पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरक्षणाशिवाय शक्य नाही. तिकिटांचे आरक्षणही तीन महिने अगोदर केले तर प्रवास सुसह्य नि स्वस्त. या आपल्या रेल्वेगाड्या बारा महिने, चोवीस तास दुथडी भरून वाहत असतात. गाड्यांना डबे किती तर किमान बारा व कमाल अठरा. या उलट युरोपचा अनुभव. रेल्वे कुठलीही घ्या, तीन-पाच डब्यांची. केव्हाही जा नि प्रवास करा. ना गर्दी, ना गोंधळ, ना घाण. याचं रहस्य लोकसंख्या नियमित असणं जसं आहे तसंच नागरी घडणीतील देशाची जागरूकता व तत्परताही आहे. सेवा-सुविधांत स्वच्छता, नियमितता, पारदर्शिता या गोष्टींचा तिथे केवळ आग्रह नाही तर आचरणही आहे. शिवाय सुविधांची रेलचेल हेही एक कारण आहे. संख्या, काळ, काम, वेग यांचा तेथील नागरी सुविधा नियोजनात किती विचार केला जातो? मुतारीत पाण्याचा वारेमाप वापर, शेतीला कालव्याने पाणी, बिननळांची पाणीपुरवठा योजना आपणाकडेच. इस्त्रायलला ठिबक सिंचन शेतीत अनिवार्य. जपानमध्ये मुतारीत पाणी काटकसरीसाठी ‘सेंसर' वापर, युरोपमध्ये पाय ठेवला की जिना चालू होतो. जिन्यावर कोणी नसेल तर तो आपोआप बंद होतो. यातून पाणी नि विजेची ते करीत असलेली बचत, काटकसरी वापर यांचे अनुकरण आपण केले पाहिजे; कारण आपणाकडे पाणी, विजेचा मुळातच तुटवडा आहे.

  साऱ्या समृद्ध नागरी जीवनाची मदार जर कशावर अवलंबून असेल तर ती कुशल प्रशासनावर (Good Governance). या संदर्भात युरेपियन कमिशनकडून आपणास बरंच शिकता येण्यासारखं आहे. समृद्धी वजा जाता त्यांचे व आपले प्रश्न एका अर्थाने समान आहेत. बहुभाषा, बहुसंस्कृती, बहुवंश, बहुस्तरीय समाज, लोकशाही प्रशासन इत्यादी. पण ते कुशल, तत्पर प्रशासनाचा विचार बहुअंगांनी करतात. शासन, उद्योग, व्यापार, वाहतूक, शिक्षण, अर्थव्यवस्था, प्रांतरचना, कायदे, अंमलबजावणी यंत्रणा यांमध्ये तिथे सतत संवाद, देवघेव, समन्वय यांवर भर दिला जातो. रस्ता करायचा किंवा दुरुस्त करायचा तर एकाच वेळी अभियांत्रिकी, वीज, टेलिफोन, ड्रेनेज, पाणीपुरवठा, नियोजन, नगरपालिका, पोलीस, कार्यरत राहून समन्वयाने ठरलेल्या वेळेत पर्यायी यंत्रणा उभारून काम फत्ते करतात. नागरी कुशल प्रशासन हा जबाबदार नागरिक घडविण्याचा एक महत्त्वाचा घटक होय. युरोपिअन कमिशनसारखं संघटन या दृष्टीने सतत प्रयत्नशील व कार्यतत्पर असतं. आपल्या युरोपिअन युनिअनमधील सर्व देशांत समान कुशल प्रशासनाद्वारे सुजाण व जबाबदार, शिस्तप्रिय नागरिक घडावेत म्हणून ते सर्वांगांनी प्रयत्न करीत असतात. ते समजून घेणं आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं अनुकरण ठरेल.

सामाजिक विकासवेध/१०१