पान:सौंदर्यरस.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ही नवनिर्मिती नव्हे !
१३९
 

 इनामदारांनीच 'झुंज' या कादंबरीत यशवंतराव होळकराचे चित्र काढले आहे. त्यात त्यांनी जे प्रस्तावनेत म्हटले आहे त्याची प्रतीती कादंबरीत उत्तम येते. शंभर दोनशे स्वारांनिशी तो बेजरव चालून जातो. रणांत झेप घेतो. तयारी नसेल तेव्हा तोही गम खातो. पण पुन्हा चालून जातो. प्राणांची पर्वा करीत नाही. मराठशाहीच्या रक्षणासाठी विवेक करीत नाही. खरे असे आहे की, तो साहस, शौर्य, पराक्रम दाखवितो म्हणूनच सरदार, पेंढारी, भिल्ल त्याच्याभोवती जमतात, आणि युद्धाची तयारी होते. कायम विवेक करणाऱ्यांची तयारी कधीच होत नाही. तसा विवेक त्रिंबकजी व पेशवे करीत रहातात. म्हणून कागदपत्रात इनामदारांना त्यांचे जे व्यक्तिमत्त्व दिसते त्याची प्रतीती कादंबरीत येत नाही. यशवंतरावाची तशी येते म्हणूनच 'झुंज' ही कादंबरी जिवंत झाली आहे. तिचे इतर गुण वर सांगितलेच आहेत. तेव्हा इतिहासात कोण कसा आहे हे नुसते प्रस्तावनेत सांगण्याला अर्थ नाही. त्याचे कादंबरीत तसे दर्शन घडविणे हे साहित्याच्य, दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्रिंबकजी व दुसरा बाजीराव यांच्यासंबंधी तशी प्रतीती येत नाही. यशवंतरावांची येते. ती आल्यावर ऐतिहासिक सत्याची फारशी चिकित्सा करण्याचे कारण नाही.
 'स्वामी' मधील श्रीमंत माधवराव व रमाबाई यांच्यातील रमणीय प्रसंगांविषयी काही टीकाकार म्हणतात की, त्यांना ऐतिहासिक आधार नाही. पण या टीकेला माझ्या मते महत्त्व नाही. कारण एक तर ऐतिहासिक घटना फार वादग्रस्त असतात. आणि दुसरे म्हणजे लेखकाला कल्पिताचा आश्रय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. ते घेऊन रणजित देसाई यांनी रमा- माधवांचे जे चित्रण केले आहे ते अगदी अपूर्व आहे. साहित्यसौंदर्य त्यांतून दुथडी भरून ओसंडत आहे. अपूर्ववस्तुनिर्माणक्षमता या गुणालाच प्रतिभा म्हणतात.
 आता साहित्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या लक्षणाचा विचार करून आधुनिक ऐतिहासिक मराठी कादंबरीचे हे समीक्षण संपवू. ते लक्षण म्हणजे जीवनभाष्य.