पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अध्याय आर्य व द्रविड संस्कृतीच्या समन्वयाचा आहे. दुसरा अध्याय बौद्धिक परंपरेविरुद्ध जैन आणि बौद्ध धर्मियांचा विरोध कशा प्रकारे विकसित झाला व त्यांचे संस्कृतीच्या विकासात कोणते योगदान आहे याची चर्चा केली. तिस-या अध्यायात इस्लामचे आगमन व हिंदू व मुसलमान धर्मियांमधील विचार व आचार यांचे आदान-प्रदान यांची चर्चा केली आहे. तर चौथ्या अध्यायात युरोपीय व विशेषतः इंग्लिश संस्कृतीचे आगमन व तिचा भारतीय जनमनावर झालेला परिणाम यांची चर्चा केली आहे. दिनकरांनी खूप अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला. मात्र पहिल्या प्रकरणात आर्य व द्रविड यांच्यातील वांशिक द्वेष व संघर्ष याबाबत त्यांनी जी मांडणी केली आहे ती आता इतिहासकरांना मान्य नाही. नवे संशोधन अशा प्रकारच्या संघर्षाची शक्यता नाकारत आहे. पण त्या वेळच्या सर्वमान्य इतिहासविषयक भूमिकाच दिनकरांनी स्वीकारल्या आहेत.
 गजानन माधव मुक्तिबोध हे हिंदीतील फार मोठे कवी. ते मार्क्सवादी विचारांचे होते. डॉ. लवटेंनी त्यांचा फारसा परिचित नसलेला ग्रंथ शोधून काढून त्याचे विवेचन केले आहे. भारत-इतिहास आणि संस्कृती' या पुस्तकात त्यांनी भारतीय संस्कृतीचा विकास वर्णन केला आहे. त्यांच्यामते संस्कृतीत कला, धर्म, नीती व साहित्य यांचा समावेश होतो. ती उलथापालथ जीवनदायी शक्ती असते आणि राजकीय विकासाची प्रक्रिया चालूच राहते. या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचे प्रकरण मध्य युगातील हिंदू-मुस्लीम समन्वयाबद्दलचे आहे आणि डॉ. लवटे यांनी या प्रकरणाचे भाषांतर करून या पुस्तकात समाविष्ठ केले आहे. या प्रकरणात मुक्तिबोधांनी अनेक नवनवे संदर्भ देऊन असे प्रतिपादन केले आहे की सुरुवातीच्या काळात हिंदू-मुस्लीम राज्यात संघर्ष झाले मात्र समाजाच्या पातळीवर समन्वयाची प्रक्रिया चालू राहिली. कला, संगीत, साहित्य, शिल्प, तत्त्वज्ञान, धर्म या सर्वच क्षेत्रात देवाणघेवाण झाली. त्यातून मानवतावादी व्यक्ती संप्रदायाचा उदय झाला. सांप्रदायिकता मागे पडली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचेपण त्यांनी चित्तवेधक असे विवेचन केले आहे.
 आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी हे मोठे संशोधक, कादंबरीकार व ललित लेखक. त्यानी शांतिनिकेतनमध्ये काम केले. द्विवेदींच्या मते भारतात विविध भाषा, धर्म, वंश व संप्रदाय यांच्यात प्रचंड भिन्नता आहे. पण त्याचबरोबर त्यांना आतून जाडणारी एकतेची भावनापण आहे. ही एकतेची भावना तीन कारणामुळे निर्माण झाली. एक म्हणजे येथील विविध धर्मातील संतांनी