पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुशल प्रशासनाचा व त्याच्या कार्यक्षम अंमलबजावणीच्या दृष्टीने ते समाजबदल सतत टिपत राहन प्रशासन पद्धतीत बदल घडवून आणत असतात. आपण आजही ब्रिटिश आमदानीतील प्रशासन पद्धतीतून मुक्त झालेलो नाही. आर्थिक सुधारणांचा आढावा घेत ते आपल्या योजनांत सुधारणा करीत असतात. समाजाची बदलती बौद्धिक पातळी, कल यांचं ते सतत निरीक्षण करीत बदल टिपत सुधारणांबद्दल आग्रही असतात. आपल्या युनिअनमधील देशात एकवाक्यता यावी, समन्वय यावा म्हणून ते सतत दक्ष असतात. आपले प्रशासन मात्र बदलाला फारसे उत्सुक असत नाही. स्थितिशीलता हा भारतीय प्रशासनाचा स्थायिभाव आहे, का अशी शंका यावी, खात्री व्हावी, असा आपला प्रपंच व व्यवहार असतो.
 लोकानुवर्ती प्रशासन हे राष्ट्रानुवर्ती नागरिक घडविण्याचं सशक्त व सक्रिय माध्यम आहे, हे लक्षात घेऊन आपण आपल्या देशातील नागरिक घडणीचा विचार केला पाहिजे. केवळ संस्कार व शिक्षण नागरी घडणीत अपुरे ठरतात, हे गेल्या ७० वर्षांच्या स्वातंत्र्याच्या आपल्या अनुभवातून जर आपण काहीच शिकणार नसू; बदल, सुधारणा करणार नसू तर सुधारणा, विकासाच्या सगळ्या घोषणा वल्गना ठरतील. पालथ्या घड्यावर पाणी

ओतून घट भरत नसतात एवढे जरी शहाणपण आपण स्वीकारले तरी भरपूर प्रगती होईल. सतत, शाश्वत विकासार्थ युरोपीय देश आपले भविष्यातील लक्ष्य निश्चित करतात. त्यानुसार नियोजन, योजन व अंमलबजावणी अशी त्रिसूत्री ते सतत पाळतात. प्रशासन सुधारणांत लोकमताचा आदर ते महत्त्वाचा मानतात. आपल्याकडे लोकांपेक्षा लोकप्रतिनिधींचे ऐकण्याची मनोवृत्ती आहे. आपले लोकप्रतिनिधी प्रभाग, मतदारसंघ केंद्रित विचार करीत असल्याने, शासनही लोकानुनय करणारे निर्णय घेण्यात पटाईत असल्याने इथल्या नागरी विकास व घडणीत प्रशासनाचा वाटा शून्य राहतो. तरुण वर्ग स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रशासनात जाऊ इच्छितो, असे सध्याचे चित्र आहे. यामागचे काही लक्ष्य आहे की प्रलोभन कार्यरत आहे हे तपासले पाहिजे. ते पैसे न देता चांगली नोकरी मिळण्याचे माध्यम म्हणून सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या वर्गाला या क्षेत्राचे आकर्षण म्हणून ते मी मान्य करतो; पण हे माध्यम जनसेवेचे साधन म्हणून पाहणारे विरळा दिसतात. सत्ता, संपत्ती, अधिकार, सरंजामी व्यवस्थेचे साधन म्हणून भारतीय प्रशासनाचे तरुण वर्गाचं आकर्षण हा माझ्या चिंता व चिंतनाचा विषय झाला आहे. यातच आपल्या नागरी घडणीची शोकांतिका दडली आहे. आज देशाची गरज निरपेक्ष, कार्यक्षम, पारदर्शी, लोकानुवर्ती

सामाजिक विकासवेध १०२