पान:सौंदर्यरस.pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्यरस
 

बहुधा जुनेच असतात. कलाकार त्यातून नवे बंध, नव्या रेखा निर्माण करतो. म्हणून बंध, रचना, सन्निवेश हाच कलेचा आत्मा होय.
 'विरामचिन्हे' ही गोविंदाग्रजांची कविता पहा. बाल्य, तारुण्य, अर्धागी, विश्वाचे गूढ, परमेश्वर, यासंबंधीच्या कल्पना कवीच्या मनात केव्हा तरी साठलेल्या होत्या. त्यात नावीन्य असे काही नव्हते. विरामचिन्हाचे स्वरूप शालेय जीवनात त्याला माहीत झाले होते. त्यातही नवीन काही नव्हते. पण वाङमयीन लेख व जीवनलेख यांतील त्याला सुचलेले साम्य अगदी नवीन होते. ते स्फुरण होताच त्याने ते सर्व घटक एकत्र आणून त्यांचा उचित सन्निवेश तयार केला. ती कलाकृती झाली. केशवसुतांची 'तुतारी' ही अशीच एक रचना आहे. आपल्या समाजातील दुष्ट रूढी, स्त्रियांची दुःखे, दलितवर्गाच्या यातना, देव, पूर्वज, धर्म, नीती यांविषयीचे सनातन विचार आणि नवे विचार, हे सर्व घटक समाजात होतेच. त्याविषयीच्या चर्चाही वृत्तपत्रांत रोज येत असत. पण रूढीच्या किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या सेनापतीची भूमिका घेऊन एका 'तुतारी' या वस्तूभोवती केशवसुतांनी त्या सर्व कल्पनांची व विचारांची मनोहर गुंफण केली हे नवीन झाले. 'डॉल्स हाउस', 'एनिमी ऑफ पीपल', 'पिलर्स ऑफ् सोसायटी' ही इब्सेनची नाटके म्हणजे अशाच कलाकृती आहेत. भांडवलशाही, तिचा अन्याय, तिचा प्रतिकार, लोकांची स्वार्थवृत्ती, गुलामी वृत्ती, धर्मातील दांभिक कल्पना, वृत्तपत्रांची लाचारी, स्त्रीविषयक रूढ विचार, जुनी नीती, नवी नीती, या सर्व घटकांतून इब्सेनने त्या निर्माण केल्या आहेत. त्यांचा अभ्यास करताना 'ती ती पदे नित्य फिरून येती, त्या त्याच अर्थाप्रती दाविताती; पण- कौशल्य सारे रचनेत आहे!' हे ध्यानात येत असते. जोशा रेनाल्डस् यांनी म्हटल्याप्रमाणे या नाटकातील एकेक घटक निराळा केला तर तो सामान्य असाच आहे. ते सर्व घटक मिळून जो सुरेख बंध तयार झाला तो मात्र नवीन आहे. त्यांचे धागेदोरे, मानवी स्वभाव, भिन्न प्रसंग, लेखकाचे विचार, रागद्वेषादी भावना, त्यांचे उद्गार, यांची जी गुंफण नाटककाराने केली तिच्यामुळे त्या घटकांतून सौंदर्य निर्माण झालेले आहे. सौंदर्य सारे रचनेत आाहे.