पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पण बापू हा मानी होता. हळूहळू त्याला मान अपमान समजू लागले. आईच्या वागणुकीचीही शंका येऊ लागली. त्यामुळे तो अण्णाखोताबद्दल व गावातल्या भंपक ढोंगी लोकांबद्दल तिरस्काराने बोलू लागला. तेव्हा आईचे व त्याचे खटके उडू लागले. ती त्याला पाण्यात पाहू लागली, वाटेल ते बोलू लागली व गावात त्याच्याबद्दल अण्णा खोत कंड्या पिकवी त्यांवर विश्वास ठेवून खोताचा पक्ष घेऊन त्याला हिडिस फिडिस करू लागली. बापूने शाळा सोडून दिली व तो रावजीच्या हॉटेलात कामाला राहिला. रावजी हा जातीने गुरव. त्याची बायको राधा ती बापूसारखीच दुर्दैवी होती. ती मुंबईच्या शाळेत होती. बारा तेराव्या वर्षी तिला काही चारगट मुले प्रेमपत्रे लिहू लागली. ती मास्तरांच्या हाती लागली. आणि समाजाच्या नेहमीच्या नियमाप्रमाणे राधा हीच चवचाल ठरली. वडिलांनी तिला शाळेतून काढली. व तिचे लग्न होणे मुष्कील आहे हे जाणून गारंबीचा एक भिकार हॉटेलवाला रावजी याच्याशी त्या नक्षत्रासारख्या सुरेख मुलीचे लग्न लावून दिले. रावजी केवळ पशू होता. तो अगदी गुरासारखी तिला वागवी आणि सदैव घरात डांबून ठेवी. बापूला समाजाने चिखलात फेकून दिले होते, तसेच समाजाने राधेलाही उकिरड्यावर टाकून दिले होते. रावजीच्या हॉटेलात त्या दोघांची गाठ पडे. आणि मग त्यावरून बापूच्या नावाचा गावात बभ्रा होऊ लागला. पण बापूसारखीच राधा मनाने खंबीर होती, विवेकी होती. तिच्या मुद्रेवर सात्त्विकपणाचे तेज होते. बापूवर त्याचा परिणाम होऊन त्याच्या जीवनाला चांगले वळण लागले. त्याचाच आत्मविश्वास वाढला, आपल्या अंगच्या गुणाची जाणीवही त्याला होऊ लागली आणि त्यामुळेच कर्मकांड हाच परमधर्म मानणारे गारंबी गाव आणि शुद्ध मन हा धर्म मानणारा बापू यांच्यात संग्राम सुरू झाला.
 बापू ब्राहाण, रावजी गुरव, राधा अर्थातच गुरव. बापूची बैठक या गुरव मंडळीतच फार. खाणेपिणे तेथेच व त्यांच्याच हातचे. साखरपेंडीला गेला की तो मुसलमानाच्याही हातचे खात असे. खाण्याच्या पदार्थाबद्दलही त्याला विधिनिषेध नव्हता. त्यामुळे गावात त्याची फार निंदा होऊ लागली. हा एक भ्रष्ट, मवाली, गुंड आहे असे गाव म्हणे. पण बापू म्हणे की, मी गारंबीच्या तोंडावर थुंकतो. माझं गारंबीनं काय भलं केलं आहे ? आईशी बापूचा उभा दावा होता, तरी पलीकडे भूतवाडीला राहणारी त्याची मावशी, तिला तो फार मानीत असे. कारण तिची बापूवर माया होती. गारंबीने लाथाडले तरी ती त्याच्या पाठीशी नेहमी उभी असे. बापूचे वाह्यात वागणे तिला पसंत नव्हते. तरी अंतर्यामी ती जाणून होती की बापू चांगला आहे. मावशी विधवा होती. तोंडाची फटकळ होती, पण उद्योग, सचोटी, करारी वृत्ती यामुळे लोक तिला वचकून असत. बापूला तिचा नेहमी पाठिंबा असल्यामुळे बापू जास्त निर्भय होत चालला.
 ब्राह्मणाचे शिक्कामोर्तब हळूहळू बापू सुपारीचा व्यापार करू लागला व त्यात त्याला चांगला पैसा मिळू लागला. तेव्हा तो अण्णा खोत, पांडभट, नाना भट

मूल्य संघर्ष
१११