Jump to content

पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिक्षुकी वृत्तीचा म्हणजे उपजीविका मिळवण्याचा तो मार्ग होता.पण त्यात माझी प्रगती झाली नाही. इंग्रजी शिक्षण जास्त झाले.रोजचे वर्तमानपत्र सातव्या वर्षापासून वाचत असे.रोजचे वर्तमानपत्र म्हणजे अर्थात केसरी, प्रथम साप्ताहिक व नंतर द्विसाप्ताहिक.राजापूरला शाळेत आल्यावर नवशक्ती,बलवंत वगैरे वाचत असे.म्हणजे राजापूरच्या गुजरआळीतल्या दातार छापखान्यात जवळ जवळ फुकट वाचायला मिळेल तेवढे.त्यात मग त्यांना प्रुफ करेक्शनला आणि ट्रेडल मशीन चालवण्याला व कटिंग मशीनला खेचण्याची मदत करत असे.काम केल्याशिवाय खायला मिळणार नाही ही समज राजापुरातून एसेस्सी होण्यापूर्वीच पक्की झालेली होती.माझे मी माझ्या पायावर उभे राहायला हवे ही समज पक्की होती. मला लोकांनी नोकरी द्यावी किंवा काम द्यावे,किंवा समाजाने माझा विचार करावा ही कल्पना माझ्या मनात नव्हती.मी समाजाचे देणे लागतो,समाज माझे देणे लागत नाही हे स्पष्ट होते.
 ११.०३ मी नोकरी करण्यासाठी,पोटापाण्याच्या उद्योगासाठी १९५३ साली मुंबईस आलो.वडील भावाच्या वेड्या वाटण्यासारख्या धाडसामुळे व मेहेरबानीमुळे सरकारी सिडनहॅम कॉलेजात दाखल झालो होतो.त्याच्यामुळेच 'सत्यकथा' वाचायला लागलो होतो.ठाकुरद्वारच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात बऱ्याच कथा-कादंबऱ्यांची पुस्तके वाचली.
 ११.०४ राजापूर या रत्नागिरी जिल्ह्यातल्या छोट्या शहरातून आलेला असल्याने स्वतःला सर्व काही समजते ही नैसर्गिक गाठ मनाशी पक्की होती.त्यामुळे वादविवादात निबंधलेखनात भाग घेणे, भाषणे करणे ह्या गोष्टी शाळेपासनच घटवल्या होत्या.राजकारणात भाग घ्यायचे व पुढारी व्हायचेही मनात होते.शाळेत असतानाच कॉमर्स विभागाचे वेगळे समांतर गॅदरिंग करणे,सेक्रेटरी होणे वगैरे उपद्व्याप केले होते.तो अनुभव पदरी होता,त्याचा कॉलेजच्या मराठी मंडळाचा सेक्रेटरी होण्यासाठी उपयोग झाला. निवडणुकीचाही अनुभव मिळाला व माझ्या निवडून येण्याच्या क्षमतेची मर्यादा जाणवली.मुंबईत आल्यावर या साऱ्या पक्क्या गृहीतकांना धक्के बसायला सुरुवात झाली.
 ११.०५ कॉलेज संपल्यानंतर लगेच दीड वर्षे शिक्षक होतो.नंतर लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये कारकून झालो. ती नोकरी मुंदडा प्रकरणानंतरची होती.जीवन विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर हरिदास मुंदडा या गृहस्थांनी बनावट शेअर सर्टिफिकिटे कॉपोरेशनला विकली.त्यांतून झालेला घोटाळा

बाहेर आल्यानंतरच्या काळात त्या कॉपोरेशनमध्ये निरनिराळ्या कंपन्यांच्या ताळेबंद पत्रकांची छाननी करून त्यांचे कागद तयार करण्याचे काम आमच्या

सुरवंटाचे फुलपाखरू ५५