पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





१ संस्कृति दर्शन



 विषयप्रवेश रसपरिपोष, स्वभावलेखन, मनोविश्लेषण, वास्तववाद, ध्येयवाद ध्वनी, अलंकार, ही साहित्याची भूषणे मानली जातात. साहित्याला या गुणांनीच थोरवी प्राप्त होते. जीवनभाष्य हे साहित्याचे असेच एक महनीय भूषण आहे, हे अलीकडे सर्वमान्य झाले आहे. मॅथ्यू अर्नोल्ड या इंग्लिश साहित्यशास्त्रज्ञाने तर 'साहित्य म्हणजे जीवनभाष्य' अशी साहित्याची व्याख्याच केली आहे. इतर पाश्चात्य शास्त्रज्ञ व्याख्या म्हणून तिला मान्यता देत नसले तरी जीवनभाष्यामुळे साहित्याला महनीयता प्राप्त होते याविषयी त्यांच्यात दुमत नाही. संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी साहित्याच्या गुणांत जीवनभाष्याचा समावेश केला नसला तरी, साहित्याचे ते एक मोठे कार्य आहे, हे त्यांना मान्य होते. 'अज्ञान-अंधकारात लोक चाचपडत असतात. त्यांच्या डोळ्यांत ज्ञानांजन घालून त्यांना दृष्टी देणे हे महाभारताचे उद्दिष्ट आहे' असे व्यासांनी म्हटले आहे. याचा भावार्थ हाच आहे. लोकांना जीवनाची, संसाराची उत्तम कल्पना आणून देणे म्हणजेच दृष्टी देणे होय. आणि प्रत्यक्ष महाभारत पाहता त्यात जीवनभाष्य ठायी ठायी दृष्टीस पडते. यावरूनही व्यासांचा भावार्थ हाच असावा असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.
 साहित्याचा असा हा जो अनन्यसाधारण गुण, हे जे त्याचे महनीय भूषण त्याचा या प्रबंधात विचार करावयाचा आहे.
 त्यासाठी प्रथम 'जीवनभाष्य' याचा नेमका अर्थ काय, त्याची विवक्षा काय, हे पाहणे अवश्य आहे. जगामध्ये भिन्न देशांत, भिन्न समाजात, भिन्न काळी नैकविध संस्कृती उदयास येतात, नांदतात व लय पावतात. त्याचप्रमाणे प्रत्येक समाजात समाजरचनेची काही तत्त्वे असतात, काही उद्दिष्टे असतात व त्यांच्या सिध्दीसाठी काही रूढी पडलेल्या असतात. समाजाप्रमाणेच व्यक्तीलाही कार्योद्युक्त करणाऱ्या काही प्रेरणा असतात. तिचे वागणे त्या अन्वयेच होत असते. या सर्वांचे कलात्मक दर्शन व मूल्यमापन म्हणजेच साहित्यातील जीवनभाष्य होय.

संस्कृतिदर्शन