पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 विवक्षा रामायण व महाभारत हे ग्रंथ पहाता त्यांतील समाजांच्या संस्कृती काही अंशी भिन्न होत्या, त्यांतील नेत्यांची ध्येये, त्यांची मूल्ये, त्यांनी स्वीकारलेले तत्त्वज्ञान बरेचसे भिन्न होते, असे दिसून येते. महाकवी वाल्मीकी व वेदव्यास यांनी आपापल्या काळच्या समाजांचे या दृष्टीने उत्तम दर्शन घडविले आहे. रोम येथे जीझस खाइस्टच्या पूर्वी जी संस्कृती नांदत होती तिचा ख्रिस्ती धर्माच्या उद्यानंतर हळूहळू लोप झाला आणि खिस्ती संस्कृती युरोपात विकसित होऊ लागली. युरोपातही पुढे जर्मनी, फ्रान्स, रशिया, इंग्लंड, इटली यांना पृथगात्मता येऊन त्यांच्या संस्कृतीला भिन्न रूपे प्राप्त होऊ लागली. सतराव्या अठराव्या शतकात या देशांतील जीवनमूल्यांत महदंतर दिसून येत होते, हे इतिहास सांगतच आहे. अर्वाचीन काळात पाश्चात्य व पौर्वात्य संस्कृतींचा संबंध आल्यापासून त्यांच्यांत किती भेद आहे हे सर्व जगाला आज कळून आले आहे. पौर्वात्यांची संस्कृती पाश्चात्यांहून वेगळी आहे असे म्हणताना पूर्वेकडच्या सर्व देशांची संस्कृती एक आहे, सम आहे असा भाव मनात असतो. आणि तुलनात्मक दृष्टीने पाहताना त्याला अर्थही आहे. पण पौर्वात्य देशांचा स्वतंत्रपणे विचार करू लागताच चीन, जपान, ब्रह्मदेश, भारत, आरबराष्ट्रे इ. देशांच्या संस्कृती परस्पराहून अतिशय भिन्न आहेत असे दिसून येईल. इतकेच नव्हे तर केवळ भारताचा विचार आपण केला तर भारतातील जे शीख, रजपूत, मराठे इ. समाज त्यांचीही जीवनमूल्ये, त्यांची तत्त्वज्ञाने हीही परस्पराहून अनेक दृष्टीनी भिन्न आहेत, असे आढळेल. संस्कृती संस्कृतींमधला हा जो भेद त्यांचे दर्शन घडवून त्यांविषयी कलात्मक विवेचन करून त्या भेदांची काही मीमांसा करणे हे साहित्यिकांचे, नाटककार, कादंबरीकार, कवी यांचे कार्य आहे. जीवनभाष्य ते हेच होय.
 प्रत्येक कवी, कादंबरीकार किंवा नाटककार एवढा व्यापक विषय घेईल असे नाही. तरी जो काही मर्यादित असा त्याचा विषय असेल, समाजाचे जे मर्यादित दर्शन त्याला घडवावयाचे असेल त्यात, सर्व सामाजिक संस्कृतीचे वर्णन-विवेचन जरी आले नाही तरी, त्या समाजाच्या हालचालीमागले सामाजिक तत्वज्ञान, त्यातील रूढी यांचे काही प्रमाणात विवरण केल्यावाचून त्या समाजाचे सम्यक दर्शन झाले, असे होणार नाही. धर्म, राष्ट्र, वंश, कुल यांचे कमी अधिक तीव्र अभिमान यांनी पुष्कळ वेळा समाज कार्योद्युक्त होत असतो. शद्वप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, समता, विषमता या तत्त्वांनी त्याला प्रेरणा मिळून त्याचे भवितव्य ठरत असते; लोकसत्ता, दण्डसत्ता, व्यक्तिवाद, समाजवाद, जातिभेद, अस्पृश्यता, गुलामगिरी अशा काही रूढी त्यात दृढमूल झालेल्या असतात व त्या समाजजीवनाचे नियमन करीत असतात. आपल्या ललित कृतीतील कथेच्या ओघात या सामाजिक तत्त्वांची व रुढींची दखल घेणे व त्यांचा आणि कथेतील घडामोडींचा अन्वय लावून दाखविणे हे साहित्यिकाचे एक प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. हा अन्वय हेच जीवनभाष्य होय.
 ललित लेखक दर वेळी सर्वागीण किंवा मर्यादित असे समाजदर्शन घडविण्याचे

साहित्यातील जीवनभाष्य