पान:सौंदर्यरस.pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद
८३
 

कुटुंबसंस्था मोडावयाची नसून ती जास्त दृढ करावयाची आहे हेच हरिभाऊंनी सिद्ध केले आहे.

 याप्रमाणे सनातन धर्म, विवाहसंस्था, कुटुंबसंस्था, व सामाजिक नीती यांना जी अवकळा आली होती, यांना जे विपरीत व अमंगळ रूप आले होते त्याचे स्वरूप समाजाला दाखवून हरिभाऊंनी प्रथम मूर्तिभंजन केले, नंतर अनेक प्रसंग, व्यक्तिरेखा व कथा यांच्या द्वारा या संस्थांच्या शुद्ध स्वरूपाचे दर्शन घडविले आणि शेवटी भविष्यकाळाच्या प्रगतीसाठी तरुणांना कर्मयोगाचा संदेश दिला. निःस्वार्थीपणे, निर्भयपणे, आपल्या विवेकाला साक्ष ठेवून आपल्या देशाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी अहोरात्र तनमनधन झिजवणे हाच कर्मयोग होय. पाश्चात्त्य मिशनऱ्यांनी ज्याप्रमाणे धर्मसेवा केली त्याप्रमाणे आपल्या तरुणांनी देशामध्ये अनेक मठांची स्थापना करून तेथे अनाथ, अपंग, दीन, पतित यांना आश्रय द्यावा व त्यांच्या उन्नतीच्या कार्यासाठी आजन्म ब्रह्मचारी राहून त्याची व समाजाची सेवा करावी अशी हरिभाऊंची इच्छा होती. भावानंद व ताई यांनी स्थापिलेल्या मठाचे वर्णन करून आपल्या या कल्पनेचे मूर्तरूप त्यांनी 'मी' कादंबरीमध्ये दाखविले. 'भयंकर दिव्य' या कादंबरीत दादासाहेब व कमला यांच्या प्रसंगाने त्यांच्या कार्याचे स्वरूप थोडे विशद केले. आणि 'कर्मयोग' या कादंबरीत चंद्रशेखर या तरुणाला, ताईच्या सहवासांतून असल्या कार्याला आपण वाहून घ्यावे, अशी स्फूर्ती देऊन, अखिल महाराष्ट्राच्या तरुणांना ध्येयवाद शिकविला. या कादंबऱ्यांत हरिभाऊंनी जी मनीषा व्यक्त केली ती 'सेवासदन,' 'सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी' या संस्थांच्या रूपाने लवकर प्रत्ययात अवतरली हे महाराष्ट्राला माहीतच आहे. आजचे ध्येय ते उद्याचे वास्तव, असे वर म्हटले आहे ते याच अर्थाने. वास्तवाचे अवलोकन करून, त्याचा खोल अभ्यास करून जी ध्येये उभारली जातात तीच अशी नजीकच्या काळात प्रत्यक्षात अवतरतात. केवळ कल्पनेच्या बळावर जी स्वप्ने रचलेली त्यांना मूर्त होण्याचे भाग्य लाभत नाही. आणि अशी स्वप्ने रचणाऱ्या लेखकांना वास्तववादी असे कोणी म्हणतही नाही. ते केवळ स्वप्नवादी किंवा सौंदर्यवादी होत. हरिभाऊ असल्या स्वप्नवादापासून फार दूर होते.