पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डाग नंबरी, पर्मनंट असायचे. भट्टीशिवाय निघायचे नाहीत. गरीब मुलांना टिपकागद नसायचा. लिहिलेल्या अक्षरांची शाई विस्कटू नये म्हणून चक्क वर्गातील जमिनीवरची माती टिपकागद होऊन जायची. वर्गात फरशा क्वचित. बहुधा सारवलेली जमीन असायची. पाचवीत आणखी एक प्रमोशन असायचं. पहिली-दुसरीची मुलं बस्करावर बसायची. म्हणजे घरूनच बसण्यासाठी सतरंजी, पोत्याचा तुकडा दप्तरातून न्यायचा. तिसरीचौथीला बस्कर जायचं अन् लाकडी पाट यायचे. पाचवीत बेंचवर बसायला मिळायचं म्हणजे सिंहासनावर बसण्याचाच तो आनंद असायचा!
 सातवी पास होऊन मुलं मराठी शाळेतून हायस्कूलमध्ये यायची. इथं आलं की टाक-दौत मागं पडायची अन् हाती फाउंटन पेन यायचा. म्हणजे शाई भरून लिहायचा पेन, परीक्षा असली की पेन गरम पाण्याने धुवायची स्पर्धा लागायची. पेन रांद्याचे असायचे. कधी पाणी अधिक गरम असेल तर चक्क वितळून जायचे. ऐन परीक्षेत दुसरा पेन मिळणं कठीण! पेनचा गड्डा कधी कधी घट्ट बसायचा. मग दातांनी किंवा दरवाजाच्या फटीत घालून अलगद काढावा लागे गड्डा; पण ब-याचदा तो चिरला जायचा. त्याला फट पडायची. मग दोरा गुंडाळून गड्डा बसविण्याचा उपद्व्याप असायचा. शिवाय अंगठा व तर्जनी शाई गळून डागाळलेले... जेवताना भात कालवताना निळा व्हायचा.
 कॉलेजात जाणं दुर्मीळ; पण लिहिण्यासाठी सुखावह! बॉलपेन हाती यायचं. कित्ता म्हणजे उतरून काढलं जायचं. कार्बन कागद वापरून कॉपी (दुसरी प्रत) नोट्स मिळायच्या. हुशार मुलांचा भाव असायचा. ज्याचं अक्षर वळणदार, त्याचाही भाव मोठ्ठा असायचा.
 आता नव्या पिढीचं लिहिणं संपलं अन् हा आनंदही! ती उपजत कीबोर्ड वापरते. नवी मुलं लिहिणार नाहीत. टाईप करणार! म्हणून त्यांचं सारं लिखाण एक टाईप होणार!
दिवेलागण अन् वाचन

  लिहिण्याप्रमाणे वाचनही सोपं नव्हतं. एक तर शिक्षणाचा आजच्यासारखा सार्वत्रिक प्रचार नव्हता. मराठी शाळेत असताना १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबरला प्रभातफेरी असायची... त्यातील एक घोषणा चांगली आठवते. मुला-मुलींना शाळेत पाठवा.' भिंतीवर एक वाक्य सर्वत्र लिहिलेलं असायचं, ‘ज्ञानाचा दिवा, घरोघरी लावा. त्यामुळे आजच्यासारखं वर्तमानपत्र घरोघरी नसायचं. ते असायचं एक तर सार्वजनिक वाचनालयात किंवा

सामाजिक विकासवेध/६४