पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमच्या लहानपणी हाती यायची पाटी-पेन्सिल. ती हाती यायचा सर्वांचा दिवस एकच असायचा. तो म्हणजे गुढीपाडवा. त्या दिवशी शाळेत जाणाच्या मुलाचं नाव शाळेत घातलं जायचं. मुलींचं नाव मात्र अपवाद असायचं. वडील भाऊ-बहीण, अगोदर शिकणारी मुलं-मुली नव्या पाटीवर सरस्वती, गुढी, ॐ नम:शिवाय असं काहीतरी लिहून सजवून पाटी हाती द्यायचे. पाटी नवीच असायची. पहिली पेन्सिल अख्खी मिळायची. नंतर तुकडेच नशिबी यायचे. गुढीपाडवा, नागपंचमीला शाळेत पाटीपूजन असायचं. चक्क पाटी, पुस्तकं, वह्या मांडून अख्या शाळेत पूजा मांडली जायची. उघडं पूजेचं पान... मग ते वहीचं असो की पुस्तकाचं; ते फुलं, पानं, हळद, कुंकू, बत्ताशे, तीर्थ शिंपडून चक्क रंगीबेरंगी असे होऊन जायचं की पुढे ते कुणाच्याही बापाला वाचणं अवघड होऊन जायचं. पहिली ते दुसरी, तिसरीचं सारं लिखाण पाटी-पेन्सिलचं . शाळेच्या मधल्या सुट्टीत ... तिला आम्ही चक्क ‘सू ऽऽ ची सुट्टी'च म्हणायचो. त्या सुट्टीत शाळेच्या भिंतीफरशीवर पेन्सिलीला टोकं करायचा सार्वजनिक कार्यक्रम असायचा. फरशा, भिंती पेन्सिलीच्या घाशीनं भरलेल्या असायच्या. शाळेची तपासणी असली की पाट्या कोळशानं घासून गुळगुळीत करण्याची अघोषित स्पर्धाच असायची. चौथीला शिसपेन्सिल, वही, खोडरबर, रेझर हाती यायचं. त्याचंही कारण असायचं. चौथीची परीक्षा केंद्राची असायची. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं तर बोर्डाची. केंद्र परीक्षा पास झाली की मुलं पाचवीला. पाचवीत जाणं अनेक अर्थांनी प्रमोशन असायचं. बरीच मुलं केंद्रात गळायची, गचकायची. त्यांची शाळाच सुटायची. पाचवीत शाईनं लिहायला लागायचं. म्हणजे शिसपेन्सिलीची सुट्टी. तिचा उपयोग फक्त भूमिती, भूगोल, विज्ञानाच्या आकृत्या काढण्यासाठीच व्हायचा अन् चित्रकलेत. मुलींसाठी शिवणकला विषय असायचा. कापड बेतायला तिचा उपयोग ठरलेला. तेपण फिकट असेल तर. गडद कापडावर पेन्सिल, खडूच उपयोगी पडायचा. पाचवीत शाई, दौत, टाक, नीब, टिपकागद, पॅड, कंपास, रंगपेटी, ब्रश, फूटपट्टी असा सारा लवाजमा गोळा करायला लागायचा. हे सारं सामान एकाच वेळी पाहण्याचं, घेण्याचे भाग्य फार कमी मुलांच्या नशिबी असायचं. आठवड्याच्या हप्त्यांनी मुलं शाळेचे दप्तर जमवायची. सगळ्यांत मोठी गंमत म्हणजे इंग्रजी, हिंदी या नव्या भाषा, विज्ञानाचा नवा विषय, गणित-भूमितीनं भय

आणि भूत या सा-यांनी पाचवी म्हणजे ऊन-पावसाचा खेळ... कभी खुशी, कभी गम! शाळेत रोज टाक-दौत, टिपकागद घेऊन जावा लागे. सगळ्यांच्या खिशाला व बोटाला शाईचे डाग ठरलेले... रंग गेला तर पैसे परत असे ते

सामाजिक विकासवेध/६३