पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरशाहून फार निराळा असला पाहिजे. आणि तो निराळ्या कोनातून लाविलेल असला पाहिजे. त्यातून दिसणारे सत्त्व-तमांचे रूप नेहमीचे रूप असणे शक्य नाही.'
 पण यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा असा की, निसर्गात सत्त्व किंवा तम, पुण्य किंवा पाप असे काहीच नसते. कोणते पुण्य व कोणते पाप ते मानव-कवी ठरवितो. म्हणजेच तो आपल्या दृष्टिकोणातून पाहून निसर्गाचे चित्र काढतो. काळाचे वा परिस्थितीचे रूप दाखवावे असे हॅम्लेट म्हणतो. पण नित्याच्या अर्थाने काळाला किंवा परिस्थितीला कसलेही रूप नसते. त्यात नुसत्या घटना असतात, व्यक्ती असतात. त्या घटनांचे कवीने मूल्यमापन केले, त्या घटनातले सूत्र दाखविले तरच काळाचे रूप दाखविता येईल. शेक्सपीयरने स्वतःच्या नाटकात हेच केले आहे. केवळ संसाराचे प्रतिबिंब असे कोणत्याच नाटकात त्याने दाखविलेले नाही. ज्यूलियस सीझर, कॉरायलेनस, ऑथेल्लो, हॅम्लेट, ट्वेल्थ नाइट, हेन्री दि फोर्थ, ॲज यू लाइक इट इ. नाटकांत त्याला जगाचे जे रूप दिसले ते त्याने चितारले आहे. आणि जागजागी त्या जगातल्या घटनांचे मूल्यमापनही केले आहे. संसृतिटीका ती हीच. ही टीका मनाशी निश्चित झाल्यावाचून साहित्य जन्माला येत नाही.
 दृष्टिकोण याच प्रस्तावनेत लीगेटने म्हटले आहे की, जीवनात सुसंगती अशी कधीच कोठे नसते. त्याला पूर्णता किंवा अखेर अशीही नसते. त्याचप्रमाणे त्याला प्रारंभही नसतो. म्हणजेच त्याला आकार नसतो. हा आकार कवी देतो. आता हा आकार- फॉर्म- कसा देतो ? आपल्या विचार सूत्राप्रमाणे 'आयडिया' प्रमाणे, तत्वाप्रमाणे कवी जीवनाला आकार देतो. जुनी संस्कृती व नवी संस्कृती याविषयी फडके यांच्या मनात काही विचार निश्चित झाले. संस्कृती ही एक छत्री आहे, असे त्यांच्या मनाशी ठरले. आणि मग शंभूराव जोग, केशवकाका, उमरखान, सुधीर, मीनाक्षी, या व्यक्ती व मुंबई, धेनुकुंज या ठिकाणी घडलेल्या घटना- त्या विचार सुत्रात बसतील, त्याचा अर्थ विशद करतील अशा घटना त्यांनी निवडल्या आणि कथा तयार केली. म्हणजे जीवनाला आकार येतो तो या सूत्रामुळे, निवडीमुळे. कवी वा लेखक जी निवड करतो त्या निवडीवरूनच त्याचा दृष्टीकोण, त्याचे जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान ध्यानी येते. फ्रान्समधील जेसुइट कॅथॉलिक पंथ. त्या पंथाचे धर्मगुरु यांच्या धर्मतत्त्वांविषयी, त्यांच्या आचरणाविषयी आणि त्यामुळे फ्रान्सच्या जनतेवर होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामांविषयी एमिल झोला यांचे काही विचार निश्चित झाले, मते ठरली व मग त्या सूत्रात बसतील अशाच घटना व व्यक्ती निवडून त्याने भोवतालच्या जीवनाला आकार दिला. तीच 'ट्रूथ' ही कादंबरी. तेव्हा साहित्याला आकार येतो तो लेखकाच्या मनातल्या विषयामुळे, त्यातील आशयामुळे म्हणजे त्याच्या दृष्टिकोणामुळे. याचाच पर्यायाने अर्थ असा होतो, कवीच्या दृष्टिकोणावाचून, त्याच्या जीवनाविषयीच्या तत्त्वज्ञानावाचून साहित्य निर्मिती होऊच शकत नाही.
 विचार सूत्रामुळे सुरेखा पर्सी लवॉक याने 'दि क्राफ्ट ऑफ फिक्शन' या आपल्या

१३२
साहित्यातील जीवनभाष्य