पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पण मुधीरची आई फार विवेकी होती. शंभुरावांप्रमाणे तिचे मन कर्मकांडामुळे नीरस, शुष्क झाले नव्हते. तिची मुलावरची माया आटली नव्हती. त्यामुळे ती म्हणाली, 'अरे, त्यांचा असंतोष दूर करण्यासाठी तू वाटेल ते दिव्य करशील हे मला माहीत आहे. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यांच्या असंतोषाची कारण फार खोल आहेत. त्यांना जुनं हवं आहे अन तुला नव हवे आहे. यात साऱ्याचं मूळ आहे. मी तुला एकदाच सांगते की घरात कशीबशी सून आलीच पाहिजे, असा माझा आग्रह नाही. तुझी बायको जी कोणी घरात येईल ती मला लक्ष्मीसारखी वाटेल. हे औदार्य, हे प्रेम, ही माया सुधीरच्या वडिलांच्या ठायी नव्हती. आणि काकांच्या ठायी ती पुरेपूर होती. त्यामुळे सुधीरचा ओढा त्यांच्याकडे असे. पण पितृभक्ती, कर्तव्यबुद्धी, कुटुंबभावना यामुळे वडिलांना संतुष्ट करावे अशीही एक विचारधारा त्यांच्या मनात होती. अशा दोन विचारधारांच्या कात्रीत त्याचे मन सापडल्यामुळे तो अनेकदा अगदी व्याकुळ होऊन जाई.
 संस्कृती म्हणजे छत्री जुन्या नव्या संस्कृतीचा हा जो संघर्ष त्याच्यावर फडके यांनी केशवकाकांच्या तोंडून मोठे मार्मिक भाष्य केले आहे. काका म्हणतात, 'संस्कृती म्हणजे काय ? परिस्थितीचा ताप न होता तिच्या प्रकाशाचा उपभोग मात्र घेता यावा म्हणून चालीरीतीची जी छत्री आपण तयार करतो ती म्हणजे संस्कृती. सूर्य बदलला की आपण छत्रीचा झोक पालटतो. सूर्य पश्चिमेला गेला तरी, मी छत्री जुन्या पद्धतीने पूर्वेलाच धरीन, असे म्हणणारा माणूस शहाणा ठरेल काय ? हट्टानं छत्री पूर्वेला धरून त्यामुळे होणारे क्लेश सोसण्याचा करार त्यानं दाखविला म्हणून त्याचं मत बरोबर ठरत नाही. माईच्या आयुष्याचं मातेरं त्या हट्टामुळेच झालं.'
 सुधीरला माई नावाची बहीण होती. तिच्यासाठी जयंत बापट या तरुणाचें सुधीरने चांगले स्थळ आणले होते. जयंत हुषार होता, होतकरू होता, सुस्वभावी होता. पण बापट घराणे सुधारकी थाटाचे म्हणून शंभुरावांनी माईला तेथे देण्याचे नाकारले. जयंताचे माईवर प्रेम होते. पण प्रेमाच्या पांचट खुळाचा त्यांना तिटकारा होता, म्हणून कराचीच्या भाऊ शास्त्रांच्या मुलाला त्यांनी मुलगी दिली. भाऊशास्त्री जुन्या संस्कृतीचे होते. आणि असा व्याही मिळाला हे त्यांना भाग्य वाटले. पण भाऊशास्त्रांचा मुलगा वसंता हा केवळ पशू होता. दारू पिऊन माईला वाटेल तशी मारझोड तो करीत असे. घरी वाटेल त्या बाया आणीत असे. शेवटी ती या यातनांनी मरेल अशी भीती वाटल्यामुळे सुधीरने बहिणीला घरी आणले. पण दादांना- शभुरावांना- हे मुळीच पसंत पडले नाही. 'यात तिच्या पारलौकिक कल्याणाचा विचार सुधीरने केला नाही' असे ते म्हणाले. तशाही स्थितीत त्या नरकात माईने राहिले पाहिजे, यातच तिचे कल्याण आहे, असे त्यांचे मत होते.
 आपली आई व बहीण हे दोन जुन्या संस्कृतीचे बळी आहेत, असे सुधीरला वाटे, आणि यामुळे त्याचे मन हळूहळू वडिलांच्या वर्तनाला विटत चालले. त्यांच्या

मूल्य संघर्ष
१०९