पान:साथ (Sath).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
रेशीम गुंता


 शतकानुशतके परंपरेने झालेले सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक संस्कार व लग्नमंडपात आप्तस्वकीयांच्या साक्षीने डोक्यावर पडलेल्या मंत्राक्षदा किंवा सप्तपदी यामुळे श्रद्धा किंवा कर्तव्यबुद्धी जागी होईल. पण या संस्कारांत किंवा बाह्योपचारांत पति-पत्नींनी परस्परांना समजावून घेऊन, हे नवे नाते, नवे बंध सुखकर करण्याचे सामर्थ्य आहे का?

 'पश्चिमेचे वारे' वाहू लागल्यापासून, भारतीय स्त्रीची अस्मिता नव्याने जागृत होऊन साकारू लागली आहे. ती आता सर्वच क्षेत्रांत पुरुषाबरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध करू लागली आहे.
 संसार म्हणजे स्त्री-पुरुषाचे नुसतेच एकत्र राहणे नसते, तर सर्वार्थाने स्वतंत्रपणे घडलेली दोन व्यक्तिमत्त्वे आपली वाटचाल एकमेकांच्या सहकार्याने करू इच्छित असतात.
 आजच्या काळात, विशेषतः सुशिक्षित समाजात, दोन स्वतंत्र व्यक्ती जेव्हा पति-पत्नी म्हणून एकत्र येतात तेव्हा प्रेमाबरोबर, व्यवहारही जीवनाचा एक भाग होतो.
 आर्थिक व्यवहार, नातीगोती, वेगळाले विचार, प्रवृत्ती, भावना आणि संवेदनक्षमता यांतून मग मतभेद, ताणतणाव, कळत नकळत एकमेकांचा केला गेलेला अधिक्षेप वा झालेला अन्याय यांची मालिकाच सुरू होते.
 मग या सगळ्यामधून परस्परांना साथ देण्याची प्रेरणा कशातून मिळत असते आणि कशी यशस्वी होत असते ?
 या संबंधातले परस्परांचे पहिले-वहिले आकर्षण. त्यातील गोडवा, मुलांमुळे निर्माण झालेले मायेचे अनुबंध आणि एकमेकांबद्दल विश्वास आणि त्यातून मिळणारा आधार, यांतला कोणता बंध प्रभावी ठरत असेल ?
 खरं तर हा प्रश्न ज्याचा त्याने स्वत:च्या मनांत डोकावून स्वतःलाच विचारायचा आहे.

एस