पान:सौंदर्यरस.pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२८
सौंदर्यरस
 

सगळ्या मनोरचनेच्या बुडाशी कामविकार असतो, या विचारामुळे कादंबरीकाराच्या कलेचा बिघाड झाला हे दाखवून दिले आहे. पण हे सर्व विश्लेषणात्मक पद्धतीने.
 धों. वि. देशपांडे हे सध्याच्या काळचे एक नाणावलेले टीकाकार माहेत. त्यांनी मर्ढेकरांच्या कवितेचे तीन लेखांत परीक्षण केले आहे. (सत्यकथा, १९५४ जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर.) देशपांडे हे मर्ढेकरांचे चाहते आहेत त्यांच्या कवितेचा या लेखात त्यांनी विपुल गौरव केला आहे. पण त्यांनी ही समीक्षा विश्लेषणात्मक पद्धतीने केली आहे. त्यांना सर्व काव्यात मर्ढेकरांचे व्यक्तित्वच शोधावयाचे आहे. म्हणजे त्यांच्या प्रतिभेचे समग्र रूपच पहावयाचे आहे. तरीही ते अवयवशः समीक्षा करतात. प्रथम ते मर्ढेकरांच्या भाषेची पाहणी करतात. तिच्यावर जुन्या संतवाङ्मयातील भाषेचा, संस्कृत साहित्याचा, इंग्रजी वाङ्मयाचा, त्यातही बायबलचा कसा संस्कार झाला आहे, हे देशपांडे उदाहरणे देऊन स्पष्ट करतात आणि मग मर्ढेकरांच्या विषयप्रतिपादनाच्या शैलीचा अभ्यास करतात. मर्ढेकरांच्या शैलीत तर्कसंगतीला प्राधान्य नाही, तिच्यात भावसंगतीला महत्व आहे, आणि यामुळेच केव्हा केव्हा त्यांचे काव्य दुर्बोध होते, असे देशपांडे म्हणतात. दुसऱ्या लेखात मर्ढेकरांच्या विचारधनाचा देशपांडे वाचकांना परिचय करून देतात. भाषा, निवेदनशैली व विचार या सर्वांचा एकजीव झालेला असतो हे देशपांडे यांना अमान्य नाही. पण म्हणून त्यांचे निरनिराळे परीक्षण करू नये, असे त्यांना वाटत नाही. स्त्री-पुरुष संबंध, परमेश्वर, युद्धानंतरचे मांगल्यहीन जीवन अशा भिन्न विषयांवरचे मर्ढेकरांचे विचार काय होते ते या लेखात समीक्षकांनी सांगितले आहे. आणि तसे करताना रस, अलंकार, शब्दचित्रे या गुणांमुळे मर्ढेकरांचे काव्य रम्य कसे झाले आहे हे ते दाखवून देतात. रस हाच काव्याचा आत्मा असे देशपांडे यांचे मत आहे. नवे संकेत, नव्या कल्पना, मर्ढेकरांची भावनानिष्ठ समतानता हा सर्व त्यांना फापटपसारा वाटतो. ही काव्याची साधने होत. त्यांनाच काव्य म्हणणे म्हणजे नरोटी पाहून आतील गरावर अभिप्राय देण्यासारखे आहे, असे ते म्हणतात.