पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देशोधडीला लागेल. त्यावेळी माझ्यासारख्याचं पुण्यच उपयोगी पडेल.'
 कादंबरीकाराचा स्वतःचा जीवनविषयक स्वतंत्र दृष्टिकोण असतो. तो प्रगट करण्यासाठी, त्या आत्माविष्कारासाठी तो कादंबरी लिहितो. मात्र तो शक्य तो स्वतः पडद्याआड राहून आपल्या व्यक्तिरेखांकडून आपले तत्त्वज्ञान प्रगट करीत असतो. ललित साहित्याची शोभा त्यातच असते. अटकेपार कादंबरीत माईच्या मुखाने फडके म्हणाले की, केशवकाकांचा संसार जरा जनरीतीहून वेगळा खरा, पण किती सुखाचा आहे, नाही ? या कादंबरीत मावशी, दिनकर, राधा व बापू यांच्या मुखांनी पेंडसे यांनी आपले तत्त्वज्ञान ठायी ठायी प्रगट केले आहे.
 अपेक्षाशून्य दया एशी, बापूची आई. म्हातारपणी तिला कोणी विचारीना. रोगांनी ती जर्जर होऊन गेली. पण तिला कोणी आसरा देईना. दिनकर तिला बापूकडे घेऊन गेला. तेव्हा राधा धावत बाहेर आली व सासूला मोठ्या भक्तीने घरात घेऊन गेली. संबंध जन्मभर राधा व बापू या दोघांना ती शिव्या मोजीत होती. पण राधेने ते मनातही आणले नाही. आता मात्र एशीला स्वतःचीच लाज वाटत होती. त्यामुळे बापू दृष्टीस पडताच तिने त्याच्या पायाला मिठी मारली.
 'आई, ऊठ!' बापू म्हणाला व त्याने तिला अलगद उचलले. अपेक्षाशून्य प्रेमाचा तो स्पर्श !
 आपल्याला पावन करण्याच सामर्थ्य फक्त त्या प्रेमात आहे असं तिला वाटलं.

मूल्य संघर्ष
११३