पान:सौंदर्यरस.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ही नवनिर्मिती नव्हे !
१३७
 

 इतिहास व कल्पित कादंबरी यांच्या नात्यासंबंधी जे विचार नव्या लेखकांनी-- विशेषतः ना. स. इनामदार यांनी-- मांडले आहेत त्यांचा परामर्श आता अगदी थोडक्यात घ्यावयाचा आहे. 'झेप', 'झुंज' व 'मंत्रावेगळा' अशा तीन कादंबऱ्या इनामदारांनी लिहिलेल्या आहेत. आजपर्यंतच्या मराठी इतिहासकारांनी त्रिंबकजी डेंगळे, यशवंतराव होळकर व दुसरा बाजीराव यांची जी चित्रे काढली आहेत ती यथार्थ नाहीत, हे पुरुष अगदी निराळे-- म्हणजे पराक्रमी, कर्तबगार, राजकारणकुशल व धीरोदात्त होते, असा त्यांचा दावा आहे. व त्यांनी जी ऐतिहासिक कागदपत्रे पाहिली त्यावरून हे निश्चित सिद्ध होते, असे ते म्हणतात. येथे ऐतिहासिक कागदपत्रात तसा पुरावा आहे की नाही या वादात मी शिरत नाही. त्यांचे म्हणणे क्षणभर गृहीत धरून त्यांच्या मते इतिहासात या पुरुषांचे जे व्यक्तिमत्त्व त्यांना दिसले ते कादंबरीत साकार करण्यात ते कितपत यशस्वी झाले आहेत याच दृष्टीने फक्त परीक्षण करावयाचे आहे.
 'मंत्रावेगळा' ही कादंबरी पाहा. दुसऱ्या बाजीरावाने इतिहासाला कलाटणी दिली. यशवंतरावाचे समर्थ सैनिकी हात व त्रिंबकजी डेंगळ्याची सर्वंकष मुत्सद्देगिरी कुठे तरी थिटी पडली म्हणून मग बाजीराव पुढे सरसावला, असे त्यांचे वर्णन इनामदार प्रस्तावनेत करतात. ठीक आहे. याच्या ऐतिहासिक पुराव्याविषयी वाद आम्ही घालीत नाही. त्याच्या या सरसावण्याचे दर्शन कलाकृतीत होते की नाही, हा खरा प्रश्न आहे. त्या दृष्टीने पाहिले तर काय आढळते ? प्रत्यक्ष लढाईचा प्रसंग आला तेव्हा श्रीमंत पर्वतीवर जाऊन बसले. का ? सरदारांनी आग्रह केला की, 'आम्ही असताना श्रीमंतांनी पुढे कशाला जायचे ?'
 पुढच्या मोहिमेत श्रीमंत रणांगणात उतरले, पण पुढे सरसावले नाहीत. का ? सरदार म्हणाले, 'आम्ही असताना श्रीमंतांनी पुढे कशाला जायचे ? खरे आहे ! शिवाजी, बाजीराव, राणा प्रताप यांना हे शहाणपण सुचले नाही, हे भारताचे नशीबच म्हणावयाचे.
 शेवटी श्रीमंत बाजीरावसाहेब इंग्रजांच्या स्वाधीन झाले ! का ? तर त्या वेळी लढाई मांडली असती, तर विनाकारण हजारो लोकांची हत्या