पान:सौंदर्यरस.pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
टीकाशास्त्र आणि साहित्य-निर्मिती
४७
 

 आपल्याकडे केशवसुतांपासून आजच्या नवकवीपर्यंत प्रत्येक कवीला टीकाकारांशी सामना द्यावा लागला आहे व लागत आहे कविता किंवा लघुकथा लिहिण्यात साहित्यिकांचा वेळ जात नसेल इतका वेळ टीकाकारांशी लढाई करण्यात जातो. बाळकृष्ण अनंत भिडे, पांगारकर इत्यादी पहिल्या पिढीतल्या टीकाकारांनी केशवसुती संप्रदायावर किती झोड उठविली होती हे प्रसिद्धच आहे. उलट त्याच वेळी नव्या पंथाचे लोक संत व पंडितकवींवर तुटून पडत होते. आज नवकवी व नवकथाकार व त्यांचे टीकाकार यांच्यातील द्वंद्व असेच कटुता निर्माण करीत आहे
 या सर्वामुळे या दोन वर्गात कायमचे व जन्मजात वैर असते व ते अपरिहार्य आहे असा लोकांमध्ये दृढ समज झाला तर त्यात आश्चर्य करण्याजोगे काही नाही, असे पुष्कळांना वाटेल.
 पण आपण थोडा जरी विचार केला, वरील दृष्टी टाकून थोडया जरी निराळ्या दृष्टीने पाहू लागलो, तरी हा समज अत्यंत वेडगळ असून तो लोकांत अशा तऱ्हेने दृढ व्हावा याचेच आपल्याला आश्चर्य वाटेल.
  निराळया दृष्टीने पाहू लागताच आपल्या असे ध्यानात येईल की, अनेक ललितलेखक हे स्वतःच अतिशय व्युत्पन्न असे टीकाकार असतात. फडके, खांडेकर, माडखोलकर, माधव ज्युलियन, गंगाधर गाडगीळ, मर्ढेकर ही नामावली प्रसिद्ध आहे. यांपैकी प्रत्येकाने साहित्यलेखनात जितकी कीर्ती मिळवली आहे तितकीच टीकाकार म्हणूनही मिळविली आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद, लेखनपूर्व, लेखनगर्भ आत्मनिष्ठा, कला व नीती, सत्य, सौजन्य, सौंदर्य यांविषयीचे या टीकाकारांचे सिद्धान्त मराठी टीकाशास्त्रात मान्यता पावलेले आहेत जी गोष्ट आपल्याकडची तीच पाश्चात्य जगाचीही आहे. साहित्यिक लेसिंग, हर्डर, इंग्लिश कवी वर्डस्वर्थ व कोलेरिज, नाटककार बर्नार्ड शॉ, रशियन कादंबरीकार टॉलस्टॉय, फ्रेंच कादंबरीकार बालझॅक्, रोमा रोलां, हे सर्व साहित्य व साहित्यशास्त्र या दोन्ही क्षेत्रांत सारखेच प्रसिद्ध आहेत व विद्वन्मान्य आहेत.
 कवी वर्डस्वर्थ याची 'लिरिकल बॅलडस् ची प्रस्तावना' म्हणजे पाश्चात्य साहित्यशास्त्राच्या विकासातील एक टप्पा मानला जातो. लोक