Jump to content

पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वेदांचें महत्त्व व सायणभाष्य.




वेदाचा तो अर्थ आह्मांसीच ठावा ।
येरांनीं वहावा भार माथां ॥ १ ॥ तुकाराम.

 वेदांचें महत्त्व हिंदुसमाजाला किती आहे हे कोणाही हिंदुधर्मी सुशिक्षित मनुष्याला समजावून सांगितले पाहिजे असें नाहीं. वेद हा आर्यधर्माचा मूळ पाया आहे. वेदांवर सर्व आर्यधर्माची इमारत रचलेली आहे. तेव्हां ज्याला आपल्या धर्माचें ज्ञान करून घेणें असेल त्यानें वेदांचा अभ्यास अवश्य केला पाहिजे. वेदांचा अर्थ समजून न घेतां नुसता वेद पाठ करावयाचा ही प्रवृत्ति आपल्या देशांत ज्या दिवशी पडली त्या दिवसापासून आपल्या देशाच्या अवनतीला खरा आरंभ झाला. आपल्या समाजाकडून त्या वेळी ही मोठी चूक घडली व त्या चुकीचा परिणाम आजपर्यंत आपणांस भोंवतो आहे. वेदांचा अर्थ न समजतांना वेद पाठ करणाऱ्या जुन्या लोकांचा जर आपण उपहास करितों तर ती चूक निदान आपले हातून होऊं नये त्याची खबरदारी नवीन पिढीने घेणे जरूर आहे.
 हल्लींच्या काळाला तर वेदांच्या अभ्यासाचें महत्त्व विशेषच आहे. सध्या हिंदुधर्मावर चोहोकडून आघात होत आहेत. एकाद्या निरक्षर बाट्यानें सुद्धां हिंदुधर्मावर तोंड टाकावें अशी स्थिति झालेली आहे. अशा स्थितीत आपल्या धर्माचें रक्षण करणें हें प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. परंतु तें धर्माचें रक्षण, त्याचा नुसता कोरडा अभिमान बाळगिल्यानें, होणे अशक्य आहे. त्या करितां हिंदुधर्माची महती प्रतिपक्षाचे समोर प्रस्थापित करितां आली पाहिजे, व त्या करितां वेदांचें ज्ञान असणे अगत्याचे आहे. शंकराचार्यांसारख्या विद्वानांची श्रुतीवरच कायती सर्व मदार होती, आणि ह्मणूनच बौद्ध धर्माशीं त्यांना टक्कर