट 'शरीयत'- मध्ये काडी-मात्र फरक करायचा नाही, असा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे नव्या सृष्टीत राहूनही तो जुनाच राहिला आहे. परिवर्तनात त्याला आनंद नाही. त्यामुळे त्या समाजात नवे साहित्य निर्माण होत नाही, हे ओघानेच आले.
 साहित्यातील क्रान्तिकारक बदल केव्हा, कसे होतात, याविषयी तात्यासाहेबांनी केलेली मीमांसा कशी अचूक आहे, हे यावरून ध्यानात येईल. ही मीमांसा मुळातच नवी आहे असे नाही. पण 'नवी सृष्टी, नवी दृष्टी व नवी तुष्टी' या स्वरूपात त्यांनी केलेली मांडणी अगदी अभिनव अशी आहे. त्यांचे जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान त्यावरून अगदी स्पष्ट होते. आपण त्याच दृष्टीने पाहात आहोत. त्यांनी अमेरिकन व रशियन साहित्यातील उदाहरणे दिली आहेत. वर मी त्यांच्यानंतरच्या महाराष्ट्रीय जीवनातून उदाहरणे घेतली आहेत. ती सध्या डोळ्यापुढे असल्यामुळे प्रतिपाद्य विषय जास्त स्पष्ट होईल असे वाटते.

*