परीक्षण करून, विश्लेषणात्मक पद्धतीने त्या कल्पित सृष्टीचे समग्र दर्शन रसिकांना घडविले आहे.
'भंगलेले देऊळ' या माडखोलकरांच्या कादंबरीचे परीक्षण वामनराव जोशी यांनी केवळ कलामूल्यांच्या दृष्टीने केले आहे. अनूच्या मनःस्थितीचे व स्वभावविशेषांचे चित्रण हा या कादंबरीचा, त्यांच्या मते उद्देश आहे व तो चांगला सफल झाला आहे, असा त्यांचा अभिप्राय आहे. हे परीक्षण कथानक, स्वभावचित्रण, भाषाशैली अशा क्रमाने व जुनाट पद्धतीनेच केलेले आहे. त्यानंतर पात्रांच्या स्वभावातील दोष दाखविले आहेत. अनूच्या शेवटी व्याख्यानबाजीवर टीका केली आहे. आणि तरीही त्या ललितकृतीचे एकसंध दर्शन आपल्याला घडत नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही.
येथपर्यंत जुन्या-नव्या अनेक टीकाकारांच्या समीक्षांची उदाहरणे दिली आहेत. नवे टीकाकार कोणचे त्याचा उल्लेख वा. ल. कुलकर्णी यांनी केलेला नाही पण गंगाधर गाडगीळ, गं. ब. ग्रामोपाध्ये, धों. वि. देशपांडे हे नवे टीकाकार आहेत हे त्यांना मान्य होईल असे वाटते. या मालिकेत मी प्रा. वा. ल. कुलकर्णी यांचाही समावेश केला आहे. त्यालाही त्यांची संमती मिळेल अशी आशा आहे. त्याचप्रमाणे तात्यासाहेब केळकर, ना. सी. फडके व वा. म. जोशी हे जुन्या युगाचे टीकाकार आहेत याविषयीही दुमत होईल असे वाटत नाही. केळकर व जोशी यांचा कुळकर्ण्यांनी जुन्यांच्या यादीत नामनिर्देश केला आहे. या टीकाकारांच्या वर निर्देशिलेल्या ज्या समीक्षा आहे त्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, ललितकृतीचे समग्र दर्शन एकसमयावच्छेदे करून घडवावयाचे हा त्यांचा हेतू होता, (तसा असतो असे कुलकर्णी म्हणतात.) तरी नव्यांना अवयवशःच परीक्षण करावे लागले, आणि जुन्या टीकाकारांनी अवयवशः परीक्षण केले तरी समग्र दर्शन घडविण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत.
माझ्या मते, ललितकृती एकसंध असते म्हणून तिचे परीक्षणही तसेच एकसंधपद्धतीने झाले पाहिजे, हा आग्रह अगदी चुकीचा आहे. परीक्षण याचा एकच अर्थ असू शकतो. आणि अवयवांचे विश्लेषण, घटकांचे पृथक्करण
पान:सौंदर्यरस.pdf/३९
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३४
सौंदर्यरस