पान:सौंदर्यरस.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
सौंदर्यरस
 

 अशा या साहित्य कलेचा खरा आधार कोणता ? तिचा खरा उपासक कोण ? तात्यासाहेब म्हणतात, मानवजातीच्या इतिहासाकडे पाहिले तर या दृष्टीने मध्यमवर्ग हाच महत्त्वाचा ठरतो. याचे कारण असे की, समाज जिवंत रहाण्याला ज्या (वैचारिक, तात्त्विक) हालचाली, जी परिवर्तने व ज्या क्रांत्या अवश्य असतात, त्या सर्व या मध्यमवर्गाच्या मनातून निर्माण होतात. एकीकडे श्रीमान वर्ग आपल्याच ऐश्वर्योपभोगात मग्न असतो. दुसऱ्या बाजूला प्रचंड असा गरीबांचा वर्ग. तो साक्षरही नसतो. मग तो बिचारा वाङ्मयनिर्मिती काय करणार? यामुळे समाजजीवनाच्या अथांग समुद्रावर जी वादळे आजपर्यंत झाली आहेत, ती सर्व या मध्यमवर्गाच्या केंद्रभूमीतच झाली आहेत हे काम एका टोकाच्या श्रीमंतांनी व दुसऱ्या टोकाच्या दरिद्री लोकांनी कधीही केलेले नाहीं. मनुष्याला विश्रांतीचा, फुरसतीचा असा काळ थोडा तरी मिळणे यावरच जगाची प्रगती अबलंबून असते. ('कामगारांचे नेतृत्व कोण करू शकेल.' हा प्रश्न सोव्हिएट क्रान्तीचा नेता लेनिन याच्यापुढे होता. तेव्हा बुद्धिजीवी वर्गच नेतृत्व करण्यास समर्थ आहे, असा त्याने निर्णय दिला होता. नेतृत्वासाठी इतिहास, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, विज्ञान, धर्मशास्त्र, समाजशास्त्र यांचा अभ्यास अवश्य असतो. कामगारांना असा अभ्यास करण्यास रिकाम वेळ मिळत नाही म्हणून कामगार चळवळीचे नेतृत्व ते करू शणकार नाहीत. असे कारण त्याने सांगितले होते.)
 तात्यासाहेबांनी बट्रांड रसेल या पंडिताचे असेच मत असल्याचे सांगून 'इन् प्रेज ऑफ आयडल्नेस' या त्याच्या लेखातला उतारा दिला आहे. तो म्हणतो, 'थोडे रिकामपण, थोडा विश्राम, सुलभ असलेला हा जो लहानसा वर्ग त्यानेच सर्व संस्कृती निर्माण केली आहे. याच वर्गाने कला जोपासल्या आणि विज्ञानाचे संशोधन केले. त्यानेच ग्रंथ लिहिले, तत्त्वज्ञाने उभारली, श्रेष्ठ समाजसंबंध प्रस्थापित केले. दलितसमाजाच्या स्वातंत्र्याच्या, मुक्तीच्या चळवळींना प्रारंभ यानेच केला आहे. या विश्रामसंपन्न वर्गाच्या अभावी मानवजात वन्य अवस्थेतून वर आलीच नसती.'
 जीवनाच्या एका थोर भाष्यकाराने बुद्धिजीवी मध्यमवर्गाचे मानवी जीवनात, मानवी इतिहासात स्थान काय, ते सांगून त्याची अशी महती